डॉ. प्रमोद वि. पाठक

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद” – लेखक : श्री श्रीकांत तलगेरी ☆ परिचय –  डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

पुस्तक : आर्य आक्रमण सिध्दांत आणि भारतीय राष्ट्रवाद

लेखक : श्रीकांत ग. तलगेरी

अनुवादक : प्रा. म. मो. पेंडसे.

प्रकाशक : साप्ताहिक विवेक,

पृष्ठे : ३७७,

मूल्य : रु. ५००/-

आर्यांनी भारतावर आक्रमण करून स्थानिक जनसमूहांवर विजय मिळवला, आपले वर्चस्व प्रस्थापित केले, इथे पूर्वीपासून वसती करून असलेल्या लोकांवर आपली संस्कृती लादली हे गृहितक इंग्रजी राज्यकर्त्यांनी लादलेल्या भारतातील इतिहास शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून गेली दिडशे वर्षे शिकवले जात आहे. इ. स. १९२० नंतर मोहेंजोदारो आणि हरप्पा येथे झालेल्या उत्खननाने त्यावर जणू शिक्कामोर्तब झाले. उत्खनित झालेली सिंधू संस्कृतीची शहरे आर्यांनी नष्ट केली असे ठरविण्यात आले. ते गृहीत इथल्या आणि परदेशातील अभ्यासकांच्या मनात इतके घट्ट रुजले की त्याला आव्हान न देता येणाऱ्या सिध्दांताचे महत्त्व प्राप्त झाले. आज सर्वसाधारण सुशिक्षित भारतीय नागरिकाच्या मनावर हेच बिंबलेले आहे की आर्य हे पश्चिमेकडून आलेले आक्रमक होते. त्याला धरून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक लिखाण होत राहिले. त्यातून या देशातील विविध जनसमूहांमधे यशस्वी रित्या सामाजिक फूट पाडली गेल्याचे चित्र गेल्या शतकभरात दृढ झालेले आपण पाहतो. त्याचे पडसाद आजही आपल्याला तामिळनाडूच्या राजकारणात पहायला मिळतात. आजकाल हिन्दू-आर्यांना सनातन संस्कृतीशी जोडून त्यांच्या विरोधात प्रक्षोभ आणि संधर्ष उभा करण्याचे राजकारण तेथे चालते आहे.

सिध्दांताचा प्रतिवाद

आर्य आक्रमण सिध्दांत विशेष करून इंग्रजी राज्यकर्त्यांनी जगावर, त्यातल्या त्यात भारतीय आणि युरोपातील जनमानसावर यशस्वीपणे थोपवला. त्याला एक प्रकारे पुष्टी बोगाझकोई येथे हजारोंच्या संख्येने मिळालेल्या लिखित मातीच्या मुद्रांनी मिळाली. कारण त्या मुद्रांवरील मजकूरात वैदिक देवता, इतर संस्कृत नावे आणि संख्यांचा समावेश होता. काही मुद्रांवरील मजकूरानुसार त्यांचा काळ निश्चितपणे इ. स. पूर्व १३८०च्या दरम्यानचा होता हे ठरविता आले. त्याला धरून तो जनसमुदाय मजलदरमजल करत ईराणमार्गे इ. स. पूर्व १२००च्या दरम्यान भारतात पोहचला असा निष्कर्ष सहज काढता आला. मॅक्समुल्लरने अंदाजपंची ठरविलेल्या आर्य आक्रमणाच्या काळाशी तो जुळल्याने त्यावर मोहर लागली. त्याचा अमिट प्रभाव आतही अनेक बिनीच्या प्राच्यविद्या संशोधकांवर आहे. माझ्या मते ही संशोधक मंडळी बोगाझकोई मातीच्या मुद्रांच्या दलदलीत फसून बसली आहेत. आर्य आक्रमण प्रतिपादनाचा सविस्तर संशोधन करून प्रतिवाद करणारे पाच ग्रंथ नारायणराव भवानराव पावगी यांनी १८९०च्या दशकात प्रसिध्द केले होते. याच्याही पुढे जाऊन पश्चिमेतील अनेक प्राचीन साम्राज्ये भारतीयांनी प्रस्थापित केली होती असे त्यांनी नमूद होते.

आर्य आक्रमण सिध्दांताचा ठोसपणे पुरस्कार लो. टिळकांनी केला. त्याचा प्रतिवाद करणारे ग्रंथ नंतरच्या काळात अनेक संशोधकांनी लिहिले. जसे जसे नवे संशोधन होत गेले तसे तसे आर्य आक्रमण सिध्दांताच्या विरोधातील पुरावे पुढे येऊ लागले आहेत. त्याच विषयाला धरून श्रीकांत तलगेरींनी लिहिलेला THE ARYAN INVASION THEORY: A REPREAISAL हा ग्रंथ (पृष्ठे ३७३) १९९३ साली आदित्य प्रकाशन, नवी दिल्लीने प्रसिध्द केला होता. आता सुमारे ३२ वर्षांनंतर प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेला मराठी अनुवाद साप्ताहिक विवेकने प्रसिध्द केला आहे. तीन दशके जुनी असली तरी, एका बहुचर्चित विषयाची सटीक आणि दोन्ही विचारधारांची माहिती करून घेण्याची संधी या ग्रंथाव्दारे मराठी वाचकांना मिळेल.

प्रस्तुत ग्रंथात विशेष भर भाषाशास्त्रीय विश्लेषणावर आहे. संस्कृत, इराणी, ग्रीक आणि लॅटिन भाषांमधील शब्द साम्य लक्षात आल्यावर मूळ भाषा कोणती आणि तिचे मूळ ठिकाण कोणते असावे असा प्रश्न समोर येणे साहजिकच होते. त्याचे उत्तर शोधताना मात्र ब्रिटिश संशोधकांनी युरोपीय संस्कृती केन्द्रस्थानी ठेवून या दोन्ही प्रश्नांचे उत्तर, शोधले नाही तर तयार केले. ज्या ब्रिटिशांना १८व्या शतकात डॉ. सॅम्युअल जॉन्सनने इंग्रजी शब्दकोश तयार करेपर्यंत शब्दांचे स्पेलिंग एकसारखे असावे याची अक्कल नव्हती ते, ज्या भारतीयांनी हजारो वर्षांपूर्वी ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग इ. उच्चारांना धरून संस्कृत व्याकरणाची बांधणी केली, बिनीचे व्याकरणकार दिले त्यांना हे उपटसुंभ संस्कृत भाषा मूळ शिकवू लागले. त्याने सर्व घोटाळा केला. त्यांनी प्राथमिक Indo-European root language – भारोपिय मूळ असलेल्या भाषेची संकल्पना मांडली. ही भाषा युरोपच्या आसपासच्या प्रदेशात निर्माण झाली हेही ठोस पुरावे उपलब्ध नसताना ठरवले. त्यातून पुढे जाऊन आर्य स्थलांतर आणि आक्रमणाचे गृहितक मांडले गेले. खरेतर संस्कृत भाषा अति प्राचीन काळापासून ज्या प्रदेशात प्रचारात आणि वर्धिष्णू होती त्या प्रदेशात तिचे मूळ असणे अगदी स्वाभाविक होते. त्याच्या उलट असलेल्या दिशेकडून स्थलांतराचे इमले रचले गेले. त्यावर अमाप ग्रंथ रचना झाली. आता स्थिती अशी आहे की सत्य स्वीकारायचे तर आजवर उभारलेल्या आणि आता अवैध ठरू लागलेल्या तुलनात्मक भाषिक संशोधनाच्या महालांवर बुलडोझर चालवून ते जमिनदोस्त करावे लागतील.

अपभ्रंश की उद्भ्रंश

काही वर्षांपूर्वी माझी दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषाशास्त्रीं बरोबर भेट झाली. ते दोघेही अमेरिकेतील प्रख्यात विद्यापिठांत नावाजलेले प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यातील एक मराठी (माणूस) होते. मी त्यांना एकमेकांशी संबंधित असलेल्या शब्दांच्या तीन जोड्यांच्या भौगोलिक प्रवासा विषयी विचारले. ऋग्वेदात इंद्राने वध केलेल्या “वृत्र” या महाभयंकर भुजङ्गाचा वारंवार उल्लेख येतो. त्या भुजङ्गाचे पर्यायी नाव “अहि-दास” असेही आहे. त्याचा वध करणारा या अर्थी इंद्राला “वृत्रघ्न” असे नाव दिले गेले. या वृत्रघ्नाला पर्यायी म्हणता येईल असा शब्द पारशी लोकांचा धर्मग्रंथ अवेस्तात “वेरेत्रघ्न” असा आहे. त्याच्या उत्तरेला असलेल्या आर्मेनियात तो “वाहग्न” असा झाला आहे. त्याला समांतर असलेल्या भुजङ्ग दर्शक शब्दांची रूपे “अझी दाहक” आणि “अझो दाह” अशी आहेत. मी त्यांना विचारले होते की हा शाब्दिक अपभ्रंशाचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे की उलट्या दिशेने झाला असावा. त्या दोघांनीही या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले होते. साधारणपणे कठीण उच्चारी शब्दांचे अपभ्रंश सोप्या उच्चारात होतात. “क्षेत्र” चे शेत, (हिंदीत खेत) होते, शेतचे “क्षेत्र” असा “उद्भ्रंश” होत नाही. हे एक व्यवहारातील उदाहरण झाले. तसे वृत्रघ्नचे वेरेत्रग्न आणि वाहग्न असे अपभ्रंश होणे साहजिकच ठरते. पण बोगझकोई मुद्रांच्या दलदलीत फसलेल्या त्या दोघांनी पूर्वे कडून पश्चिमेकडे हा पर्याय स्वीकारला असता तर आजवर केलेल्या दशकांच्या संशोधनाचा डोलारा एका क्षणात जमिनदोस्त होईल, आर्य आक्रमण मोडीत निघेल ही भिती त्यांना होती. तेही माझ्यासारख्या नाव नसलेल्या (उपटसुंभा) कडून.

तसे पाहता भारोपीय भाषा मूळ युरोपात असणे हे थोतांड आहे. तलगेरींनी या थोतांडाचे अंतरंग उघडे पाडून त्यातील खाचाखोचा समोर आणल्या आहेत. त्यांनी अनेक प्रस्थापित आणि नावाजलेल्या भाषाशास्त्रज्ञांच्या संशोधनातील कच्चे दुवे स्पष्ट केले आहेत. विशेष करून मध्यपूर्वेतील आणि दक्षिण युरोपातील प्राचीन भाषांमधील प्रचलित शब्द आणि त्यांचे मूळ असू शकणारे संस्कृत अथवा संस्कृतोद्भव शब्द यांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्यातून असे दिसते की भाषाशास्त्रीय विवेचनातून आर्यांचे स्थलांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे झाले असण्याचीच शक्यता होती. त्याला आधुनिक पुरातत्त्वीय आणि जनुकीय विस्तारावरील संशोधनाचा ठोस आधार मिळतो आहे. यावर विषयाला धरून दै. मुंबई तरुण भारत (दि. ५ नोव्हे. २०२२) मधे माझा प्रसिध्द झालेला लेख, तसेच “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” या माझ्या पुस्तकातील प्रकरण “आर्य आक्रमणाच्या थोतांडाला साम्यवादी मक्केतून सुरूंग” (नचिकेत प्रकाशन २०२३, पृ ९९-१०६) यात वाचकांना वाचता येईल.

पुराणांमधील वंशावळ्या

पाश्चात्य संशोधक आणि त्यांची री ओढणाऱ्या भारतीय संशोधकांनी पुराण ग्रंथांना विश्वासार्ह नाहीत असे ठरवून वैचारिक अडगळीत टाकले होते. त्या पुराणांची ऐतिहासिक उपयुक्तता दाखविण्याचे महत्त्वाचे काम तलगेरिंच्या पूर्वी ए. डी. पुसाळकर आणि पी. एल. भार्गव यांनी केले. पुराणांमधील वंशावळ्या व्यवस्थित लावून कालदृष्ट्या इतिहासाची बांधणी केली जाऊ शकते हे त्यांनी सिध्द केले. तलगेरी त्यांच्या दोन पाऊले पुढे गेले आहेत. त्यांनी वैदिक राजे आणि मध्यपूर्वेतील प्राचीन राजे आणि राजवंशांची योग्य सांगड घातली आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य मानता येईल. या विषयाला धरून विस्तृत चर्चा या ग्रंथात आहे. पुराणांमधील राजवंशावळ्या भाकडकथा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत हे वास्तव या ग्रंथाने ठळकपणे पुढे आणले.

एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो. जर सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती एकच होत्या तर हे स्थलांतर होण्याचे कारण काय होते? त्याचा उलगडा गेल्या दोन तीन दशकातील संशोधनाने अधिक स्पष्टपणे झाला आहे. इ. स. पूर्व २०००-१८०० दरम्यान सिंधू नदी खोऱ्यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठीय (Tectonic) उत्पात झाले. त्याच्या परिणामी जवळपास सर्व मोठी शहरे आणि गावे सामूहिक स्थलांतर होऊन ओस पडली. सिंधू संस्कृतीचे लोक चार दिशांना स्थलांतरित झाले. त्यातील जे दोन जनसमूह वायव्येकडे आणि पश्चिमेकडे स्थलांतरित झाले त्यांचा मागोवा तुलनात्मक भाषाभ्यासातून (Comparative philology) घेतला गेला. त्याचा घटनांचा विस्तृत आढावा “पुरातत्त्वावर वेदमुद्रा” यात (पृ. ११-२३) घेतला आहे. य़ा स्थलांतरा मागची अभूतपूर्व पूरांची वस्तुस्थिती लक्षात घेतली की तलगेरींच्या आणि प्रख्यात पुरातत्त्वविद डॉ. बी. बी. लाल यांनी प्रतिपादन केलेल्या आर्यांच्या वायव्य आणि पश्चिमेकडील स्थलांतरांचा वस्तुनिष्ठ उलगडा होतो.

प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेले हे भाषांतर एकदम छान झाले आहे. सामान्य वाचकांना वाचताना मूळ ग्रंथ वाचल्याचे समाधान मिळेल, मात्र एक तांत्रिक तृटी अभ्यासकांना जाणवत राहील. जागोजागी संक्षिप्त रूपात दिलेल्या संदर्भ ग्रंथाची यादी त्यात देण्याचे राहून गेलेले दिसते. या ग्रंथाच्या पुढील आवृत्तीत संदर्भ यादी न चुकता समाविष्ट व्हावी.

परिचय : डॉ. प्रमोद वि. पाठक

नाशिक   भ्र. – ९९७५५५९१५५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments