श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“आवं दादा या पुलावरून हे काय धावतया म्हनायचं.. आनि तेबी जमिनीवर पाय न लावता असं अधांतरीचं कसं काय पळतया! … “
“अरे बाबानू असं का येड्यावानी इचारतायं? … ती धावती ना तिला या शहराची मेट्रो म्हनत्यात… ती अशीच तुमच्या आमच्या इतकचं काय मोठ्या इमारतीच्या डोक्यावरूनच पळत असती! … तिचा अन जमिनीचा काहीच संबंध येत नाही.. कायमच ती अशी अधांतरी पळत असती.. आताच्या दिवसात या शहराची हु दुसरी जीवनदायीनी हायं बाबानू.. समजलं! … “
… ” असं हायं का? पर अवं दादा पर सहा महिन्याच्या मागं या जागेवर जी झोपडपट्टी व्हती त्यात आम्ही चाळीस पन्नास वर्षं राहत व्हतो.. ते मराठवाड्यात दुष्काळी कामं सुरू झाली म्हणून आम्हाला संमद्याना तकडं काम मिळालं. तवा इकडं घराला कुलूप घालून आम्ही संमदी तकडं गेलो.. सहा महिनं म्हणता म्हणता एक वरीस ततच ठेवून कामं पूरं झाल्यावरच आम्हाला सोडलं… अन इथं येऊन बघतो तर ह्यो मोठा पूल बांधलेला दिसला.. ती पळणारी चकाचक रेल्वे दिसली पन आमच्या झोपड्या काय कुठं नदरलाच दिसनात… अन आमच्या आजुबाजूला राहणारे ते शेजारपाजारचे लोक बी दिसनात… पाक भुईसपाट करून खालनं दोन चार मोठ्ठं रस्तंच बांधलेलं दिसलं… किती मोटारींचा येजा चा गर्दा माप वाढलेलला दिसतूया.. “
“अरे बाबानू आता शहराचा मोठा विकास होऊन राहिलाय… ते सरकारनं स्मार्ट सिटी योजना अमंलात आणायचं ठरवलंय.. तेव्हा सगळ्यात पहिल्यांझुट गदा ही गलिच्छ झोपडपट्टीच्या जागेवर घालण्यात आलीयं… आता शहराचा विकास करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.. सरकारी वटहुकूम निघाला की सगळ्यांना त्याप्रमाणे वागावचं लागतं… त्येला काय इलाज नाही… आता तुमच्या झोपड्या गेल्या आहेत तर तुम्हाला दुसरीकडे जागा शोधायला हवी.. या भागातला समाजसेवका कडं जाऊन भेटा म्हणजे तो तुम्हाला मदत करील… “
“.. नगं नगं आता आम्ही कोणाला भेटाबिट्याच्या भानगडीत पडनार नाही बघा… तो काय शहराचा विकास हुनार आहे म्हनता तो तर हा असा आभाळालाच भिडायला गेल्या सारखाच डोक्याच्यावरनचं जाणारा हाय नव्हं… मगं आम्ही आमच्या झोपड्या पहिल्या होत्या तश्याच या पुलाच्या खाली प्रत्येक खांबाच्या भवतीनं बांधून राहतो.. नाही तरी त्या खांबाच्या बाजुची जमिनीचा काही आता विकास काय होणार नाही… मगं आम्हाला कोणी तिथून उठवणार पण नाही… ते म्युन्सिपालटीवालं साहेब आम्हाला चांगले वळखतात.. आन ते लै दयाळू बी हायती.. झोपडं बांधल्यावर एक डाव त्यांची गाठ घेऊन पानसुपारी केली कि लाईट पानी अन सुलभ शौचालयाची पन सोय लगेच करतात बघा… सरकारला म्हनावं काय तुझा विकासाचा ऊजेड पाडायचा तो वर आकाशापतूर नेऊन पाडनास.. आम्ही इथं भुईवर चटई पसरुन बघत राहतू… “
“अरं बाबानू या विकास करताना तुमच्या सारख्या गोरगरिबांचीच फारच अडचण होत होती… म्हणून तर तुम्हाला सरकारी कामं देतो, चांगला पैका देतो या आमिषावर ओढून च तिकडं मराठवाड्यात लांब नेलं आणि इकडं हा पूल पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सोडलचं नाही… काय येतयं का लक्षात काही तुमच्या.. साप पण मेला आणि काठी पण वाचली अशी सरकारनं खेळी केली होती… हं आता तुम्हाला राहायला जागा नाही घर नाही तर तुम्ही तरी काय करणार म्हणा… या पुलाच्या खालच्या जागे शिवाय पर्याय आहे कुठे… शिवाय तुमचा तो म्युनिसिपालिटी चा साहेब आहेच कि तुमच्या मदतीला… नाहीतर त्याने त्याच्या नोकरीत न दिसणारा विकास आता नाही तर कधी करून घ्यायचा… “
“बरयं मी निघतो.. ती मेट्रो जशी धडधड करीत वरनं जाताना दिसली कि मलाही माझ्या छातीत धडधड वाढायला लागते… वयाचा परिणाम आहे बाबा… आकाशाला गवसणी घालणारा विकास बघूनच माझे डोळे दिपून गेले… आता या पुढे अधिक पाहण्याआधी ते लवकरच मिटलेले बरे… “
आणि त्या गावाहून आलेल्या गोरगरीबांनी मेट्रो पुलाच्या खाली खांबाच्या आधारे आपल्या झोपड्या उभा केल्या.. आकाशातून खाली पाहताना चकाचक श्रीमंतीचा थाट दिसत होता आणि त्याच्या सावलीत विसावलेली गरीबी मात्र घाबरून पुलाच्या खांबाला पाली सारखी चिकटून बसली होती…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






