शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ आशाताई.. गेलात…! – भाग – २ ☆ शीला पतकी ☆
☆
आशाबाईंचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या सामान्य जीवन जगणं पसंत करायच्या स्वयंपाकाची विलक्षण आवड.. लोकांना करून घालायची हौस बाजारात फिरून भाजीपाला आणण्याची हौस.. मला मंगला खाडीलकर यानी एकदा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या..
” एकदा आशा बाईंनी मला घरी बोलावलं मार्केटमध्ये जाऊन आम्ही भाजी घेऊन आलो अगदी भरपूर दोन पिशव्या भरून त्यांचे भाजीवाले ठरलेले. त्यांच्याशी उत्तम संवाद तोही त्यांच्या पातळीवर येऊन जणू काय त्या मैत्रिणी असाव्यात त्यानंतर घरी आल्यावर त्यांनी छान गरम भाकरी केली. ती टम्म फुगलेली भाकरी माझ्या पानात घालत त्या म्हणाल्या जेव त्याच्यावर लोण्याचा गोळा घातला आणि गरम भाकरी भाजी मला खाऊ घातली. ” असं अनेकांना आपल्या हातन करून खाऊ घालण्यात त्यांना खूप धन्यता वाटायची कारण त्यांच्यात एक छान गृहिणी लपलेली होती.
आपल्याला फक्त आवाजाची जादू असणारी आशा दिसते पण तसं नाही एक छान छोटी बहीण आपल्या अपंग असलेल्या भावावर नितांत प्रेम करणारी छोटी मुलगी हृदयनाथला सतत कडेवर घेऊन हिंडत असे ही आठवण खुद्द मंगेशकरांनी सांगितली ते म्हणाले, “आशा कधी कामाला मागे पडत नव्हती आम्ही आमच्या आजोळी आजीच्या घरी जायचं तेव्हा सगळ्यांचं टोपलं भर धुणं घेऊन आणि मला कडेवर घेऊन ती नदीवर जायची सगळ धुणं स्वच्छ धुऊन ती पाटी डोक्यावर घेऊन मला कडेवर घेऊन ती घरी येत असे आणि आजीला म्हणायची आजी मला खूप भूक लागली काहीतरी खायला दे त्यावर आजी त्यांना म्हणायची सारखं काय खायला लागतं ग तुला जा त्या डब्यात भाकरी आहेत तेल तिखट मसाला आहे घे आणि खा आणि तेल तिखट मसाला भाकरी हे जेवण अतिशय गोडीन त्या जेवत असत. ते म्हणाले तिने फार कष्ट काढले आहेत खूप संघर्ष केला आहे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तीने आपल्यावर घेतली आणि ती निभावली तिने खूप कष्ट केले आहेत”… हे सांगताना हृदयनाथांचा स्वर हळवा झाला होता हृदय नाथांना अखंड कडेवर सांभाळून घेणारी त्यांची बहीण आज गेली… सामान्य बाईचे दुःख भोगणारी वेदना सहन करणारी नवऱ्याच्या हिंसक वृत्तीला तोंड देणारी आणि त्यातून गरिबीत आपली मुले एका खोलीत राहून मोठी करणारी आशा पुढे महाराणी सारखी राहिली.
नकला करण्याचा एक विशेष गुण त्यांच्याकडे होता त्यामुळे बाबूजी आपल्याला कसे शिकवत असतात याची तर उत्तम नक्कल करायच्या ह्या गुणामुळे त्यांचे निरीक्षण खूप चांगले होते त्यामुळे पार्श्वगायनात आपलं गाणं कोणाच्या तोंडी जाणार आहे हे लक्षात घेऊन त्या गात असत हेलन बिंदू या कॅबिरे नृत्य करणाऱ्या अनेकांसाठी त्यांचा आवाज वरदान ठरला… त्यामुळे पिया तू अब तो आजा यासारखे गाणे आज आपण विसरू शकत नाही. लहान मुलांची ही गाणी त्यातही आशाताईंचा आवाज फिट होता. खतूबा ह्या गाण्यांमध्ये त्यांनी काढलेले वेगवेगळे आवाज हे गायन कलेच्या पलीकडचे होतेहे गाणे अलीबाबा चालीस चोर या चित्रपटातले असून पंचमदा त्यांच्या अनेक प्रयोगापैकी एक आहे गाण्याची सुरुवात अशी अरेबियन वगैरे हवी होती तेव्हा त्यांनी अरबी लोक लोकनृत्य करताना कसे ओरडतात ते पाहून त्या गाण्याची सुरुवात कशी केली… ते काही कवीने लिहिलेलं नव्हतं किंवा संगीतकाराने पण सांगितलेलं नव्हतं… तो त्यांचा स्वतःचा शोध होता. कवीचे शब्द आपल्या गाण्यातून लोकापर्यंत पोहोचवून त्याला न्याय देणं हे तर त्यांनी केलंच आहे पण शब्दशिवाय नुसत्या हमिंग वरती गाण म्हणलय देवानंद आणि नूतन सोबत चे एक गीत त्यामध्ये देवानंदला शब्द आहेत पण नूतन गाते ते हमिंग वर आहे ते पूर्ण शब्दाशिवाय च गाणं संवादाविना बोलू असे झाले आहे. इतकी ताकत त्यांच्या स्वरात आहे. बाबूजीं बरोबर गायलेली असंख्य मराठी गीत आपल्या मनात आणि घरात गोडवा भरून गेलेले आहेत. काल शेलार यानी शेवटची केलेली क्लिप त्यामध्ये त्या म्हणतात. ” मला हे दत्तगुरु दिसले “ह्या गाण्याचा कडव त्यांनी गायलं आहे मला वाटतं खरंच त्यांच्या परमेश्वर दिसत असावा नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं सगळं मिळालं पैसा अडका ऐश्वर्य प्रसिद्धी.. सगळं मिळवलं आता काही इच्छा नाही आता तृप्त आहे आता फक्त निघायचे… चार दिवसापूर्वी गाडगीळांशी बोलताना त्या म्हणाल्या माझ्या काही मुलाखत रेकॉर्ड केले असल्यास तर पाठव मला ऐकायचे आहेत आणि लवकर पाठव माझ्याकडे वेळ नाही बस एवढंच संभाषण झालं… मला वाटतं त्यांचा मृत्यू त्यांना समजला होता किंबहुना त्यांचं जगून झालं होतं. त्याना लक्षात आलंय असावे आणि म्हणून त्यांनी मनोमन परमेश्वराला हाक मारली असेल… जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे… अशा माणसांना आपण कधी थकले आहोत असं समजत नाही कारण ती आपल्याला हवी असतात आणि आपण त्यांना कधी विचारले नाही की बाबा रे खरच तू थकला आहेस का? का असं होतं हे माहित नाही पण होतं माथ्यावरती एकटीने पेललेलं संघर्षाचे, दुःखाचं ओझं वागवत ही बाई अत्यंत आनंदाने जीवन जगत आली. तिने आपल्या मुलांना एकच सांगितलं होतं गरीबीत जन्माला आलो तरी गरीबीत मरायचं नाही कारण गरिबीच्या यातना त्यानी भोगल्या होत्या त्या वेळा पाहिल्या होत्या, तो संघर्ष लढला होता, अशा एका संघर्षमय जीवनाचा काल अकस्मिक शेवट झाला. कोणाकडून फारशी सेवा न करून घेता अगदी सहजपणे त्या आपल्यातून निघून गेल्या पण त्यांची हजारो गाणी संपूर्ण विश्वामध्ये गाजली आहेत ती चिरंजीव आहेत त्यातून त्या आपल्याला रोज भेटणारच आहेत
अंतिम क्षणाला ब्रम्हा विष्णू महेश या सृजनकर्त्यापालनकर्त्या आणि विनाशकर्या परमेश्वराचा गोड स्वरात धावा करून त्यांच्याबरोबर सहज निघून गेल्या.. त्यांचा अंश होण्यासाठी! .. कदाचित लताबाई त्यांना तिथे भेटल्या असतील लताबाई त्यानी तेथे स्वागत केलं असेल. “अशा ये आलीस खूप दमलीस ग.. ” असं म्हणून त्यानी तीला मिठीत घेतल असेल दोन्ही बहिणींचे हे अपूर्व मिलन स्वर्गस्थ देवतांनी पाहून त्यांच्यावर नक्कीच पुष्पवृष्टी केली असेल. आशाबाई अजून काही वेळाने तुमचं पार्थिव शरीर पंचतत्वात विलीन होईल. पण तुमचा पंचतत्त्वात मिसळलेला ध्वनी, गोड आवाज, कधीही संपणार नाही तुमच्या प्रार्थना शाळेतील मुल गातील प्रेमी युगुल तुमचे प्रेम गीत गातील आया तुमची अंगाई गातील रसिका तरुण तुमचे कॅबरे ऐकतील कुणीतरी एखादी सलज्ज तरुणी तुमचं निगाहे मिलाने को जी चाहता है मनापासून गाईल आणि आपल्या प्रेमाकडे सलज्य नजरेने चोरून पाहिल केव्हा तरी पहाटे फसवून रात गेली आभाळा चांदण्याचे उसवून रात गेली हे सगळं तुम्ही अजरामर करून गेलात… आशाताई तुमच्या जीवन संघर्षाला तुमच्या मेहनतीला संकटना तोंड देऊन ताठ मानेने उभा राहणाऱ्या वृत्तीला तुमच्या गोड फिरत असलेल्या गळ्याला आणि भूतकाळ न विसरता सामान्य माणसासारखे आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसाची कदर करणाऱ्या तुमच्यासारख्या थोर कलावंताला साष्टांग दंडवत! तुमचा फक्त देह गेलाय जो आम्ही तुम्हाला समोरून कधी बघितलं नव्हतं आमच्यासाठी तुम्ही आहातच. काया नाही तरी नादा ने आहात.. तुमचा आवाज त्या आवाजातली फिरत शब्दांचा टोकदारपणा सारसार आमच्या कानात घुमत राहणार आहे लते बरोबर आशा नावाच विश्वाला पडलेले एक स्वप्न आज चांदण्यात विरून गेल. पृथ्वीवर पडणारा प्रकाश अधिक प्रखरं करून गेलं.!
आशाताई भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!
– समाप्त –
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





