डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!
ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…)
इथून पुढे – – –
या टपरीकडे पाहण्याचा आता माझा सुद्धा दृष्टीकोन बदलला… आता मलाही ते शॉपच वाटू लागले… दृष्टिकोनाचा फरक…!
चार काठ्यांपैकी, लहान बाळाच्या डोक्यावरून फिरवतात तसा हात त्यातल्या एका काठी वरून फिरवत ती म्हणाली, ‘इतकी वर्ष साथ दिली रे यांनी… यांना तू फेकायचं म्हणतोस…? ‘
या चार काठ्यांचे ऋण कसे फेडायचे? आधी फुटपाथ वर उघड्यावर राहत होते. घरातल्यांनी डोक्यावरचं छप्पर काढलं, पण याच चार बांबूंनी सावली दिली…
मी इथल्या लोकांना सांगून ठेवलं आहे, जेव्हा मी मरेन त्यावेळी तिरडी बांधताना याच चार बांबूंसह मला जाळा…!
माझ्या अंगावर काटा आला.
कृतज्ञता असावी तर अशी…
आजीची या कृतज्ञतेची भावना इतकी तीव्र आणि तीक्ष्ण होती की निर्जीव काट्यांना सुद्धा ती समजली असावी…
का कोण जाणे दर वेळी आलो की या काठ्या मला कायम झुकलेल्या दिसतात…!
तरीही अवसान आणून मी म्हणालो, ‘मी जिथे काम करतो तिथला साहेब चांगला आहे, मला तो बिनव्याजी कर्ज देईल, आपण हळूहळू कर्ज फेडू साहेबाचे… बघ तुझा फायदा होईल… आता आहे त्यापेक्षा आणखी जास्त सुख मिळेल…
मी खडा टाकत, चाचपडत, बुटाने जमीन टोकरत आजीशी खोटं बोललो…
कारण माझ्यातला भिक्षेकर्यांचा डॉक्टर काही माघार घेईना…!
वा रे वा तालेवार, आला मोठा कर्ज फेडणारा, असं म्हणून आजीनं छद्मीपणाने माझ्या तोंडासमोर गोल गोल हात फिरवला.
ती पुन्हा भाऊक झाली, तिच्या डोळ्यात पाण्याचे थेंब होते, ती म्हणाली, ‘ लेकरा या पांढऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरचे सुरकुत्यांनी जे मंत्र शिकवले ते आज तुला सांगते गाठ मारून ठेव’.
मी कान टवकारून ऐकायला लागलो
खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, ‘आयुष्यभर कोणाच्यातरी ऋणात रहा, पण कोणाच्या कर्जात राहू नकोस’… बघ… अर्थ कळतोय का…?
‘आयुष्यात जगताना दूरदृष्टी ठेवून जगावं… बाळा, दूरचं बघता यावं म्हणून निसर्गानं आपल्याला डोळे कपाळावर दिले आहेत, नाहीतर अंगठ्यालाच दिले नसते का…? … बघ समजतंय का…?
तीचे डोळे आता शून्याकडे लागले होते…
“शून्यातच कदाचित तिचा भूतकाळ असावा… “
बाळा, तू त्या काठ्यांबद्दल बोललास, ‘ अरे एखादं झाड फळ देत नसलं म्हणून काय झालं, सावली तर देतच की… म्हाताऱ्या माणसाला चालताना आधार देते ती ही काठीच असते… आपण ऋणात राहायचं असतं त्या सावलीच्या, मिळालेल्या त्या आधाराच्या…!
आंबा खाऊन लोक कोय फेकतात, अरे या कोयी वरच तर सगळा गर असतो… आणि कोय म्हणजे तरी काय तर बीज रे… या बीजाला काहीच किंमत नसते का रे? ती आकाशाकडे पाहत म्हणाली.
हे वाक्य तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित होतं हे मला कळायला वेळ लागला नाही
तु म्हणालास शॉप नीट केलं तर आणखी फायदा होईल, ‘पण बेटा कायम लक्षात ठेव फायदा हा कायम खाली असतो, म्हणून त्याला “उचलावं” लागतं… वाकावं लागतं… वाकलास की संपलास…!
‘अरे वाकायचं, पण त्यांच्यापुढे, जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, जे आपलं शुभ व्हावं म्हणून आपल्या मागेपुढे शरीराने किंवा मनाने उभे असतात, त्यांच्यापुढे वाकायचं, नव्हे लोटांगण घालायचं… मग ते सजीव असोत का निर्जीव…! ‘
‘शुभचिंतक खूप असतात… परंतु एखाद्याचे शुभ होऊ नये म्हणून चिंता करणारेच जास्त असतात, हे कायम लक्षात ठेव बाळा’
अवाक होऊन मी हे सगळं ऐकत होतो…!
‘अश्रूंना काही किंमत नसते, किंमत असते अश्रू पुसणाऱ्याला… हा जो अश्रू पुसणारा आहे ना, त्याला देव समजायचं, आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं बेटा’
मी नि:शब्द झालो, काय बोलावं मला पुढे कळेना.
शिक्षण फक्त वाचायला शिकवतं, आयुष्यात आलेले अनुभव जगायला शिकवतात हेच खरं…!
‘तू म्हणतोस शॉप आणखी मोठं करू, तुला सुख मिळेल… काही वर्षांनी वाटेल त्याला आणखी मोठं करू, हि महत्त्वाकांक्षा कधी संपणार आहे का…?
सिकंदर सारखा सिकंदर, सुख शोधता शोधता शेवटी जाताना हाताच्या मुठी उघड्या ठेवून गेला, सर्व असूनही मी काहीही वर घेऊन चाललो नाही हे त्याला सांगायचं होतं, आपण कोण रे बेटा…?
सुख मानण्यावर असतं बेटा…
आधी रस्त्यावर उघड्यावर झोपत होते, मच्छर चावायचे, आता रस्त्यावरच मच्छरदाणी लावून झोपते, आता मच्छर चावत नाहीत हे सुख नाही का…?
पुर्वी इथपर्यंत येताना हातात सामानाचे डबे घेऊन चालत, उठत, बसत, कण्हत यायचे…
आता जोडलेले कितीतरी गिऱ्हाईक लोक मला रिक्षाने किंवा त्यांच्या मोटरसायकलीवर आजी आजी म्हणत जागेवर सोडतात… माझा त्रास किती कमी झाला…
हे सुख नाही का…?
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असलेली पोरं रोज मला धंदा लावायला मदत करतात, माझं हे शॉप माझं नाही, ते त्यांचं समजतात हे सुख नाही का?
आई आजी काकू मावशी म्हणत रोज इथे लोक येतात, चार भिंतीच्या बाहेरही माझं एक कुटुंब आहे, हे सुख नाही का…?
माझ्या घरातल्या लोकांनी माझी जबाबदारी घेतली नाही, पण कोण कुठला तू गरिबा घरचा मुलगा… माझ्यासाठी तू कर्ज घ्यायला तयार झालास… हे सुख नाही का…?
बेटा सोन्या म्हणत इथल्या प्रत्येक माणसाला मी माझा मुलगा करून घेतला आहे, एकाच जन्मात इतक्या लोकांची आई होऊ शकले… हे सुख नाही का…?
अजून किती सुख मिळवायचं बेटा?
किती छोट्या छोट्या गोष्टीत आजी सुख शोधत होती.
सुखी माणसाचा सदराच आजीने माझ्या पुढे आणून ठेवला…
‘ बेटा कधीतरी कुठेतरी थांबावंच लागतं की, आयुष्यात पळताना ब्रेक कुठे लावायचं याचं भान राखता आलं पाहिजे सोन्या. नुसतं शिकलं म्हणून कोणी ज्ञानी होत नाही बेटा…
“काय करावं याचं भान म्हणजे ज्ञान… “
“आणि काय करू नये याचं ज्ञान म्हणजे भान… “
ऐकून मी स्तिमीत झालो…!
मी डॉक्टर, कधी काळचा अंतरराष्ट्रीय संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख…
हि आजी रस्त्यावर वडापावची गाडी चालवते…
तरीही हुशार कोण शहाणं कोण यातला भेद आज समजला…
सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो याची आजीने जाणीव करून दिली.
मी या माऊलीच्या पायाशी झुकलो, तिला नमस्कार केला.
खाली बसून मी वर तीच्या चेहऱ्याकडे पाहिले मला ती हिमालयाप्रमाणे उंचच उंच वाटली…!
मी तिला म्हणालो आजी तू हे शिकलीस कुठं…?
ती म्हणाली, पूर्वीच्या नववी पर्यंत माझं शिक्षण शाळेत झालं, थोडं वाचलं… बाकी जगाने न शिकवताच शिकवून दिलं…!
तोंडाला पदर लावत ती हसत म्हणाली.
पदराआडचं करुण हास्य बहुदा तिला मला दाखवायचं नसावं, मी समजून गेलो.
या स्वाभिमानी आजीला मी पुन्हा एकदा नमस्कार करून गाडीला किक मारली… तेवढ्यातूनही ती म्हणाली सांभाळून जा रे बेटा…!
यावेळी पाऊस नव्हता तरीही जुगलबंदी सुरू होती माझी आणि माझ्या डोळ्यांची…!
यानंतरही मी त्या बाजूला जायचो परंतु आजीच्या “शॉप” वर थांबायचो नाही, वडे करण्यात किंवा कोणाशी तरी बोलण्यात ती गुंग असायची.
मधल्या काळात मुद्दाम तिला भेटण्यासाठी चक्कर मारली, त्यावेळी आजीच्या शॉप ची जागा रिकामी होती.
मोटरसायकल थांबवून मी शेजारी आजी बद्दल विचारले, ते म्हणाले, ‘आजी गेली. ‘
कद्धी, मी जवळपास ओरडलो…
माझ्या पायाखालची जमीन सरकली…
तिथे छप्पर म्हणून असलेला फ्लेक्स नव्हता, फ्लेक्स ला टेकू देणाऱ्या त्या चारही काठ्या नव्हत्या…
अर्थातच त्यांची आहुती पडली असेल…
शॉप ओस पडले होते…
आजी, काकू, मावशी या शब्दांचा किलबिलाट तिथे नव्हता… झाडंच नाही तर पक्षी कुठून येणार…?
आता ती जाईल तिथे सोन्या बेटा म्हणत नवीन नाती निर्माण करेलच…
पण मी आणि माझ्यासारखे अनेक डिलिव्हरी बॉय पोरके झालो त्याचं काय…???
आजही मी त्या टपरीच्या / शॉपच्या रिकाम्या जागेभोवती फेऱ्या मारतो…
पण ती नसते… कुठेच नसते… कुठे कुठेही नसते…
तरीही काव काव करत मी घिरट्या मारत राहतो,
त्या जागेभोवती… पिंड शोधणाऱ्या त्या कावळ्यासारखा…!!!
– समाप्त –
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





