श्री संभाजी बबन गायके
☆ “माझी वारी ! माझा अनुभव !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
गोष्ट १९९७ मधली. माऊली हडपसरच्या दुपारच्या विसाव्यावरून दिवे घाटाकडे प्रस्थान करत्या झाल्या होत्या. सकाळपासून शहरात बंद असलेली बससेवा दुपारी काही अंशी सुरु झाली होती. त्यामुळे डेक्कन जिमखान्यावरून हडपसर गाडीतळापर्यंत बस मिळाली आणि दुपारी तीन वाजता दिवे घाटाच्या रस्त्याला लागता आले.
आभाळात तुरळक ढग होते आणि ऊनही होतंच. वातावरणात उष्मा दाटला होता. दिवे घाटाकडे जाणारी वाहने अर्थातच नव्हती. काही पाण्याचे tankers मात्र पुढे जाताना दिसत होते. तसाच चालत निघालो. वाटेत तहान लागली की रस्त्यावर उभ्या असलेल्या tanker मधले पाणी प्यायलो.. जे त्यातील जंतूनाशक औषधामुळे घशाखाली लवकर उतरत नव्हते.. पण इलाज नव्हता. एकतर त्या दिवशी एकादशी असल्याने सकाळी केलेल्या थोड्याशा फराळावरच दिवस ढकलला होता. दिवे घाटाच्या ओढीने पावले झपाझप पडत होती.
मागील काही वर्षे दिंडीसोबत पुणे ते सासवड आणि पुढे पंढरीपर्यंत पायी वारी घडल्याने घाटातील सुंदर वातावरणाच्या आठवणी मनात दाटून आलेल्या होत्या. वेगाने वाट चालणारे वारकरी, दिंडीची वाहने आणि टाळ मृदुंगाचा ध्वनी अजूनही कानांत घुमत होता. घाटाचा रस्ता काहीसा एका बाजूला उताराचा असल्याने उजव्या पायावर शरीराचे वजन आपसूक जास्त येते. पुढची दिंडी थांबली की आपल्यालाही थांबावेच लागते… त्यावेळी मांडीच्या खुब्याचे हाड आपल्याशी बोलू लागलेले असते. पण तिकडे फारसे लक्ष जात नाही. घाट हिरवागार आणि माणसांच्या अंगावरील वेशाने पांढरा शुभ्र दिसत असतो. त्यात पावसाची एखादी सर येऊन गेली की तो गारवा मनात आनंदाची बरसात करीत राहतो. माऊली… माऊली करीत वारक-यांचे जत्थे पुढे पुढे धावत असतात. पुण्यापासून सासवड हा टप्पा तसा बराच मोठा आहे.
वारीत दोन प्रकारची माणसे चालत असतात. ज्यांच्या स्वत:च्या स्वतंत्र दिंड्या आहेत, त्यांची मुक्कामांची जागा आधीच ठरलेली असते. इतर लोक मिळेल तिथे राहतात, खातात आणि वारीसोबत चालत राहतात. वारीत व्यवासायानिमित्त सहभागी असणा-या लोकांची, भिका-यांची संख्याही मोठी असते.
संध्याकाळचा अंधार जवळ येऊ लागला आणि सासवड जवळ येऊ लागले की दिंडीतील वारक-यांना एकत्रित चालणे गरजेचे होऊन जाते. अन्यथा गर्दीमुळे पुढच्या दिंडीत आणि आपल्या दिंडीमध्ये थोडे जरी अंतर पडले आणि चुकामुक झाली की त्या लाखोंच्या समुद्यात आपली दिंडी आणि तिची मुक्कामाची जागा सापडणे महामुश्किल होऊन जाते… असा अनुभव पाठीशी असतो. त्यामुळे सासवड जवळ येताच लगबग वाढते.
दिवे घाटमाथा ते सासवड पालखी तळ हेही अंतर मोठे आहे. त्यामुळे वारकरी लोकांची बरीच दमछाक झालेली असते. उपवास असल्याने तशी शारीरिक ताकद कमीच असते. पुण्यातील विश्रांतीनंतरचा हा मोठा टप्पा असल्याने वारकरी काहीसे थकलेले असले तरी मनात उत्साह मोठा असतो.
मी वेगाने चालत निघालो. आणि एका वळणावर मला वारका-यांचा एक गट चालताना दिसला. त्यांना गाठले तर पुढच्या वळणावर चक्क माऊलींचा रथ… घाटातील चढावर चढण्याच्या प्रयत्नात! आधी विश्वासच बसेना… जवळ जाऊन पाहता परिस्थिती लक्षात आली. त्यावेळी रथ बराच जड असे. बैलांच्या अनेक जोड्या लावून रथ ओढावा लागे. वारकरी मंडळी घाईत असल्याने रथाला ओलांडून केंव्हाच पुढे गेली होती. रथापुढे क्रमांक एकची दिंडीसुद्धा बरीच पुढे गेली होती. रथासोबत असलेल्या पाच-पन्नास लोकांनी, सेवेकरी, पोलिसांनी बैलांच्या जोडीने रथ वर वर ढकलत चालवला होता. माऊली! माऊली! असा गजर करीत एका एका चढाचे अवघड वळण पार केले जात होते… मी ही जमेल तसा हातभार लावला!
काही वेळातच पुढे चालणारा जनसमुदाय आणि पालखी रथ यांच्यात योग्य समन्वय साधला गेला. सासवडची भजनी मंडळी घाटाच्या माथ्यावर स्वागतासाठी दिंडी घेऊन आलेली होती… माऊली आता सासवडच्या वेशीतून प्रवेश करत्या झाल्या होत्या!
घाटाच्या शेवटच्या टोकावर पुण्यातल्या अनेक व्यापा-यांनी त्यांच्या मालगाड्या आणून आधीच उभ्या करून ठेवल्या होत्या… आणि त्यांच्या मार्फत वारक-यांना फराळाचे पदार्थ, उपयोगी वस्तू यांचे मुक्तहस्ते वितरण सुरु होते… !
मला पुण्यात तसेच रात्री माघारी यायचे होते. याच मालट्रकमधून येण्याची परवानगी एका चालकाने दिली. अंधार पडू लागला होता. मालट्रक परतण्याच्या तयारीत होते. एवढ्यात मला घाटातून खालून तीन आकृत्या चालत येताना दिसल्या… दोन महिला आणि एक वयस्कर पुरुष! पुरुषाच्या पायात काटा रुतल्याने त्यांचा पाय सुजला होता. पत्नी आणि सूनबाई यांच्या साहाय्याने ते वारकरी गृहस्थ एवढा मोठा घाट चढून आले होते… म्हणून त्यांना एवढा उशीर लागला होता!
यावेळी पुण्यातून सासवडकडे दिवे घाट मार्गे वाहनांची वाहतूक पूर्ण बंद असते. पण कसा कुणास ठाऊक एक मिनीट्रक मागून येताना दिसला… ! मी त्या वाहनाला आडवा होत वाहन अडवले. चालक नाखुशीनेच थांबला… वाहनाच्या मागच्या बाजूने त्या वारकरी बाबांना वर चढवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्यांच्या पायाला मोठी सूज, वेदना असल्याने त्यांना वेळ लागला… बाबांना वर चढता आलेच नाही.. आणि का कुणास ठाऊक त्या चालकाने त्याचे वाहन पुढे दामटले… आम्ही आवाज देत राहिलो… पण तो चालक वाहन घेऊन निघूनही गेला! त्या दोन महिला आणि ते वारकरी बाबा खालीच राहिले… तेथून त्यांचा सासवड मुक्काम किमान चार-पाच किलोमीटर्स तरी दूर असावा!
मी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बाबांनी मला तोंडभरून आशीर्वाद दिला… आणि म्हणाले… ”असू दे, बाळा! माऊली घेऊन जातील आम्हांला!” आणि असं म्हणत ते तिघेही हळूहळू सासवडच्या दिशेने निघाले. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. माझ्याकडे असलेले फराळाचे पदार्थ त्यांच्या हाती सोपवले!
अंधारून आले होते… मागून एकही वाहन येताना दिसत नव्हते. मी त्या तिघांच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात राहिलो… माझे वाहन पुढे निघाले! घाट उतरेपर्यंत वर येणारे एकही वाहन नजरेस पडले नाही! ती तीन माणसं त्यांच्या मुक्कामाला किती वाजता, कशी पोहोचली असली असतील हा एकच विचार मनात सातत्याने येत राहिला! माउलींनी त्यांना सुखरूप नेले असेलच याची खात्री होती!
दरवर्षी पुण्यातून माऊली दिवेघाटाकडे निघतात तेंव्हा त्या तीन वारक-यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही! रामकृष्णहरी!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

