श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘वादळांना दिशा नसते.. जहाजांना असावी लागते’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
वादळांना दिशा नसते; जहाजांना असावी लागते
मनाच्या सागरात ध्येयाचा दीपस्तंभ उभा राहिला की नकारात्मक विचारांचे धुके विरायला लागते.
“मानवी इतिहासातील प्रत्येक महान प्रवासाचा आरंभ एका दिशेपासून झाला आहे. “
समुद्राला वादळांची भीती नसते.
वादळं त्याच्या स्वभावात असतात.
प्रत्येक वादळानंतर काही जहाजं किनाऱ्यावर पोहोचतात आणि काही समुद्रात हरवून जातात.
भेद लाटांमध्ये नसतो.
जहाजांच्या डोळ्यांत असतो.
ज्यांच्या दृष्टीपुढे दीपस्तंभ असतो, ती जहाजं धुक्यातही मार्ग शोधतात.
ज्यांच्या दृष्टीपुढे निश्चित दिशा नसते, ती शांत पाण्यातही भरकटतात.
मनाचंही असंच असतं.
भूतकाळाची खंत,
भविष्याची भीती,
स्वतःबद्दलच संशय,
“माझ्याकडून काही होणार नाही… “
“माझी वेळ निघून गेली… “
“लोक काय म्हणतील?”
हे असले विचार नवीन नाहीत. मानवजातीइतकेच पुराण आहेत.
पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे—ते रिक्त मनातच सर्वाधिक वाढतात.
रिकाम्या घरात प्रतिध्वनी अधिक ऐकू येतात.
रिकाम्या बंदरात वाऱ्यांचा ध्वनी मोठा वाटतो आणि रिकाम्या मनात शंका सत्यासारख्या वाटू लागतात !
मानसशास्त्र सांगतं— मनाला जर अर्थपूर्ण दिशा मिळाली नाही, तर ते स्वतःच चिंता निर्माण करू लागतं.
नकारात्मक विचारांचा सर्वात मोठा शत्रू सकारात्मक विचार नसतो, तो असतो—अर्थपूर्ण कृती.
संत तुकारामांचा अभंग आजही काळाच्या पल्याडून ऐकू येतो—”मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ”
ही ओळ आनंदाचा उपदेश नाही,
ही ओळ दिशेचा उपदेश आहे –
प्रसन्न मन म्हणजे दुःख नसलेलं मन नव्हे; प्रसन्न मन म्हणजे दुःखापेक्षा मोठं ध्येय सापडलेलं मन !
काळ्या पाण्याची शिक्षा.
समोर अथांग जलधी.
भोवती अभेद्य भिंती.
हाता – पायात निर्दय शृंखला.
जगाशी संबंध तुटलेला.
पण त्या अंधाऱ्या बंदिगृहातही एक गोष्ट जिवंत होती—स्वातंत्र्याचं ध्येय.
ज्यांनी सागराला स्वातंत्र्याची शपथ घेतली, त्यांना समुद्राच्या मधोमध उभारलेल्या कारागृहाने कसं रोखलं असतं?
साखळदंडांनी केवळ हात जखडले, विचार नाही.
भिंतींनी शरीर अडवलं, क्षितिज नाही.
ज्यांच्या मनात ध्येयाचे स्थंडिल धगधगत असते त्यांना परिस्थिती हरवत नाही; ती केवळ त्यांची परीक्षा घेते.
एक राजपुत्र राजवाडा सोडून निघाला.
एका कृश वकिलाने ‘सूर्य कधीही न मावळणाऱ्या’ साम्राज्याच्या डोळ्यात डोळे घातले.
एका बहिष्कृत मुलाने शिक्षणाच्या बळावर इतिहासाला नवा अर्थ दिला.
एका मासेमाऱ्याच्या गावात वाढलेल्या मुलाने आकाशाला स्पर्श करण्याचं धाडस केलं.
इतिहासातली मोठी माणसं मोठ्या परिस्थितीत जन्माला आली म्हणून मोठी झाली नाहीत. ती मोठी झाली कारण त्यांच्याकडे स्वतःपेक्षा मोठं ध्येय होतं.
ध्येय म्हणजे केवळ ‘करिअर’ नाही.
ध्येय म्हणजे सकाळी उठण्याचं कारण, रात्री झोपण्यापूर्वीची शांतता.
ध्येय म्हणजे पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याचं मनोबल आणि उद्याच्या दिशेने टाकलेलं आजचं पाऊल.
ध्येय म्हणजे अंतिम गंतव्य नाही.
ध्येय म्हणजे प्रवासाला मिळालेला उत्तरतारा.
तो वादळं थांबवत नाही, पण तो भरकटूही देत नाही.
नकारात्मक विचारांना हरवायचं असेल तर त्यांच्याशी झुंज देण्यात अर्थ नाही.
अंधाराशी भांडून का कधी प्रकाश निर्माण होतो ?
तिथे दिवाच लावावा लागतो !
तुमचं ध्येय लिहून ठेवा.
त्याचे लघु लघु भाग करा.
प्रत्यही एक पाऊल टाका.
प्रत्येक भीतीला विचारा—”तू सत्य आहेस, की केवळ माझी कल्पना?”
मनाला जर काम दिलं नाही, तर ते झालेले व्रण मोजत बसतं.
मनाला दिशा दिली नाही, तर ते भीतीचे नकाशे काढत राहतं. मनाला ध्येय दिलं नाही, तर ते शंकांची शेती करू लागतं.
समर्थ रामदासांच्या अश्वासक वचननांचा ध्वनी आजही कानी निनादतो —”केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे. ”
त्याच वेळी जीवन कुठेतरी हळूच गुणगुणत राहतं—”रुक जाना नहीं… “
जीवनात पराभव नसतात, असतात केवळ दोन प्रकारचे प्रवासी—एक ते, जे चक्रावून वादळांकडे पाहतात, आणि दुसरे ते, जे एकटक दीपस्तंभाकडे पाहतात.
अखेर माणूस जगतो तो केवळ श्वासांवर नाही…
तो जगतो एखाद्या अपूर्ण स्वप्ना च्या पूर्ततेसाठी,
एखाद्या अजून न गाठलेल्या क्षितिजासाठी,
एखाद्या अजून न लिहिलेल्या इतिहासासाठी.
ज्या दिवशी माणसाला स्वतःपेक्षा मोठं असं एखादं ध्येय सापडतं, त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील सगळे प्रश्न सुटतात असं नाही,
वादळं थांबतात असं नाही,
धुकं विरत असही नाही,
पण त्याला प्रश्नांपेक्षा मोठा मार्ग सापडतो !
अनेकदा—मार्ग सापडणं हे उत्तर सापडण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं.
म्हणून मनात वादळ उठलं, तर वाऱ्यांना दोष देऊ नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा—”माझ्या समुद्रात दीपस्तंभ आहे का?” कारण…
वादळांना दिशा नसते, जहाजांना असावी लागते!
वादळं येतील.
धुकं दाटेल.
लाटा आदळतील.
पण जर दीपस्तंभ जळत असेल,
तर जहाजं हरवत नाहीत.
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





