शालिनी जोशी
विविधा
☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी ☆
यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे. रविवार तारीख १७ मे ते सोमवार दिनांक १५ जून २०२६ हा तो कालावधी. त्याविषयी थोडी माहिती.
भारतीय कालगणना चांद्र- सौर पद्धतीवरती आधारित आहे. म्हणजे महिन्यांची गणना चंद्राच्या गतीवर आणि ऋतूंची मांडणी सूर्याच्या गतीवर आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला एक महिना लागतो. तोच चंद्रमास- तिथी हे एकक. एका महिन्यात ३० तिथी होतात. अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदेपासून पुढील अमावस्येपर्यंत एक चंद्रमास होतो. हा साधारण २९•५ दिवसाचा असतो. म्हणून बारा महिन्यांचे २९•५ × १२ = ३५४ दिवस होतात. यानुसार सण ठरतात. चंद्र रोज वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राच्या जवळ असतो ते नाव त्या महिन्याला दिले जाते. उदाहरणार्थ चित्रा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तर तो चैत्र महिना. विशाखा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तो वैशाख.
पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणारा काळ हा साधारण ३६५ दिवसांचा. हे सौर वर्ष. यानुसार ऋतू ठरतात. त्यामुळे दोन्ही पद्धतीत अकरा दिवसांचा फरक पडतो. सण दरवर्षी ११ दिवसांनी मागे सरकतात. हे असेच सुरू राहिले तर चैत्र हिवाळ्यात किंवा दिवाळी उन्हाळ्यात येईल. ऋतू आणि सण जुळणार नाहीत. ही विसंगती टाळण्यासाठी अधिक महिना ही संकल्पना. चांद्र वर्षात दोन वर्ष आठ महिन्यांनी, सण तीस दिवस मागे पडतात. म्हणून तिसऱ्या वर्षी एक अधिक महिना घेतला जातो. त्यामुळे सण व ऋतू यांचा मेळ बसतो. सूर्याच्या भासमान मार्गावर बारा राशी. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो. मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो तो चैत्र महिना असतो. मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश वैशाख महिन्यात. या बदलाला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. काही वेळा अशी स्थिती येते की एका चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही म्हणजे संक्रांत येत नाही. ती पहिली अमावस्या संपण्यापूर्वी आणि दुसरी अमावस्या संपल्यानंतर येते. असा महिना अधिक ठरतो. उदाहरणार्थ आत्ताचा अधिक महिना जेष्ठ.
सूर्याचा वृषभ राशी प्रवेश शुक्रवार १५ मे ६:२१ मिनिटांनी आहे. नंतर अमावस्या रविवार तारीख १७ मे मध्यरात्री १:३१ ला संपते. आणि नंतरची अमावस्या १५ जून सकाळी८:२५ ला संपते. नंतर सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशी प्रवेश होतो. म्हणजे या महिन्यात सूर्याचा राशी बदल नाही म्हणून हा अधिक मास. जेष्ठ अधिक मास आहे.
आणि पुढील नीजजेष्ठ आहे. सणवार नीज ज्येष्ठात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मागे आलेले सण पुढे जातात. उदाहरणार्थ गेल्यावर्षी १० जूनला असलेली वटपौर्णिमा २९ जूनला येणार. म्हणजे चंद्राचा महिना लहान व सूर्याचा मोठा तेव्हा अधिक मास.
अधिक टाकले म्हणून त्याला मलमास, अशुभ अपवित्र मानले गेले. तेव्हा तो व्यथित होऊन देवाकडे गेला. विष्णूला शरण गेला. विष्णूने श्रीकृष्णाकडे पाठवले. पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाने त्याला स्वीकारले. म्हणून तो पुरुषोत्तम मास झाला. पवित्र, व्रत- वैकल्याचा महिना झाला. मुलगी व जावई लक्ष्मीविष्णू मानून त्याना वाण देण्याची प्रथा आहे. एकंदरीत संयम, नम्रता, आदर यांनी युक्त होऊन कुटुंबासाठी, समाजासाठी श्रेयस्कर काही करणे हे या महिन्यातील कर्तव्य समजावे. सातत्य महत्त्वाचे. पुरुषाकडून पुरुषोत्तमाकडे वाटचाल हा अधिक मासाच्या व्रतांचा उद्देश समजावा.
विज्ञान दृष्टीने हा चंद्र, सुर्य, पृथ्वी यांचा खेळ आहे. सण आणि ऋतु यांच्यात एकवाक्यता केली आहे. आपली सौर-चांद्र पद्धत खगोलशास्त्रावर आधारित आहे. दोन्ही कालगणनांशी जुळणारी सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि खगोलीय सुत्रबद्धता असलेली अशी ही तर्कशुद्ध मांडणी आहे.
(श्री. विनय जोशी आणि श्री. हेमंत मोने यांचे लेखावरून)
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






