श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (या सदरातील अखेरचा भाग)

माझ्या अजाण वयापासूनच्या विविध टप्प्यांवरचे हे सगळे अनुभव ‘त्या’चा कृपालोभ म्हणजे काय याची पुन्हा नव्याने प्रचिती देणारे साक्षात्कारच होते माझ्यासाठी!

‘देव’ ही मानवनिर्मित संकल्पना आहे. तो अस्तित्वातच नसतो. तो आहे असं मानणं हा एक भ्रम आहे’ असं आग्रहाने सांगणाऱ्यांची भूमिका माझं वय वाढत गेलं तसं अनेकदा ऐकता, वाचताना माझ्या मनात संभ्रम नाही पण प्रश्न मात्र निर्माण करायचीच. पण त्या प्रश्नांची उत्तरं अट्टाहासानं लगेचच मिळवावीत आणि ती टोकाची मते खोटी ठरवावीत अशी असोशी माझ्या मनात कधी निर्माण झाली नाही तरी त्यातलं तथ्य समजून घ्यावं असं, माझं वाचन वाढत गेलं तसं मला मनापासून वाटू लागलं हेही खरंच. हे समजून घ्यावं असं वाटणंच पुढे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात असणारी पुसटशी अंधूक रेषा माझ्यापुरती अधिकाधिक ठळक व्हायला निमित्त झाली. अर्थातच हे सगळं एका क्षणात घडून गेलेलं नाही. तरीही ते घडायला निमित्त झालेले एक एक क्षण मात्र मी समतोल मनाने स्वीकारल्यामुळे माझ्यासाठी ते हितकारक ठरले एवढं मात्र नक्की. या संदर्भातला एक प्रतिनिधिक अनुभव पुढे लिहिण्याच्या ओघात येईलच.

सुरुवातीच्या माझ्या अनुभवांबद्दल यापूर्वी सविस्तर लिहिल्याप्रमाणे माझ्या नकळत्या अजाण वयातच माझ्या बालमनात आजुबाजूचं वातावरण आणि घरातले संस्कार यामुळे माझ्याही नकळत ‘त्या’ची प्रतिष्ठापना झालेली होती! त्याची जाणिव अर्थातच पुढे आयुष्यातल्या कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांमध्ये हळूहळू दृढ होत गेली.

माझ्या मनातलं ‘त्या’चं हे आश्वासक अस्तित्व माझ्या आजवरच्या जीवनप्रवासातला माझा श्वासच कधी आणि कसं बनलं ते मलाच समजलं नव्हतं! तोच श्वास पुढे माझी घुसमट व्हायची वेळ आलेल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात माझ्यासाठी संजीवक ठरत असायचा! !

‘श्रध्दा’ म्हणजे तरी वेगळं काय असतं? ‘तो’ आहे हा मनोमन असणारा ठाम विश्वास म्हणजेच तर श्रध्दा! ‘देव’ आहे की नाही हा संभ्रम माझ्या मनात निर्माण व्हायची वेळ जशी कधीच आली नाही तसेच ‘तो’ आहे हे इतरांना अट्टाहासाने पटवून द्यावे असंही मला कधी वाटलं नाही.

खरंतर देवाचं अस्तित्व मानणं किंवा न मानणं हा माझ्यापुरता मी ज्याचा त्याचा प्रश्नच मानला. म्हणूनच असेल कदाचित पण जवळचे अनेक मित्र आणि नातेवाईक नास्तिक असूनही आमचे परस्परसंबंध सलोख्याचेच राहिले. किंबहुना माझ्या मनातली श्रद्धा तिच्यावर अंधश्रद्धेची सावली पडू न देता अलवारपणे जपणं मला त्या सर्वांमुळेच सुलभ झालं असं मला मनापासून वाटतं.

माझ्या मनातल्या या श्रद्धेचं एरवीच्या दैनंदिन जीवनात मला कधीच प्रदर्शन करावं असं वाटलं नाही. कारण माझी श्रध्दा ही माझ्या हाडामांसासारखीच एक नैसर्गिक गोष्ट आहे असंच मला वाटायचं. त्यात आवर्जून मिरवावं असं वाटण्याचा प्रश्नच नव्हता.

मी जसा कधी कर्मकांडात रुतलो नाही तसंच माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं हेच माझे सतत प्राधान्यक्रम राहिले. त्यामुळे अट्टाहासाने अध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आवर्जून करावं अशी ओढ मला असोशीने कधी वाटलीच नाही. त्यांचं वाचन झालं ते केवळ गरजेनुसार संदर्भ पहाण्यापुरतंच. तरीही लेखनाइतकीच मला वाचनाचीही आवड होती आणि त्या वाचनात नकळत आलेल्या विविधतेमुळे मी त्या त्या वेळी आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त झालो हे आवर्जून सांगायलाच हवं!

अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री जी. के. प्रधान यांचे पुस्तक मला प्रभावित करून गेले होते. श्री. हिराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्व मला समजून सांगितलेलं होतं. श्री. संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा तपासून पहायला मला प्रवृत्त केले आणि पुढेही माझ्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कामही केले. श्री नरेंद्र दाभोळकरांच्या ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’, ‘भ्रम आणि निरास’, ‘उच्चाटन अंधश्रद्धेचे’ यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसट रेषा अधिक ठळक केली. हे सगळंच मला समृध्द करायला निमित्त ठरलेलं आहे!

श्रद्धेवर नकळत पडणारं अंधश्रद्धेचं सावट हळूहळू अधिक गडद होत जाण्याची प्रक्रिया सद्सदविवेकाच्या टोचणीनंतरही आपण सजगतेने थोपवू शकलो नाही तर मनातली श्रद्धा प्रदूषित व्हायला आपोआपच सुरुवात होते. हे अशिक्षितांच्या बाबतीतच नाही तर शिकलेल्या, सुजाण म्हणवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही नकळत कां होईना पण सर्रास घडत असते. यासंदर्भातला माझा एक अनुभव आवर्जून सांगायलाच हवा असं मला वाटतं. तो तसा अगदी साधाच अनुभव पण आपली त्याकडे पहाण्याची दृष्टी स्वच्छ असली तर साध्या साध्या गोष्टीही आपल्याला बरंच कांही शिकवून जातात याचा प्रत्यय देणारा!

माझं पोस्टिंग कोल्हापूर ब्रँचला होतं तेव्हाचा हा प्रसंग. साधारण १९७८-७९ दरम्यानचा. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आमचं बि-हाड होतं. रोजची देवपूजा म्हणजे फुले हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? हाच विचार तेव्हाच्या अननुभवी वयात माझ्या मनात खोलवर रुजलेला होता. आणि ती जागाच अशी होती की निदान एखाद्या कुंडीत फुलझाडाचं रोप लावावं एवढीही जागा घराभोवती कुठे नव्हतीच. त्यामुळे पूजेसाठी फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्यात मला कांही गैरही वाटलं नव्हतं. फुलवाला पहाटेच कधीतरी फुलपुडी आणून शटरमधून आत टाकून जायचा. त्यामुळे सकाळी उठल्यावर चूळ भरुन मी आधी फुलवाल्याने टाकलेली ती फुलपुडी आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ती फुलपुडी आत आणायला मी गेलो तर मला ती कुठे दिसेचना. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की ती फुलपुडी बंद दाराच्या जवळच ठेवलेल्या छोट्या शूज स्टॅंडवरच्या माझ्या बुटाच्या खाचेत पडलीय. मी नाराज झालो. पण तरीही ती फुलपुडी उचलून आत आणली आणि त्या फुलांवर पाणी शिंपडून फुलं तबकात नेऊन ठेवली. आंघोळ आवरून पूजेला बसलो. देव पुसून ताम्हनात ठेवले. गंध लावलं. आणि नेहमीच्या सवयीनं देवाला वाहण्यासाठी तबकातली फुले हातात घेतली. आणि… क्षणभर थबकलो. ती फुलं देवाला वाहावीत असं वाटेचना. हातातली फुलं तशीच परत तबकात ठेवली. देवाला फक्त हळद-कुंकू वाहिलं आणि निरांजन लावून नैवेद्य दाखवला. कांहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होती पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली पुसट रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो म्हणतात. पण माझ्या बुद्धीनेच त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पहाणाऱ्या माझ्या मनाला सावरलं. योग्य आणि अयोग्य यांच्यातल्या फरकाची नेमकी जाणीव करून दिली. पूजेला फुलं न मिळाल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीनं अलगदपणे दूर केली. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं. केवळ उपचारापेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. मी अलगद डोळे मिटले. हात जोडले. आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,.. ‘देवा, आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारात एखाद्या लहानशा कुंडीत कां असेना पण चार-दोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहिन. “

पुढे जवळजवळ पंधरा- सोळा वर्षांनंतर १९९३ साली आम्ही सांगलीतल्या गावभागातल्या आमच्या स्वतःच्या फ्लॅटमधे रहायला गेलो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमधे निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तियुक्त अंत:करणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली, तेव्हा मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना माझ्या मनाला आत्यंतिक उल्हसित करुन गेली होती!

२००६ पासून आम्ही हरिपूर रोडवरील ‘त्रिदल’ या आमच्या नवीन वास्तूत रहायला आलो. आता सभोवतालच्या प्रशस्त बागेत विविध रंग, रूप, वासांच्या फुलांनी दोन-तीन मोठ्या परड्या तुडुंब भरतील एवढी फुले रोज मिळतात आणि तेवढीच झाडावेलींवर शिल्लकही असतात. त्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरांमधल्या आणि जवळच्या मंदिरामधील ‘त्या’च्यापर्यंत रोज पोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो! देणाराही तोच असतो आणि घेणाराही तोच! पण त्यात आपलं असं निमित्तमात्र असणंही किती सुखदायी असतं याच्या अनुभव मला रोज नव्याने येतो आहे! !

‘त्या’ला एकदा मनोमन मानल्यानंतर नकळत सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या प्रक्रियेतील या सगळ्या वाटा आणि वळणे! या प्रवासात या प्रत्येक टप्प्यावर ‘तो’ माझ्याबरोबर असायचाच. त्यामुळे अनेकांना पडतात तसे ‘तो कोठे आहे? ‘ ‘कसा आहे? ‘ हे प्रश्न मला कधीच पडायचे नाहीत. ‘तो’ आहे हेही माझ्यापुरतंच असायचं! इतरांनीही ते स्वीकारावं असं मला कधीच वाटलं नाही. मी माझ्याही नकळत जीवनाचं गणित सोडवण्यासाठी माझ्या नकळत्या वयापासून ‘त्या’चं असणं हे असं एक गृहीतच मानत आलो. आज हे गृहीत चुकलेलं नाहीय याची आजवरच्या अनुभवांती मला पूर्ण खात्री पटल्यानंतर आपल्या जीवनाचं गणित अचूक सुटणार याचा पूर्ण विश्वास मला वाटतो आहे!

‘तो’ माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्याच मनामनात अंश रुपाने असतोच. म्हणूनच ‘त्या’ला अंतर्यामी म्हणतात ना? ‘त्या’चं रंगरुप त्या प्रत्येकाच्या श्रध्दा आणि विचारांनुरुप वेगवेगळं असतं एवढंच. त्या वेगवेगळ्या रुपातला ‘तो’ प्रत्येक आस्तिकाच्याच नव्हे तर नास्तिकाच्या मनातही असतोच. त्यातील कुणाला त्याची जाणिव असो वा नसो. केवळ असा प्रत्येकाच्या अंतर्यामीच नव्हे तर चराचरातल्या प्रत्येक कणाकणात अंशरुपाने भरुनसुध्दा ‘तो’ वर अंगुलीभर उरतोच! !

‘त्या’च्याच साक्षीने मी माझ्या मनातल्या ‘त्या’चा आजवर घेतलेला हा मागोवा!

 या निमित्ताने माझ्या ओंजळीत साठलेली ही सगळी सुगंधी शब्दफुले मी आज अतिशय विनम्र आणि कृतज्ञभावाने ‘त्या’च्याच चरणी अर्पण केलीयत हीच भावना याक्षणी माझ्या मनात आहे!

 – पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted