शालिनी जोशी
विविधा
☆ परकाया प्रवेश ☆ शालिनी जोशी ☆
‘परकायाप्रवेश’ हा शब्द आपल्या नेहमीच्या वापरात अजिबात नाही. पुराणकथात, गोष्टीत कधीतरी ऐकलेला, वाचलेला. अलीकडेच नीना कुलकर्णी यांचे ‘अंतरंग’ वाचत होते. ‘अंतरंग’ हा लोकसत्तेतील अंतरंग या सदरात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. त्यामध्ये एका लेखात नाटकातील काम हा परकाया प्रवेश असतो असे वाचले. आणि माझे मनात विचारांचे काहूर उठले.
स्वतःचा देह बाजूला ठेवून आत्मरूपाने दुसऱ्याच्या देहात केलेला प्रवेश म्हणजे परकाया प्रवेश. हा काही काळापुरता असतो. पण प्रवेश केलेल्या व्यक्ती सारखे वागणे, बोलणे साधावे लागते. परकायाप्रवेश ही एक सिद्धि आहे. खरंच नट तरी वेगळे काय करतो? जी भूमिका त्याला वटवायची असते तिला योग्य कपडे तो धारण करतो. त्याला योग्य चेहरा रंगवून घेतो. त्या भूमिकेचे वागणे, बोलणे, हालचाली आत्मसात करतो. तिचे जीवनच तो आपल्या पुढे उभे करतो. त्या पात्राच्या भावना हालचालीतून, चेहऱ्यावरील भावातून व्यक्त करण्यासाठी तो नट आपला मूळचा व्यवसाय, गुण, रूप, घरदार, वागणूक काही काळा पुरते का होईना विसरतो. असे त्या नाटकातील भूमिकेशी एकरूप होणे म्हणजेच पर काया प्रवेशच नाही का? काही काळापुरता, नाटकाच्या तीन तासा पुरता. असे साधले तरच लोक भूमिका चांगली वठली म्हणून कौतुक करतात. येथे तरुणाचा म्हाताऱ्यात, राजाचा भिकाऱ्यात किंवा तरुणाचा तरुणीत परकायाप्रवेश होत असतो.
सिनेमा, सिरीयल ची गोष्ट थोडी वेगळी असते. तिथे अभिनय साधला नाही तरी रीटेक असतो व समोर प्रेक्षक नसतात. पण नाटक म्हणजे प्रेक्षकांसमोर केलेला जिवंत पर कायाप्रवेश.
आणखी विचार करता, असे लक्षात आलं एखाद्या व्यक्तीविषयी लिहिताना त्या व्यक्तीशी एकरूप व्हावं लागतं. स्वतःला बाजूला ठेवून, त्या व्यक्तीचे विचार, बोली, मते यांचा विचार करावा लागतो. त्या भूमिकेत शिरलं तरच ते शब्दचित्र रंगवता येत. हीच गोष्ट काव्य निर्मितीचे बाबतीत असते. कवी जेव्हा आपल्या सर्व कथा- व्यथा बाजूला ठेवतो, तेव्हाच रसदार, सत्य, काव्य निर्माण होतं. असा हा परकाया प्रवेशाचा अर्थ मी लावला. तो सोपा नसतो. कवी, लेखकांना तो साधतो. दुसऱ्याच्या अंतरंगात त्यासाठी प्रवेश करावा लागतो. मग पक्षी, वारा, झाडे यांच्या मनातले कळते.
एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याचा दुसऱ्याच्या शरीराच्या प्रवेश ही सिध्दी श्री शंकराचार्य याना साध्य होती. म्हणूनच मंडण मिश्र यांच्या पत्नीने शंकराचार्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी परकाया प्रवेश केला होता. अशा आणखीही गोष्टी सांगतात.
आपण एवढे समजू शकतो की वर्णन करावयाच्या वस्तूचे, व्यक्तीचे गुणदोष, सुख, दुःख व्यक्त करण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. स्वतःला काही काळ विसरावे लागते. हाच परकायाप्रवेश. लेखकांच्या कवींच्या मध्ये सहजच हा गुण असतो. म्हणून त्यांचे लिखाण, हावभाव हृदयाला भिडतात, मनाला भावतात.
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




