सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
सत्संग-सज्जन प्रशंसा
परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण, भक्ती, सेवाभाव याबरोबरच सत्संग या गोष्टीला तितकेच महत्त्व दिल्याचे आपल्याला गाथेतील अभंगांतून दिसून येते. उच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गातील काही मंडळींकडून तुकाराम महाराजांना अतिशय त्रास दिला जात होता. आम्ही वेद पंडित, शास्त्राचा अभ्यास केलेले, म्हणून आम्हीच अध्यात्माचे जाणकार असे समजून जे समाजातील खालच्या वर्गाचे समजणाऱ्या लोकांना फार पीडा देत असत अशा पाखंडी वर्गावर तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून चांगलेच ताशेरे मारले आहेत.
ब्राह्मण असो की वैश्य असो अथवा शूद्र, संत सज्जन कोणाला म्हणावे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
हिरा ठेविता ऐरणी/ वाचे मारिता जो घणी /
तोची मोल यावे खरा/ करणीचा होय चुरा//
मोहरा तोची अंगे/ सूत न जळे ज्याचे संगे/
तुका म्हणे तोचि संत/ सोसो जगाचे आघात//
संत कसे असतात तर, जो हिरा ऐरणीवर ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही. तोच हिरा
मौल्यवान आहे दुसरे इतर बनावट काचेचे तुकडे असतात कारण ते घाव घालताच त्यांचा चुरा होतो. ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असता सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. त्याचप्रमाणे जो जगाने दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्याला संत म्हणावे.
ते संतांचा महिमा वर्णन करतात.
सकळ चिंतामणी शरीर/ जरी जाय अहंकार समूळ आशा/
निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी/ निर्मळ स्फटिक जसा.//
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/ येती तया पासी अवघे जन//
तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/ मोक्ष तेणे दर्शने//
मन शुद्ध तया काय करीसी माळा/
मंडित सकळा भूषणासी//
हरीच्या गुणे गर्जताती सदा/
आनंद तया मानसी//
तन मन धन दिले पुरुषोत्तम/ आशा नाही कवणाची//
तुका म्हणे तो परीसाहुनी आगळा/
काय महिमा वर्णू त्याचा//
या अभंगात तुकारामांनी संतांची लक्षणे सांगितली आहेत. चित्त शुद्ध असलेल्या संतांबद्दल तुकाराम महाराज गौरवाने बोलत आहेत की ज्याचा अहंकार गेला आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी याचा वास त्यांच्यात नाही तोच स्फटिकासारखा निर्मळ आहे, त्याचे सर्व शरीर चिंतामणीच आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशी, तिची त्याला जरुरी नाही. कारण सर्व तीर्थांना पावन करणारा संत हाच तीर्थस्थान झालेला आहे. सर्व जग अशा पुरुषापाशीच येते. याच्या दर्शनानेच मोक्षाचा लाभ होतो. ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला जपमाळेसारख्या बाह्य चिन्हांची काहीही जरुरी राहिलेली नाही. मन शुद्ध असल्यानेच तो सर्व भूषणांनी मंडित झालेला आहे. जे हरीचे गुणगान करत असतात ते निरंतर आनंदातच असतात.त्यांनी स्वतःला पुरुषोत्तमाच्या ठायी अर्पण केले आहे आणि जो कोणावरही आशा ठेवत नाही तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. संतांच्या दर्शनाने तापत्रयांचा नाश होऊन विश्रांती मिळते.
शुद्ध बीजापोटी/ फळे रसाळ गोमटी/
मुखी अमृताची वाणी/ देह देवाचे करणी//
सर्वांग निर्मळ/ चित्त जैसे गंगाजळ/
तुका म्हणे जाती/ ताप दर्शनी विश्रांती
बीज शुद्ध असले की त्यातून उगवणारी फळे रसाळ आणि गोडच असतात, असं सांगून संत तुकाराम पुढे म्हणतात की ज्याच्या मुखात अमृततुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवकार्यासाठी वापरला जात आहे, ज्याचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे त्याच्या दर्शनाने त्रिविध ताप हरण होऊन चित्ताला विश्रांती मिळते.
सोनियाचे ताट क्षीरीने भरिले/
भक्षावया दिले श्वानालागी//
मुक्ताफळ हार खराशी घातला/
कस्तुरी सुकराला चोजविली//*
वेद पारायण बधिरा सांगे ज्ञान/
तयाची ते खूण काय जाणे//
तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे/
भक्तीचे महिमान साधू जाणे//
एक संत साधूच असा आहे की जो भक्तीचा महिमा जाणतो. सामान्यांना हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगात रोजच्या जीवनातील काही उदाहरणे देतात.
सोन्याच्या पात्रात खीर भरून ती कुत्र्याला दिली तर त्याचा काय उपयोग? त्याचप्रमाणे गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला किंवा डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली
तर त्याचा महिमा त्यांना कळणार आहे का? एखाद्या बहिर्याला(अज्ञानी) माणसाला वेदाचे ज्ञान कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या बुद्धीला समजणार आहे का? जे खरे वर्म आहे ते ज्याचा तोच जाणू शकतो. याच कारणास्तव संतांची संगती धरावी असे तुकाराम महाराजांचे सांगणे आहे.
तुकाराम महाराजांना वैष्णवांचे दास होण्याची तळमळ लागली आहे. कारण ते म्हणतात.
ते माझे सोयरे सज्जन सांगाती/
पाय आठवीती विठोबाचे//
येरा मानविधी पाळणा पुरते/
देवाची ती भुते म्हणोनिया//
सर्व भावे जालो वैष्णवांचा दास/
करीन त्यांची आस उच्छिष्ठाची//
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास/
तैसी नाही आस आणिकांची//
तुकाराम महाराजांच्या मनात हरिदासांविषयी अत्यंत आदर आहे. जे पांडुरंगाच्या चरणांचे चिंतन करतात ते सज्जन माझे सोयरे आहेत असे ते म्हणतात.
बाकीच्यांना मी फक्त विधीपालनापुरते आदराने वागवतो कारण सर्व भूतमात्र देवाच्याच रूपाचे असतात. काया, वाचा, मनाने मात्र तुकाराम महाराज वैष्णवांचे दास आहेत. त्यांच्या उच्छिष्टाची महाराज आशा धरतात. त्यांना हरिदास जितके आवडतात तितके इतर कोणीही आवडत नाही. या अभंगात पर्यायाने सज्जनांची संगती चांगली हे सांगण्याचा महाराजांचा आटोकाट प्रयत्न आहे.
संतांची महती सांगणारा हा आणखी एक अभंग आपण पाहूया.
काय वाणू आता न पुरे हे वाणी/
मस्तक चरणी ठेवीतसे//
संत महात्म्य वर्णन करताना महाराजांची वाणी अपुरी पडते. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणतात,
थोरीव सांडली आपुली परिसे/
नेणे सिवो कैसे लोखंडासी//
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती/
देह कष्टविति पर उपकारे//
भुतांची दया हे भांडवल संता/
आपुली ममता नाही देही//
तुका म्हणे सुख पराविया सुखे/
अमृत हे मुखे स्त्रवतसे//
लोखंड अति हीन आहे, त्याला मी कसा स्पर्श करू? असे मनात न आणता परीस त्याचे सोने करतो, त्याचप्रमाणे संतांनी माझ्या सारख्या हीनाचा स्वीकार केला आहे. संतांचे अवतार जगाच्या कल्याणा करताच असतात, ते आपला देह परोपकार करण्यासाठी कष्टवितात. सर्वांवर दया करणे, हे संतांचे स्वाभाविक भांडवल आहे व त्यांना स्वतःच्या देहाची ममता नसते.
ते संत लोकांच्या सुखामुळेच सुखी होतात आणि त्यांचे बोलणे अमृता सारखे मधुर असते. हरीच्या नामामृताचा ओघच त्यांच्या वाणी वाटे वाहत असतो.
पुढील भागात सज्जन प्रशंसे विषयी आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.
क्रमशः… १६
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




