श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
परंपरा, प्रतीक आणि स्वाभिमानाची उंच पताका
आकाशाला स्पर्शणारा अभिमान
… भारताचा राष्ट्रीय ध्वज — केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी निळे अशोकचक्र.
आपण त्याला तिरंगा म्हणतो; पण रंगांच्या दृष्टीने तो खरे तर चौरंगा आहे.
अशोकचक्रांकित हा ध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची जणू देवताच.
तो भारताच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्म्याचा तेजस्वी प्रतीक आहे.
निरभ्र निळ्या आकाशात डौलाने फडकणारा ध्वज पाहिला की मन भरून येते; छाती अभिमानाने फुलते आणि मस्तक आदराने आपोआप झुकते.
ध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नसतो.
तो असतो राष्ट्राच्या अस्मितेचा उंचावलेला स्वर.
रणांगणातील पताका
भगवाध्वज आणि जरिपटका
महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या परंपरेतून लाभलेला जरिपटका हा स्वाभिमानाचा ध्वज.
पूर्वी युद्धभूमीवर सैन्याच्या अग्रेसर रेषेत हा भगवा झेंडा घेऊन धावणाऱ्या वीराला “बिनीचा सरदार” किंवा “बिनीचा स्वार” म्हणत. याच शब्दावरून बिनिवाले हे आडनाव प्रचलित झाले.
रणांगणावर ध्वज फडकत आहे, याचा अर्थ सैन्य अजून पराभूत झालेले नाही.
बिनीचा स्वार पडला तरी दुसरा वीर पुढे सरसावून ध्वज उचलत असे.
कारण फडकता ध्वज म्हणजे सैन्याचा आत्मसन्मान.
ध्वजाचा तात्त्विक अर्थ
ध्वज म्हणजे उपस्थितीची खूण.
अग्नीला धूम्रध्वज असे म्हणतात, कारण —
“यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र अग्निः”
जिथे धूर दिसतो, तिथे अग्नी असतो.
ध्वज म्हणजे अस्तित्वाची घोषणा.
रामायणातील ध्वज
रामायणकाळात इक्ष्वाकू वंशाच्या ध्वजावर कोविदार (कांचन) वृक्षाचे चिन्ह होते.
अयोध्येतील नव्या राममंदिरावरही याच परंपरेचा ध्वज फडकतो.
रघुवंशाचा ध्वज रक्तारुण वर्णाचा, कमळासारखा लालसर होता आणि त्यावर सूर्यज्वालेसारखी शमीपत्रे होती. म्हणूनच रामाचा ध्वज अरुणध्वज म्हणून ओळखला जातो.
रावणाच्या ध्वजावर मानवी कवटीचे चिन्ह होते.
कुंभकर्णाच्या ध्वजावर शेषनाग,
मेघनादाच्या ध्वजावर सिंह,
तर प्रहस्ताच्या ध्वजावर सर्प.
या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या सामर्थ्याची जाहीर घोषणा.
महाभारतातील ध्वज
महाभारतातील प्रत्येक योद्ध्याची स्वतःची ध्वजपताका होती.
श्रीकृष्ण — गरुडध्वज
अर्जुन — कपिध्वज (हनुमान)
युधिष्ठिर — चंद्र-नक्षत्र
सहदेव — हंस
नकुल — सुवर्णपृष्ठी हरिण
भीष्म — ताडपत्र व तारे
द्रोण — वेदी आणि धनुष्य
कृपाचार्य — वृषभ
दुर्योधन — नाग
घटोत्कच — गिधाड
या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख.
ध्वजात दडलेल्या कथा
जगातील प्रत्येक राष्ट्राच्या ध्वजात त्याच्या इतिहासाची एखादी आठवण किंवा शौर्यकथा दडलेली असते.
– – अमेरिकेच्या ध्वजावरील ५० तारे तेथील राज्यांचे प्रतीक आहेत, तर १३ पट्टे त्यांच्या प्रारंभीच्या वसाहतींची स्मृती जपतात.
– – दक्षिण गोलार्धातील अनेक देशांच्या झेंड्यांवर सदर्न क्रॉस हा तारकासमूह दिसतो. भारतीय २७ नक्षत्रांमध्ये याचा समावेश नसला तरी पुराणकथांमध्ये त्यालाच स्वर्ग आणि मृत्युलोक यांच्या मध्ये लटकणारा त्रिशंकू असे संबोधले जाते.
– – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सामोआ आणि ब्राझील यांच्या ध्वजांवर हा तारकासमूह दिसतो.
काही ध्वजांची प्रतीके
जपानचा ध्वज
पांढऱ्या पार्श्वभूमीवरचा लाल सूर्य — उगवत्या सूर्याच्या देशाची ओळख.
चीनचा ध्वज
लाल पार्श्वभूमीवर एक मोठा आणि चार छोटे तारे — क्रांती आणि समाजरचनेचे प्रतीक.
नेपाळचा ध्वज
दोन त्रिकोणांचा असलेला जगातील एकमेव राष्ट्रीय ध्वज — हिमालयाची प्रतीकात्मक आकृती.
जर्मनीच्या ध्वजात तीन आडवे पट्टे आहेत : काळा – लाल – सोनेरी (पिवळसर).
रंगांचा अर्थ:
काळा – दडपशाही व संघर्षातून उभा राहिलेला इतिहास
लाल – स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान व क्रांतीची भावना
सोनेरी – स्वातंत्र्य, एकता आणि उज्ज्वल भविष्य.
श्रीलंकेचा ध्वज
तलवार धारण केलेला सिंह आणि चार पिंपळाची पाने — सिंहली परंपरा आणि बौद्ध मूल्यांचे प्रतीक.
इतर ध्वज
अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्थाचे सुद्धा आपापले ध्वज असतात. त्यांचे कार्यकर्ते हे ध्वज घेऊन अभिमानाने मिरवतात.
ब्रह्मध्वज आणि गुढी
—- नवनिर्मितीची पताका
ब्रह्मध्वज म्हणजे ब्रह्मतत्त्व, ज्ञान किंवा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे प्रतीक असलेला ध्वज.
लोकपरंपरेत याच ब्रह्मध्वजाचे रूप म्हणजे गुढी.
म्हणजे ब्रह्मध्वज हा तात्त्विक शब्द, आणि गुढी हा लोकजीवनातील व्यवहारातील शब्द.
गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. या सृष्टीउदयानाच्या आनंदाप्रीत्यर्थ ब्रह्मध्वज उभारण्याची प्रथा आहे.
वसंत ऋतू — नवनिर्मितीचा काळ.
झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात.
सृष्टीच्या या नवउदयानिमित्त घरासमोर उभारली जाणारी गुढी म्हणजे नवनिर्मितीचा उत्सव.
समारोप
उंचावलेली पताका
ध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसतो.
तो असतो इतिहासाची आठवण, संस्कृतीची ओळख आणि स्वाभिमानाचा उंचावलेला स्वर.
रणांगणात तो शौर्याची शपथ असतो.
राष्ट्रात तो अभिमानाची ओळख असतो.
आणि गुढीच्या रूपाने तो नवनिर्मितीचा मंगल संदेश देत असतो.
म्हणूनच नववर्षाच्या या पवित्र क्षणी आपण ब्रह्मध्वजाला वंदन करतो —
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।
प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ॥
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४८
‘पराभव’ नाम संवत्सर
विक्रम संवत् २०८२–८३
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
☆
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




