प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

गौतम बुद्ध यांची पत्नी – यशोधरा.

अबला जीवन हाय! तेरी यही कहानी,

आंचल में है दूध और आंखोंमें पानी! 

हे उद्गार आहेत… हिंदी कविवर्य मैथिलीशरण गुप्त यांच्या एका प्रसिद्ध रचनेतील!

एक रात्र… शाक्य गणराज्याच्या राजपुत्र सिद्धार्थ ची पत्नी *यशोधरा* सुशील, सौंदर्यवती, जिच्या प्रसव वेदना अजुनही ताज्या च आहेत मनात… एक दिवसाचा नवजात पुत्र राहुल मातेच्या कुशीत आश्वस्त होऊन गाढ झोपलेला… यशोधरा ही क्लांत पण पुत्र जन्माच्या आनंदात,

पुढील आयुष्याच्या स्वप्नात शांत, निश्चिंत मनाने झोपलेली! आणि… अशावेळी अघटित घडते… तीन प्रसंग 

जरा, मृत्यू आणि व्याधी बघून व्यथित झालेला सिद्धार्थ, जीवनाचं सत्य शोधायला… पत्नी यशोधरा, पुत्र राहुल, राजसी ऐश्वर्य, आणि परिवार या सगळ्याचा त्याग करून… दूर निघून जातो. सुंदर पत्नी, नवजात पुत्र यांचा मोह ही त्याला थांबवू शकत नाही. नंतर त्याला कठोर तपश्चर्येनंतर ज्ञानप्राप्ती होते, तो *गौतम बुद्ध* होतो. त्याची कथा इतिहासात, आणि आध्यात्मिक इतिहासात नोंदली गेली. पण… *यशोधरेचं* काय?  जिला तो न भेटताच, तिचा साधा निरोप ही न घेता… निर्मोही बनून, तिला मागे नवजात पुत्रासह सोडून गेला??  

त्याच्या मागे यशोधरा आणि राहुल कसे राहिले?  त्यांचं काय झालं?  याची कुठेच नोंद नाही. सिद्धार्थ च्या तपात तिचंही… एक पत्नी, एक सून, एक माता म्हणून योगदान उपेक्षितच राहिलं ना!

यशोधरा फक्त सिद्धार्थ ने सोडून दिलेली पत्नी नाहीच मुळी!! तिचेही अधोरेखित करावेत असे किती तरी पैलू आहेतच की!!

यशोधरा… मौनातल्या दृढतेची आणि धीरोदात्त, खंबीर, निग्रही आणि एका सच्च्या क्षत्राणीची कहाणी… म्हणजे यशोधरा!! सिद्धार्थ ची पत्नी… येवढीच तिची ओळख पुरेशी नाहीच! तिला बुद्धाच्या छायेतून, सावलीतून बाहेर काढून बघितलं तर लक्षात येते ती तिच्या परिपक्वतेची, समंजसपणाची आणि एका आदर्श पत्नी आणि मातेच्या आदर्शाची उंची, खोली आणि व्याप्ती!! आपल्या पतीला राजकुमार ते बुद्ध या परिवर्तित रूपात, संयमाने, धीराने, स्थिर चित्त होऊन बघणं सोपं नाही ना एका पत्नी साठी??  पण हे परिवर्तन तिनं पेललं समर्थ पणे! तिने तिचं विरहाचं दु:ख, तिच्या अनावर भावनांचा आवेग… आक्रोशात नाही व्यक्त होऊ दिला.

तिने अत्यंत शांत आणि समजदार भूमिकेतून, सिद्धार्थ ने स्वीकारलेल्या मार्गाकडे बघितलं… आणि तिच्या लक्षात आलं की, सिद्धार्थचा हा मार्ग त्या दोघांना त्यागणं यापेक्षा त्या दोघांपेक्षा ही काहीतरी, मोठं, महान, महत्त्वाचं असं मिळवणं यासाठी होता.

आणि बस्स्… त्याच क्षणी यशोधराने ही भगवी वस्त्रे परिधान करून, राजसी वस्त्रालंकार त्यागून.. दिवसातून एकदाच भोजन करण्यास सुरुवात केली… तिने ही पत्नी धर्म पालन करंत, पतीच्या तपात स्वतः च्या तपाच्या समिधा अर्पण करंत, त्याला मौन साथ देत जणू पाठबळंच दिलं. त्याच्या बुद्ध होण्याच्या मार्गात ती आक्रोशाची, ऊलाहनेची धोंड न होता… त्याच्या आध्यात्म प्रवासातील खरी *अर्धांगिनी* होत… *सहधर्मचारिणी* सिद्ध झाली… सिद्धार्थ ची सिद्धा झाली! योग्याची योगिनी झाली. त्याग आणि प्रेम दोन्ही ही हातात हात घालून चालू शकतात, हे सिद्ध केलं यशोधरेने!

पती असा न सांगता सोडून गेला… उरात न मावणारं, उर फुटून बाहेर येणारं दु:ख होतंच की… पण यशोधरेने समजावलं स्वतःला…

 अब कठोर हो वज्रादपि ओ कुसुमादपि सुकुमारी,

 आर्य पुत्र दे चुके परीक्षा, अब है मेरी बारी!!

आणि दाखवून दिलं की… खरं प्रेम स्वार्थाचा पलीकडचं असतं! खरा वारसा तोच… जो आत्म्याला शांती आणि मोक्षा कडे घेऊन जाईल. तिला पती ने दिलेला हा वारसा कळला, पटला ही… आणि तिने तोच वारसा मग पुत्र राहुल यालाही देऊन त्यालाही भिक्षू/ भिख्खू बनण्याच्या वाटेवर चालण्याचं सामर्थ्य त्याच्या पावलांत देत, चालायला शिकवलं.

यशोधरेला फक्त एकच सल मनात बोचला की, पती तिला न सांगता गेला. तिचा स्वाभिमान दुखावला! एक पत्नी ची वेदना उरी दाटली की… पतीचा तिच्यावर येवढा ही विश्वास नव्हता की ती एक क्षत्राणी आहे… जी आपल्या पतीला औक्षण करून, मंगल तिलक लावून, त्याच्या यशाची कामना करते आणि अभिमानाने त्याला निरोप देते! पण सिद्धार्थ ने तिला आणि राहुल ला आपल्या मार्गातील बाधा मानले. ती तिच्या सखी जवळ हेच म्हणंत राहिली…

सखी वे मुझसे कहकर जाते, कह, तो क्या वे मुझे अपने पथ की बाधा पाते? 

त्याने तिला ओळखलंच नाही… याचं मात्र तिला दु:ख खूप च झालं. स्वाभिमान दुखावला तिचा. पण तरीही तिने नंतर बुद्धांकडूनच पुत्राला ही बौद्ध धर्माची दिक्षा देवविली आणि स्वतः ही घेतली. अरहंत पदापर्यंत ही जाऊन पोहोचली. भद्रकात्यायनी या नावाने ही ओळखली जाते.

अशी ही अलक्षित… पण… स्त्री जातीला महिमा आणि गरिमा मंडित करणारी… परित्यक्ता नाहीच… तर… तपस्विनी, त्यागमयी, तेजोमयी शलाका… जी चैतन्य युक्त, चेतलेलीच ठेवू यात.

– लेख क्र. ३ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments