श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ झारमुरी – – – – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
हा खाद्य पदार्थ बंगाल मध्ये सर्वांनाच माहीत होता. पण निवडणुकीमुळे देशातच काय पण परदेशात सुद्धा एकाएकी प्रकाश झोतात आला. विदर्भात मात्र हा पदार्थ सर्वांनाच माहीत आहे. येथे याला चकना म्हणतात. अरे विज्या चकना बनवला की नाही. सर्व मित्र येतीलच. विजुभाऊ फक्त चकनाच खातो. हा पदार्थ केंव्हाही बनवता येतो. पण काही मुहूर्तावर बनवायचं लागतो. पण आता मात्र झारमुडी खूपच लोकप्रिय होईल. जो खातो तो जिंकतो.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा… कोणताही ऋतू असो, भारतीय माणसाच्या आयुष्यात दोन गोष्टी कायम स्थिर असतात — चहा आणि त्याच्या सोबत काहीतरी खायला! आणि या “काहीतरी” मध्ये जर कोणी खरा राजा असेल तर तो म्हणजे झारमुरी आणि मुरमुरे चिवडा! बैठकीत तर पहिल्या क्रमांकावर असतो. समजदार को इशारा काफी है.
झारमुरी म्हणजे बंगालचा आत्मा आणि आपल्या गावाकडच्या मुरमुरे चिवड्याचा शहरात गेलेला चुलत भाऊ! फरक एवढाच की आपल्या इथला चिवडा शांत, साधा आणि घरगुती असतो; तर झारमुरी म्हणजे एकदम फिल्मी हिरो! कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, शेव, चटणी, मसाला… एवढे सगळे टाकून तो असा तयार होतो की वाटते आता हा थेट निवडणूक लढवेल!
पूर्वी गावात मुरमुरे चिवडा बनवणे म्हणजे एक कौटुंबिक सोहळा असायचा. आई मोठ्या परातीत मुरमुरे घेणार, त्यात फोडणीचा सुगंध पसरायचा. आपण बाजूला बसून “मी मदत करतो” म्हणायचो आणि मदतीपेक्षा खाणेच जास्त करायचो. आई म्हणायची, “अरे, पाहुणे येणार आहेत!” आणि आपण मनात म्हणायचो, “त्यांनी येण्याआधीच संपवूया!”
त्या काळी चिवडा डब्यात भरून ठेवला जायचा. पण घरातील प्रत्येकाला त्या डब्याचे गुप्त ठिकाण माहिती असायचे. विशेषतः वडिलांना! रात्री सगळे झोपल्यावर स्वयंपाकघरात “टकटक… खुटखुट…” आवाज यायचा. आई विचारायची, “कोण आहे?” आतून आवाज यायचा, “मांजर असेल…” पण दुसऱ्या दिवशी डब्यातला चिवडा निम्मा कमी! ते मांजर दोन पायांचे असायचे हे सगळ्यांना माहिती असायचे.
झारमुरीवाल्यांची स्टाईल तर भारीच! हातात मोठा डबा, त्यात मुरमुरे आणि वर छोट्या छोट्या डब्यांत मसाले. तो ज्या वेगाने सगळे मिसळतो ते पाहून पहिले जिभेवर त्याचा परिणाम दिसतो. आणि शेवटी तो कागदाचा कोन करून झारमुरी देतो. त्या कोनातली झारमुरी खाताना अर्धी तोंडात आणि अर्धी शर्टावर पडते. पण तरीही आनंद असा मिळतो जणू काही पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवत आहोत.
मुरमुरे चिवड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो “हलका” असतो. त्यामुळे माणूस स्वतःला फसवत राहतो. “अरे, हे काय… हलकेच आहे!” असे म्हणता म्हणता अर्धा किलो संपतो.
रेल्वे प्रवासात तर मुरमुरे चिवडा हा राष्ट्रीय खाद्यपदार्थ वाटतो. एकाने पाकीट उघडले की पूर्ण डब्यात सुगंध पसरतो. समोरचा माणूस लगेच पुस्तकातून वर बघतो. बाजूचा प्रवासी नकळत जवळ सरकतो. आणि दोन मिनिटांत “थोडे घ्या ना…” पासून मैत्री सुरू होते.
आजकाल मोठमोठ्या कंपन्यांनी झारमुरी आणि चिवड्याला आकर्षक पॅकेटमध्ये बंद केले आहे. त्यावर इंग्रजीत मोठे नाव लिहिलेले असते — “Spicy Puffed Rice Mix” पण आत उघडल्यावर चार शेंगदाणे, दोन कढीपत्ते आणि बाकी हवा! त्यापेक्षा आपल्या घरचा चिवडा म्हणजे प्रेम, आठवणी आणि पोटभर आनंद!
खरं सांगायचं तर मुरमुरे चिवडा हा फक्त खाऊ नाही. तो बालपण आहे, प्रवास आहे, गप्पा आहेत, आणि “थोडे अजून घेऊ का?” या मोहाचा अखंड इतिहास आहे!
काल बंडोपंत खूप घाईत दिसले विचारले तर म्हणाले संध्याकाळी सुमी ला पहायला येणार आहे तू पण ये. मनात विचार आला बरे झाले बरेच दिवसात कांदेपोहे खायला मिळतील. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. सुमी आता कांदेपोहे घेऊन येईल असे वाटले तर सुमी झारमुरी घेऊन आली. ती खाल्ल्यावर पोराने पटकन मुलगी पसंत आहे असे सांगितले. एवढा इन्स्टंट इफेक्ट पहिल्यांदाच पाहिला. आता कांदेपोहे कार्यक्रम न होता झारमोरी कार्यक्रम होईल. शेवटी काय तर झारमुडी बनवताना ममता पाहिजे.
माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात
प्रस्तुति : श्री अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com





