श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
ना उरला कोणी वाली...
श्री आशिष बिवलकर ☆
☆
शिक्षणाचा बाजार मांडला,
उमेदींना ना उरला कोणी वाली |
अंगठा मागणारे द्रोणच सारे,
एकलव्या सांग रे तुझी खुशाली |
*
रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून,
किती रे केला होतास अभ्यास |
शिक्षण व्यवस्थेतल्या मंथरेमुळे,
रामाच्या नशिबी पुन्हा वनवास |
*
कोणी विकली शेतीभाती,
कोणी गहाण ठेवले घरदार |
ऋण मुलांच्या शिक्षणासाठी,
सणवार विसरून उसन उधार |
*
उज्वल भवितव्याचे स्वप्न उराशी,
मार्ग तो धरला सरळ असा तो नीट |
कुंपणानेच शेत फस्त केलं आता,
भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेचा आलाय वीट |
*
आई वडिलांची भिस्त तुझ्यावर,
टोकाचं पाऊल तू उचलू नकोस |
हातातोंडाशी आलेला घास त्यांचा,
अविवेकाने हिरावून घेऊ नकोस |
*
नीटच्या दलालांनी दिला धोका,
धीट राहून प्रयत्न तू करत रहा |
रात्रीच्या गर्भात उष:काल उद्याचा,
उज्वल भविष्याचे स्वप्न पहात रहा |
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






