श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ राखीची गोष्ट… कौस्तुभ केळकर नगरवाला ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

‘राखीची गोष्ट’ सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला  सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट.लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे ? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरतला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि  स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे..त्यावर ‘वीर जवान , देश की शान’ असं लिहलंय… लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी.

लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला.खरं तर काजल राखी घेऊन जायचीयेय.तीच ती आर्मीवाली राखी.काजलचे आई बाबाही आहेत बरोबर.तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट.

तर काय सांगत होतो ? परमिशन्स,रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला.”बच्ची की चिंता मत करो , हम है ना !”. मी कशाला नाही म्हणतोय…?

लेक खुष. लेक खुष तो तिचा बाबाही खुष.

आत्ता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती.

ती काय म्हणाली ते ऐका. “बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून चाळीस किलोमीटरवरआहे ही चेकपोस्ट. इकडेतिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन. चाळीसच्या वर टेम्परेचर. वाळूत रेघ मारावी तसलं तारांचं फेन्सींग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलींग.असं वाटलं स्टेनगन घ्यावी,ध डधड फायर करावं आणि Let’s close the matter forever”

“280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बाॅर्डर आहे इथली. 150 च्या आसपास चेकपोस्ट.काही ठिकाणी दलदल, चिखल.दिवस, रात्र, ऊन, पाऊस नो एक्स्यूझ. 24×7 चा खरा इथं समजला. आॅलवेज आॅन ड्यूटी.

बाबा मोस्ट शाॅकींग….आम्ही राख्या घेवून गेलेलो. ऊडालोच. काजलचा भाऊ नही मोठी बहीण होती तिथं. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथं.400 जणींची बटालियन आहे ही. या बटालियनचं नावच कसलं भारीये. ‘सीमा भवानी’. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली. मिठाई भरवली.दे वेयर व्हेरी हॅप्पी.दुर्गा होती प्रत्येक जण.मर्दानी. प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय.’चड्डीत रहायचं,नाहीतर….’.बाबा, आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस…”

तासाभरानं मी कर्नलसाहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हणलं. ते गहिवरून बोलत होते.

’93 की बात है.कश्मीर में पोस्टींग थी हमारी.अनंतनाग के पास एक सर्च आॅपरेशन चालू था. पंडित के घर को अॅटॅक किया था मिलिटंटस् ने. आधा घंटा फायरिंग चालू था. दो को मारा. दो भाग गये …… घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फॅमीली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखरी सास गिन रहा था. कपट के अंदर तीन साल की बच्ची को छिपाया था. ‘ईसे संभालो’ बोल के वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्हीसी परी को.. वही हमारी बडी बेटी राखी.’

शाॅक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट. मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ.आता रक्षण करणारी बहिण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्राँग आहे ते समजलं आज. सीमेवरच्या एका तरी ‘जवाना’ला नाहीतर ‘सीमाभवानी’ला राखी पाठवायलाच हवी. वुई केअर, वुई रिस्पेक्ट, वुई सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम नमस्ते ! 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कौस्तुभ केळकर नगरवाला

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments