श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “खासियत जुन्या मैत्रीची” ☆ श्री सुधीर करंदीकर

शाळा / कॉलेज सोडून बरीच वर्ष सरतात. तेव्हाच्या बऱ्याच मित्र / मैत्रिणींचे आपल्याकडे मोबाईल नंबर नसतात त्यामुळे कधी बोलणे नसते आणि भेट पण नसते. त्यातल्या कुणाची अचानक ५० वर्षांनंतर अचानक भेट व्हावी, आणि नुसती नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना नावासकट ओळखावे, हे शक्यच नाही, असेच सगळे म्हणतील. कारण चेहेऱ्यात बदल झालेला असतो, डोक्याचे केस पांढरे झालेले असतात, माणसांना टक्कल पडलेले असते, आवाजात बदल झालेला असतो, वगैरे वगैरे. पण जुन्या मैत्रीत जर काही खासियत असेल, तर मात्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात. यावरचा माझा अनुभव वाचायला आवडेल.

– – – – –  

नेहमीप्रमाणे आज सकाळी ८ वाजता एकटाच फिरायला बाहेर पडलो. कोथरुडजवळ मृत्युंजय मंदिरासमोरून फुटपाथवरून जात होतो. अधून मधून इथे भेटणाऱ्या मैत्रिणी मनवा आणि मेघना यांची आठवण झाली. त्या परदेशी गेल्या असल्यामुळे त्यांची भेट होणार नव्हतीच. चहाच्या टपरी जवळ आलो, चहावाल्यांना हात केला, आणि पुढे निघालो. समोरून एक मॅडम येत होत्या.

यांना केंव्हातरी खूप जवळून बघितलंय असं जाणवलं. मॅडम ना पण तसंच वाटलं असावं, असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसले. एकमेकांकडे बघत बघत आम्ही एकमेकांना क्रॉस झालो. दोघं थोडं पुढे गेलो, आणि दोघांनी एकदमच मागे वळून बघितलं. खूप जवळची ओळख आहे असं दोघांनाही जाणवलं.

आणि गंमत म्हणजे आम्ही दोघेही उलटं म्हणजे मागे मागे चालायला लागलो. चालत चालत शेजारी शेजारी आलो आणि हसत हसत आपोआपच एकमेकांशी हात मिळवणी झाली.

आणि दोघे एकदमच म्हणालो

मॅडम : अरे, सुधीर तू…

मी : अरे, छाया तू…

(आम्हाला रस्त्यावर उलटं चालताना बघून जाणारे येणारे पण जरा थबकलेच की हा काय प्रकार आहे.)

दोघे एकदम : ग्रेट सरप्राईज. कॉलेज सोडल्यानंतर म्हणजे ५० वर्षानंतर आज अचानक भेट.

छाया : सुधीर, तुझा एकदम सेम स्मायलींग फेस. नो चेंज

मी : छाया तुझा पण तोच आनंदी चेहरा, नो चेंज

दोघेही : आणि तेच उलटं चालणं. आणि म्हणून तर एकदम ओळखू शकलो ५० नाही ५२ वर्षांनंतर

जुन्या आठवणी आणि गप्पा सुरू होत्या, एवढ्यात बाजूला असलेल्या चहाच्या टपरी चे मालक आले आणि

म्हणाले : दादा, चहा इथेच आणून देऊ, का, दुकानात येऊन घेणार.

मस्त चहा झाला. ५२ वर्षात भेट तर नाहीच आणि एकमेकांचे मोबाईल नंबर माहित नसल्यामुळे कधी फोनवर बोलणे पण नव्हते. भरपूर जुन्या जुन्या म्हणजे कॉलेजमधे ५ वर्ष बरोबर होतो त्या वेळच्या गप्पा सुरू झाल्या. किती वेळ बोलत होतो, हे समजलंच नाही. चहावाले सांगायला आले, दादा ऊन वाढतंय, दुकानासमोर सावलीत खुर्चीवर बसून गप्पा मारा.

दोघंही भूतकाळातून वर्तमान काळात आलो.

पुन्हा असंच भेटायचं ठरलं आणि इथेच भेटायचं ठरलं.

बाय-बाय झालं आणि जुन्या आठवणीं मध्ये रमत रमत आपापल्या मार्गाला लागलो.

घरी गेल्यानंतर ही आगळी वेगळी भेट कॉलेजच्या ग्रुपवर सविस्तर टाकली. आणि माझी पोस्ट वाचून एका कॉलेज मित्राचा मेसेज आला –

तुझी आणि छायाची इतक्या वर्षानंतर अचानकपणे भेट होणे / गप्पा होणे आणि ते पण रस्त्यावरती सहज फिरता फिरता, म्हणजे आश्चर्यच आहे. तू लिहिलेली घटना वाचता वाचता मी पण कॉलेज डेज मधल्या भूतकाळात गेलो. मला चांगलं आठवतंय, कुठलाही पिरियेड संपला, आणि पुढच्या पिरेडला वेळ असला, तर सगळे मुलं मुली क्लास बाहेरच्या मोठ्या पॅसेजमध्ये गप्पा मारत उभे असायचे, काहीजण क्लास रूम मध्ये अभ्यासाचे वाचत असायचे. तू आणि छाया मात्र अशा वेळेस कायम पॅसेज मध्ये उलटे चालत चालत गप्पा मारत असायचे. मला आठवतं पूर्ण कॉलेजमध्ये उलटे चालत गप्पा मारणे ही तुमची खासियत होती.

आज पण तुम्ही दोघांनी उलटे चालून तेच दोघेजण आहात ही खात्री मात्र मस्त करून घेतली. नाहीतर कुणीही दोघांची बऱ्याच वर्षानंतर अचानक भेट होते तेव्हा त्यांचे बोलणे साधारण असे असते –

तुम्ही सुधीर करंदीकर ना! किंवा तुमचं नाव अमुक अमुक आहे ना! तुम्ही भोपाळच्या कॉलेजमध्ये होता ना! अशी सुरुवात होते.

आणि तुमची ५२ वर्षानंतर भेट झाली तेव्हा, डायरेक्ट ओळख पटल्यासारखेच, सुधीर तू … छाया तू… अशी सुरुवात झाली. ग्रेट, सिंपली ग्रेट.

मी पण तिथे असतो तर मजा आली असती. बहूदा गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली असती. आणि चहा वाल्यानी पुढच्या चहाबरोबर ब्रेड पण दिली असती.

भेटत रहा, मजा करा, जुन्या आठवणी कळवत चला…

बाय-बाय.

दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या मित्रांचा व्हाट्सअप वर ग्रुप मिटिंग कॉल आला – माझ्या आणि छायाच्या अचानक भेटीचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. आणि ५२ वर्षांनंतर आम्ही एकमेकांना एका क्षणात ओळखले यावर आधी कुणाचाच विश्वास बसत नव्हता. पण कॉलेजच्या आम्ही काय काय गप्पा मारल्या, ते सांगितल्यावर सगळ्यांची खात्री पटली. एक जण म्हणाला मला जरा छाया चा मोबाईल नंबर दे. फोन लावून बघतो ओळखते का मला पण! आणि जरा कॉलेजच्या गप्पा मारू. मज्जा येईल.

मी म्हटलं देतो देतो, आणि लक्षात आलं, काल गप्पांच्या ओघामध्ये, आपण छायाला ती पुण्यात कुठे राहते, पास आउट झाल्यानंतर कुठे नोकरी केली, इथे घरी कोण कोण असतं, आणि मुख्य म्हणजे तिचा मोबाईल नंबर काय आहे, हे सगळेच विचारायला विसरलो होतो.

मित्रांचा आधी विश्वास बसला नाही. पण नंतर त्यांना पटलं की इतक्या वर्षांनंतर जुन्या गप्पां मध्ये रंगल्या नंतर असे होऊ शकते.

आता असेच सकाळी फिरताना छाया कधी भेटते, तिच्याबरोबर रस्त्यावर उलटे कधी चालतो, याच्या मी प्रतिक्षेत आहे.

भेट होणार हे नक्की आणि ती पण मृत्युंजय मंदिराच्या समोरच हे पण शंभर टक्के पक्के.

ही माझी गोष्ट वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये पण तुमच्या शाळेतल्या / कॉलेजमधल्या मैत्रिणीं बरोबरच्या / मित्रांबरोबरच्या आठवणी जाग्या होतील, आणि त्या आठवणींमध्ये तुम्हाला छान रमता येईल, कदाचित माझ्यासारखी अशी अनपेक्षित भेट पण होईल, हे नक्की.

चलो, बाय बाय ….

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments