श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

वारकरी भिकारी नव्हेत… भिकारी वारकरी नव्हेत!

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥

हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु. ॥

हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥२॥

तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥३॥

माझे निगडी प्राधिकरण येथील मित्रस्नेही जयंत गोपीनाथ नित्सुरे यांच्या घरी दर महिन्याच्या एका विशिष्ट तिथीला एक वृद्ध वारकरी रात्रीच्या मुक्कामास येत असत. बाहेरच्या खोलीतील कोप-यात त्यांचा प्लास्टिकचा कागद अंथरून बसत. एक वेळच्या भुकेला पुरेल एवढेच अन्न घेत. आणि अंगावर एक धोतर पांघरून निजून जात. अगदी पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करून, धोतर वाळायला घालून नित्यनेमासाठी बसत. मुखाने हरीनाम घेत कपाळी गंध रेखीत. छोट्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत त्यांचा सारा सरंजाम असे. केवळ एक कप चहा घेत आणि त्यांच्या मार्गाला निघून जात. कधी घरातल्या गोष्टींत लक्ष नाही की मध्ये बोलणे नाही. दूर कुठल्याशा गावातून येत असत. जयंत यांच्या वडिलांपासून या वारकरी बाबांचा हा नेम कित्येक वर्षे सुरु होता……. आणि एका महिन्याच्या त्या तिथीला बाबा आले नाहीत….. आणि पुढेही कधी आले नाहीत! मग त्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली!

वारकरी वर्षातून चार वा-या करतात हे अनेकांना ठाऊक नसेल….. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी! आणि काही वारकरी दर महिना! होय. दर महिना! देहू-आळंदी ते पंढरपूर चालत जायला बारा दिवस. पंढरीत दशमीला पोहोचून एकादशीचे दर्शन आणि द्वादशीला भल्या सकाळी बारस सोडून त्र्ययोदशीला आळंदीकडे प्रस्थान….. असा हा क्रम असे. अर्थात हा अवघड मार्ग अनुसरणारी मंडळी मोजकीच असतात, यात नवल नाही!

या नेमाच्या वारक-यांची अर्थातच एकमेकांशी ओळख असे. एखादे द्वादशीस त्या नेहमी येणा-या वारक-यांपैकी कुणी अनुपस्थित असेल, तर उरलेले वारकरी त्याचे चंद्रभागा तीरावर पिंडदान करीत…………. कारण तो वारकरी वारीस न येण्याचे एकमेव कारण असू शकते ते म्हणजे त्याचा मृत्यू! आणि ज्या अर्थी तो वारकरी वारीस आलेला नाही त्याअर्थी त्याचा मृत्यूच झालेला असला पाहिजे….. अन्य कोणतेही कारण त्याला वारीळा येण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास असे. म्हणून त्याला श्रद्धांजली म्हणून त्याचे पिंडदान! हे अत्यंत अभावाने घडत असले, खरे वाटत नसले, अतिशयोक्तीचे वाटत असले तरी अशी वारकरी मंडळी या संप्रदायाने अनुभवलेली आहेत….. हे नाकारता यायचे नाही! वर उल्लेख केलेले वारकरी बाबा पुन्हा आले नाहीत याचा तोच अर्थ होता!

पूर्वी पायी प्रवास होई. कालांतराने झालेल्या सुविधा आणि वाढते वय यांमुळे काही वारकरी एस. टी. , रेल्वेनेही प्रवास करू लागले होते. याही काळात असे काही नेमाचे वारकरी निश्चित आहेत पण अर्थात संख्या कमी झालेली असेल, इतकंच!

काही लोकांनी संसारातून निवृत्त झाल्याने तर काहींनी त्यांच्या वैय्यक्तिक कारणांनी, धार्मिक श्रद्धेपोटी हा मार्ग स्वीकारलेला असू शकतो. काही जण घराण्याची परंपराही सुरु ठेवतात. असो.

पायी प्रवास, वाहनांचा प्रवास, वाटेतील अनुषंगिक खर्च यासाठी अनेक लोक स्वखुशीने या वारक-यांना आर्थिक साहाय्य करतात. आणि यांनीही केवळ गरजेपुरतेच अन्न, धन स्वीकारावे असे अपेक्षित असते. काही वारक-यांनी प्रत्येक गावातील विशिष्ट घरे नेमून घेतलेली असतात आणि हा क्रम वर्षानुवर्षे चालायचा पूर्वी. आता जमाना बदलला आहे!

वारकरी लोकांना जनता खुशीने दान देते याचा गैरफायदा घेणारेही पुढे निपजले. त्यामुळे कालांतराने वारकरी आणि भिकारी यांत फरक दिसेनासा झाला!

जगदगुरु संत श्री तुकोबारायांनी ‘होईन भिकारी’ हे अत्यंत वेगळ्या आणि अध्यात्मिक अर्थाने म्हटले आहे. अन्यथा त्यांच्या सारख्या मूळच्या श्रीमंतास असे लिहायची गरज पडली नसती.

हल्ली जवळजवळ सर्वच संतांच्या पालखी सोहळ्यासोबत चालणारा समाज संख्येने प्रचंड दिसून येतो. याची काही अध्यात्मिक कारणे असली तरीही सोहळ्यात केवळ पोटार्थी लोकांची, भिका-यांची संख्याही वाढलेली दिसते आहे. विशेषत: ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमंत पालखी सोहळ्यासोबत शहरे जवळ आली की वारीत संख्या वाढते… त्यात काही टक्के भिकारी मंडळी असतात. कारण माऊलीच्या मार्गावर पुणे आणि अशीच काही सधन शहरे येतात. आणि येथील लोकही मोठ्या प्रमाणावर, अगदी चढाओढ लावून दान, अन्नदान करताना दिसतात. हाच सोहळा पुढे पुढे गेला की मधल्या मोकळ्या रस्त्यांवर वारीतील भिका-यांची संख्या रोडावते… कारण काही मिळण्याचे प्रमाण कमी होत असते. यामुळेच कुठे काही वाटप होत असेल तर ही भिकारी मंडळी खूप गोंधळ करतात, अधिकच्या वस्तू, अधिकचे अन्न पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे भिकारी चक्क वाहनांनी पुढील सधन गावांत जाऊन थांबतात!

वारीत सहभागी असलेल्या अधिकृत दिंड्या स्वयंपूर्ण असतात. संबंधित वारकरी आपसांत वर्गणी (ज्याला भिशी असं म्हणतात) जमा करतात, दानशूर लोकांकडून देणग्या, वस्तू मिळवतात आणि संपूर्ण खर्च भागवतात. बरीचशी कामे वारकरी कार्यकर्ते स्वत:च करीत असले तरी स्वयंपाक, वाहने आणि इतर काही व्यवस्थांसाठी मानधनावर लोक नेमावे लागतात. आणि हे लोकही केवळ पैशांसाठी नव्हे तर सेवा म्हणून हे कार्य स्वीकारताना दिसतात. स्वयंपाकासाठी लागाणारे सर्व साहित्य, पदार्थ वाहनांमध्ये सोबत घेत प्रवास सुरु असतो. वाटेतील दुपारच्या, रात्रीच्या भोजनासाठी प्रायोजक असतात… त्याला पंगत देणे असे संबोधले जाते!

पालखी रथामागे किंवा रथापुढे चालणा-या दिंड्यांना विशिष्ट क्रमांक दिलेले असतात. आणि ही शिस्त पाळावीच लागते. शेगावच्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा तर अत्यंत कडक शिस्तीसाठी सुप्रसिद्ध आहे. यात वेशभूषा आणि नित्यनेमाला खूप कटाक्षाने महत्त्व दिले जाते. स्वयंपूर्ण दिंडीतील वारक-यांना इतर कुणाकडून अन्न किंवा वस्तू घेण्याची गरज रहात नाही. अर्थात खेडोपाड्यातून येणा-या काही साध्या, छोट्या दिंड्या, ज्यांना आर्थिक पाठबळ कमी असते, अशा दिंडीतील वारकरी काहीवेळा भाविकांनी देऊ केलेले अन्न, वस्तू स्वीकारतात. पण ही याचना नव्हे!

कित्येक गावातील भाविक मंडळी दिंड्यामधील वारक-यांना अगदी आग्रहाने घरी नेऊन जेऊ घालतात. विशेषत: तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात हे प्रमाण मोठे आहे.

पूर्वी तुकोबारायांचा सोहळा कमी संख्येचा असे. मार्गही खडतर असे. त्यामुळे सोहळ्यात भिका-यांची संख्याही कमी असे. आता परिस्थिती बदलली आहे!

पालखी सोहळ्यासोबत विविध व्यवसाय करणारे हजारो लोक चालत असतात. ही मंडळी सुद्धा वारीतील दानाचा बराच लाभ घेताना दिसतात. सामान्य लोकांना बरेचदा केवळ वारीसाठी भक्तीभावाने चालणारी माणसे आणि व्यवसायानिमित्त, काही हेतू मनात ठेवून चालणारी माणसं यांतील फरक समजू शकत नाही! याला काही इलाज नाही. शेवटी माऊली, महाराज आणि सर्वच संत मंडळी पालखी सोहळ्यात सहभागी असणा-या कुणालाही रिक्तहस्त ठेवीत नाहीत, अशी श्रद्धा आहेच!

देशभरातल्या विविध धार्मिक यात्रा, कुंभमेळे यांत व्यावसायिक भिकारी नित्यनेमाने हजेरी लावत असतात, हेही खरेच आहे. पंढरीची वारीही त्याला अपवाद नाही! पण खरे वारकरी भिकारी नसतात आणि भिकारी वारकरी नसतात….. हे या निमित्ताने नमूद करावेसे वाटते!

सोहाळ्यात कुणीही उपाशी राहत नाही… मराठी भाविक मने त्यांना त्यांना उपाशी राहू देत नाहीत… या सर्वांना सोबत घेऊन ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि इतर असंख्य संत दरवर्षी पंढरीची वाट चालत असतात… हा सुखसोहळा स्वर्गी नाही! रामकृष्णहरी!

– लेख क्र. २ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted