सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

लहानपणी सुट्टीमध्ये व्यापार हा खेळ चालायचा. मी नेहमी बँकर व्हायची. मला वाटायचे आपल्याला विकत घेणे, विकणे जमणार नाही. पण खेळ खूप आवडायचा. मग हळूहळू व्यापाराची गंमत कळायला लागली आणि मोठेपणाची बीजे रुजू लागली.

शाळा खूप छोटी होती. त्यामुळे फारश्या  गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत. वेगळे शिक्षण घेतले नाही. आजकाल शाळेमधून सुध्धा एक्स्ट्रा ॲक्टिविटीज खूप असतात.

नंतर एमएससी झाले. १९७५ साली.माझे पोस्ट ग्र्याज्युएशन आणि लग्न एकदमच झाले. कॉलेज संपले. आणि नवीन वैवाहिक जीवनाची सुरवात झाली. पण माझी मनापासून काहीतरी स्वतः करण्याची इच्छा प्रचंड होती. नोकरी न करता स्वतः लोकांना नोकरी द्यावी म्हणजेच एखादा व्यवसाय सुरू करावा अशी प्रबळ इच्छा होती. तसेही नोकरी करण्यास घरून विरोध होता.आणि मग माझ्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे १९७७ साली दिवाळी पाडव्याला घरामध्ये व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवली गेली. त्याला नाव दिले ‘ हेम इलेक्ट्रॉनिक्स ‘.दोन टेबले, एक कामगार आणि आमचे घर ही व्यवसायाची जागा. मग मार्केट शोधणे, कच्चा माल जमा करणे, हे सर्व सुरू झाले आणि मार्च ७८ मध्ये १००स्के. फूट जागेमध्ये तयार झाला पहिला प्रॉडक्ट.

नंतरची दोन वर्षे इमर्जन्सी लाईट युनिट्सच्या खूप ऑर्डर्स मिळत गेल्या. त्यावेळी ५-६ तास दिवे जात असत. अशी हळूहळू सुरवात झाली. नंतर आम्हाला मार्केटिंग एजन्सीनी संपर्क साधला आणि मग व्यवसाय वाढीस लागला. माझे पतीही ८४ साली नोकरी सोडून हेम इलेक्ट्रॉनिक्सला जॉईन झाले. ते बंगलोरहून  M E झालेले असल्याने ते आल्यावर आम्ही जवळ जवळ २०० नवीन प्रॉडक्ट्स  मार्केटमध्ये आणले.

त्यांची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ह्यामुळे आम्ही आमचे पाय घट्ट रोऊन परदेशी प्रॉडक्टच्या  इतकेच उत्तम दर्जाचे पण संपूर्ण स्वदेशी बनवटीचे प्रॉडक्ट्स खूप कमी किमतीत सर्व इंजिनियरिंग इन्स्टिट्युट ,आर अँड डी लॅबना पुरवठा करू लागलो.

जसा जसा व्यवसाय वाढला तशी जागा कमी पडू लागली.  मग आम्ही एम आय डी सी  मिरजमध्ये  आमच्या नवीन वास्तूमध्ये स्थलांतर केले. नंतर कालांतराने दुसरी इमारतही उभी राहिली.

माझा धाकटा मुलगा दोन वर्षे बंगलोर मधील मल्टी नॅशनल कंपनी मध्ये काम करून २००९ साली आमच्या कंपनी मध्ये रुजू झाला. तिघे मिळून २०२० डिसेंबरपर्यंत काम केले.

माझे पती ह्यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. थोडे दिवस मी थोडी व्यवसायापासून दूर गेले होते.  पण आता पुन्हा नव्या दमाने कामात रुजू झाले.

व्यावसायिकाला वयाची अट नसते. एक उद्योजक स्वतः काम करून  रोजगार निर्माण करतो आणि अप्रत्यक्षपणे सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सोडवायला मदत करतो.

म्हणून मला असे वाटते की जास्तीत जास्त मुलांनी फक्त छान नोकरी मिळवणे हे ध्येय न ठेवता, स्वतः उद्योजक होण्याचा विचार करावा.

सरकार नवीन उद्योगाला खूप मदत करते. महिला उद्योजकाला सरकारकडून खूप योजनाही जाहीर होतात.

म्हणून मला इतकेच सांगायचे आहे की कितीतरी क्षेत्रात अजून नवनवीन उद्योग निर्मिती होऊ शकते. नवीन पिढीने तिथे काही करत येईल का असा विचार करून आत्मनिर्भर भारत करण्यास सहाय्य करावे.

© सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments