सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “परतवारी…” – लेखिका:सौ.नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सुमेधाबाई घराला कुलूप लावून बाहेर पडल्या.रोजच काही बाहेरची कामे करुन थोडंसं चालून परत घरी जायचं, हा शिरस्ता होता त्यांचा .

त्यांच्या मनात आलंच, आज लायब्ररीत गेल्यावर ग्रंथपाल म्हणणारच आहेत ,अहो किती उशीर ?वेळेवर पुस्तके परत करा .

त्या म्हणाल्या , सॉरी हं! पाहुणे होते त्यामुळे जमलं नाही .

त्यांच्या मनात आलं, माझा ७० वा वाढदिवस म्हणून सगळे जमा झाले होते हे कुठे त्यांना सांगा .

 त्या म्हणाल्या, “अहो हे पुस्तक वाचायचं राहिलं.’परतवारी’. न वाचता परत करवेना .

अहो ,पंढरपूरच्या वाटेवरील  ज्ञानोबा माऊलींच्या  वारीवर सारेच भरभरुन लिहितात पण पंढरपूरहून आळंदीला परत जाताना त्या पालखीबरोबर  परतीची पण १० दिवसाची परतवारी असते हे माहीतच नव्हतं हो कधी .”

ग्रंथपाल म्हणाले, “हो बऱ्याच जणांचा अभिप्राय आहे, छान आहे पुस्तक असा. ठीक आहे होतो उशीर एखादेवेळेस. चालायचंच.”

 

त्या दुसरी पुस्तके घेऊन बाहेर पडल्या .

आता थोड्या वेळ  चालावं म्हणून त्या समोरच्या पार्कात शिरल्या .

चालताना तेच होतं डोक्यात ,या लेखकाला इतकी कष्टाची परतवारी का करावीशी वाटली असेल?

आपल्याला हे माहीतच नव्हतं .

 त्यांच्या मनात आलं, मीही १५ वर्षांपूर्वी एकदा मैत्रिणीबरोबर वारीचा अनुभव घेतलाय की.घरात काय कौतुक सगळ्यांना माझं तेव्हा!अगदी  नवऱ्यासकट

मुलांनीही  वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावात कुणी ओळखीचं आहे का शोध घेतले. फोन नंबर मिळवले. मला कुठेही कसली अडचण येऊ नये म्हणून . बरोबर  तयारी किती, काळजीने प्रत्येकाच्या सूचना किती!

पण एकदा अनुभव घ्यायचाच होता.

मग एका चांगल्या दिंडीत पैसे भरलेच होते आणि तरीही वाटलं तरी प्रत्येक गावात कुणी ना कुणी ओळखीचे होतेच .

आणि तसाही  गावोगावी पालखीचा काय थाट असतो!प्रत्येक मुक्कामी लाखभर  लोक असतात . वारकऱ्यांसाठी सारा गाव अक्षरश: सेवेला असतो. अगदी चहा, जेवण, औषधांपासून रात्री दमल्यावर पायाला तेल चोळून देण्यापर्यंत सारे सेवा करतात.

आणि हे दरवर्षी असतं.

त्या वारीला  सुधीर महाबळांनी ऐश्वर्य वारी म्हटले आहे आणि परत वारीला वैराग्य वारी .

कारण परतीच्या प्रवासात ४००/५०० च लोक असतात वारीबरोबर .

चालताना आपण एकेकटे असतो .

वाटेवरच्या  गावात त्यावेळेस कसलीही सेवा पुरविली जात नाही .

जिथे पालखी उतरलेली असते तिथे थोडीफार सोय होते .

जो प्रवास जाताना २०/२२ दिवसांचा असतो तो परतताना फक्त १०  दिवसांचा असतो त्यामुळे मुक्कामाचे थांबे पण निम्मे होतात .

रोज ३५ किलोमीटर चालायचं. रात्री  १/२ वाजताच चालायला सुरुवात करायची.

कुठे मिळेल तिथे टेकायचं काय मिळेल ते खायचं .

आता कोणीही नसतं आपल्या स्वागताला .

त्यामुळे इथे स्वार्थ अहंकार  गळूनच पडतात.म्हणून याला त्यांनी वैराग्यवारी म्हटले आहे .

वाचताना सुद्धा मन हरवून गेले त्या वातावरणात .

ते वाचल्यानंतर मनात आलं ,

खरच आपला जीवनप्रवास म्हणजे पण एक वारीच आहे की .जिथे सुरुवातीचा संसाराचा काळ … ,मी त्याला आनंदवारी म्हणेन ….किती सुखसोयी ,किती मानसन्मान, किती कोडकौतुक .

कितीही कष्ट पडले तरी रात्री येणारी  सुखाची झोप आपली होती .

रोज सांजवात लावताना तुळशीजवळ दिवा लावताना हात जोडले की देवाचा वरदहस्त  आहे आपल्या माथ्यावर याची जाणीव व्हायची. 

पण आता गाडी उताराला लागेल तेव्हा ती परतवारीच म्हणावी लागेल .

आरोग्य जे पूर्वी टिकून रहात होतं ते वेगाने आपलं आसन हलवतंय, याची जाणीव होईल  . 

आपल्या आनंद वारीत आपल्या आजूबाजूला अनेक हात आपल्या हातात होते.

त्यांच्यासमवेत रस्त्यावरील प्रवास  कसा आनंदात गात व्यतीत होत होता . 

आता एकेक हात हातातून निसटतोय .

 

परतवारीत माऊलींच्या पादुका आपल्या स्थानी परत नेण्याचे कर्तव्य असते ते भक्तीने निभावलेले असते .

 तसंच आपले सारे करणारे मदतीचे हातही फक्त कर्तव्य म्हणूनच आपली पालखी उचलतील .

 

खाण्यापिण्याचे आता लाडही  होणार नाहीत  कारण आपली वैराग्यवारी सुरु होणार आहे .

त्यात आपसूकच शरीराच्या गरजा कमी होतील. जिभेचे चोचले कमी करावे लागतील .

 

त्या  परतवारीत जसं जीवनाचं प्रखर वास्तव नजरेत आलं लेखकाच्या,तसं आता आपल्यालाही हळूहळू ही प्रखर जाणीव होत राहील .

 

पण म्हणून कुणी वारी, परतवारी थांबवत नाही .

आयुष्यातील सारे टप्पे पूर्णपणे  जगल्याशिवाय मुक्ती नाही, हे वास्तव आहे .

मग जे जगायचे ते या सुंदर  जीवनावरील प्रेमाने, त्याने दाखवलेल्या आनंदवारीतील अनेक अनुभवातून समजलेल्या त्या शक्तीचे  भक्तीभावाने ऋण मान्य करण्यासाठी तरी आनंदवारीबरोबर परतवारीही तेवढ्याच आनंदाने करायला हवी .

 

वारीमध्ये लाखो लोक असतात, तेव्हा भजन कीर्तन आणि आजूबाजूला कोलाहलअसतो. पण परतवारीत बरोबर कोणीही नसते.

 पालखीच्या आगे मागे  चालत रहायचे.

रात्रीच्या पहाटेच्या नीरव शांततेत  गहिऱ्या निसर्गाचे, पक्षांचे ,पायाखाली वाजणाऱ्या पानांचे ,अंधाराचे ,शांततेचे जे  अनुभव येतात ते माणसाला अंतर्मुख करतात, असे लेखकाने म्हटले आहे .

 

आपल्या आयुष्यातील परतवारीमध्ये पण आपण एकटेपणाच्या संगतीत  पहाटेच्या नीरव शांततेत एकट्यानेच मार्गी चालताना

असे अंतर्मुख करणारे क्षण आपणही  अनुभवणार आहोतच .

 

वारीबरोबरच परतवारीही  असते आणि इतक्या कष्टातही ती करणारेही असतात, हे कळल्यापासून तर खरंच ही वारी आणि परतवारी  म्हणजे सुद्धा जगण्याचं शिक्षण देणारे ,वारीचा आनंद घेतल्यावर परतीच्या प्रवासात मनाला समजावून हसत हसत वास्तव स्वीकारायला लावणारे ,

आपल्या मनाला शिस्त लावणारे ,

तरी परत परत ओढ लावणारे

विद्यापीठच आहे हे मान्यच झाले मला,

असं म्हणत त्यांनी समोर पाहिले .

कधी घर आलं कळालंच नाही, असं म्हणत सुमेधाबाई पर्समध्ये किल्ली शोधायला लागल्या .

लेखिका:सौ.नीलिमा लेले

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments