वाचताना वेचलेले
☆ चालता चालता मन थबकले… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
आज सकाळी फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्यापासून ५०० मीटर पुढे एक व्यक्ती खूप जलद गतीने चालत होती.
बहुदा रोज नेमाने चालत असणार.
निरखून पाहिल्यावर लक्षात आले, की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी. असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन, ही खात्री झाली. मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला अजून १ मैल चालायचे होते….. मग घरी परतायचे होते
व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू, याची पुरेपूर खात्री मला होती…
थोड्याच वेळात लक्षात आले, की आम्हां दोघांमधील अंतर कमी झाले आहे. मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते.
माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती पाहून… आणि तो क्षण आला, मी त्या गृहस्थाला पार केले, मागे टाकले.
हुर्र्ये..! हुर्र्ये…!! हुर्र्ये….!!!
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलोच की आपण!
जिंकली आपण स्पर्धा!
स्पर्धा? कसली स्पर्धा? कुठली स्पर्धा? कोणाशी स्पर्धा?
याबद्दल त्या व्यक्तीला तर काहीच माहीत नव्हते. ती या स्पर्धेचा भागही नव्हती.
मात्र जिंकण्याच्या ईर्ष्येने मीच माझा नियमित रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो. जेथून वळायचे होते, ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते.
अचानक चिडचिड होऊ लागली,
अस्वस्थता वाढली. माघारी जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता.
असेच होते ना आयुष्यातसुद्धा?
सगळे लक्ष कोण पुढे आहे,
कोण पुढे जातो आहे,
कोण पुढे जाईल?
याकडेच असते.
सहकारी? शेजारी? मित्र? नातेवाईक? यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.
मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते. या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे
“हे न संपणारे दुष्टचक्र आहे. ”
ही नशा आहे, ही झिंग आहे,
हे ध्यानात येत नाही. कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे, हेही ध्यानात येत नाही.
विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व आपण सुख गमावून बसतो.
▪️कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की!
▪️कोणाच्या तरी मुला-मुलींची लग्ने लवकर होणारच!
▪️त्यांना सासर उत्तम मिळणारच!
▪️कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच!
▪️कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणारच!
▪️तो अगदी मोठ्या पदावर असणार. त्याचा पगार गलेलठ्ठ असणारच!
▪️कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच!
▪️कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच!
▪️कोणाजवळ तरी काही तरी वेगळे, अधिक असणारच!
कुणाशी तुलना करून काहीही होत नसतं. शेवटी आपली गती ती आपली गती. आहे ते कसे उपभोगता येईल, हे पाहावे. दुसऱ्याचा तिरस्कार, द्वेष, मत्सर, असूया करून, क्लेश करून घेऊन जगणे योग्य नव्हे. स्वतः शक्य आहे तेवढे चांगले करावे. जेवढी मदत करता येईल तेवढी करावी. जमत नसेल तर आपण स्वतः स्वतःसाठी जगावे आणि कायम आनंदी राहावे.
☆ ☆ ☆ ☆
कवी: अज्ञात
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर




वेचलेले विचारमोती अस्सल!