श्री सुनील देशपांडे
वाचताना वेचलेले
☆ “माझे whatsap ज्ञान!!” – लेखिका : सुश्री नीलिमा जपे कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
गेल्या काही वर्षांत मी अभ्यास करून एवढे ज्ञान मिळवले आहे, जे मी कुठल्याही विद्यापिठाच्या पदवी साठी अभ्यास करतांना मिळवले नसेल. यासाठी मला एखाद्या विद्यापिठाने एखादी डॉक्टरेट प्रदान करावी, अशी शिफारस मी करू इच्छिते, पण ती कोणत्या विषयात द्यावी हे अजून ठरत नसल्याने घोडे अडले आहे.
खरंच मी या काही वर्षांत जगातील सर्व विषयांचा सखोल अभ्यास केला असावा असे मला वाटते आहे. मी विज्ञान, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, भाषा, गणित, धार्मिक शास्त्रे, या आणि इतर अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला आहे. जेंव्हा पासून माझ्या भ्रमणध्वनी वर whats ap हे अतिशय उपयुक्त अॅप घेतले, तेंव्हा पासून ज्ञानाची अनेक कवाडेच माझ्यासाठी जणू खुली झाली.
त्या दिवसाासून मला आलेले एकूण एक लेख मी वाचून काढले आहेत, काहींची तर पुन्हा पुन्हा पारायणे केली आहेत. काही लेख तर पिंजून काढले आहेत. आणि त्यावर होणाऱ्या चर्चांचा अभ्यास बघता विचारमंथनातून नवनीत निघावे असे एकाहून एक सरस ज्ञानकण मी वेचित असते.
मी या अॅपची शतश: ऋणी आहे, इतकी की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी याच गुरुला साक्षात दंडवत घातला.
यावरच मला बाल संगोपनाचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून धडे मिळाले, पूर्वीच्या शिक्षा कशा अगदी मानस शास्त्राला धरून होत्या हे मी जाणले. त्यापायी मला अनेकदा माझ्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करावे लागले, पण त्यात पुढे जाऊन त्यांचेच भले आहे हे उमजून मी त्याबद्दल जराही खंत बाळगली नाही. त्यातच अनेक पौष्टिक व समतोल पाककृतींचाही अभ्यास करता आला. आता त्या प्रत्यक्ष करून बघण्या इतका अवधी मिळाला नाही तो भाग अलहिदा. बऱ्याचदा बाहेरच्या पदार्थांवरच भागवावे लागले, पण ते सर्व मिळालेल्या ज्ञानामृतापुढे क्षुल्लकच, नाही का!
यावरच मला आईवडील कसे श्रेष्ठ असतात हेही कळाले, हे सर्व शिकत असताना त्यांच्याकडे जायला, अथवा संपर्क साधायला जमले नाही तो भाग वेगळा, पण आईवडील तेवढे तरी समजून घेतीलच!
संवाद कसा साधावा याचे धडे इथेच मिळाले, त्यामुळे शेजारी बसलेला दुरावला एव्हढेच नुकसान झाले दुसरे काही नाही.
कित्येक अनाथ मुले, हरवलेली कागदपत्रे माझ्यामुळे योग्य व्यक्तीला मिळाली असतील याची गणनाच नाही. Whats app मुळे माझी समाजसेवाही सुरु झाली. अनेक गरजू लोकांसम्बंधीचे लेख कधीकधी तर न वाचता देखील केवळ पुढे पाठवून मी आतापर्यन्त भरपूर पुण्य गोळा केले आहे. त्या नादात आजूबाजूच्या गरजूंकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही इतकेच.
यामुळेच मी नतमस्तक झाले आहे, कारण सतत मी मान खाली घालून काहीतरी वाचतच असते. ‘केल्याने देशाटन मनुजा येत ऐसे पांडित्य फार’अशी जुनी म्हण बाद करून ‘केल्याने व्हाट्सपायन…. …….. ‘अशी नवीन म्हण आता वापरावी असे मला वाटते.
यावरच मला कळले की माझी मराठी ही वैज्ञानिक भाषा आहे (? ) भाषा वैज्ञानिक कशी काय असू शकते असा प्रश्न ही मला कधी पडला नाही, कारण माझा w. a. वरील गाढ ( अंध) विश्वास. आपल्या देशाचे राष्ट्रगीत सर्वश्रेष्ठ ठरले हेही समजले, तेव्हाही मला प्रश्न पडला नाही की सर्वच देशाचे राष्ट्रगीत त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. पूर्वी असे मानायची पद्धत होती की जे पेपर मध्ये छापून आले ते सर्व खरे. आता मी मानते की w. a. वर येते तेच फक्त खरे.
या नादात एकच कविता वेग वेगळ्या कवींच्या नावे आली, तरी मी संशय घेतला नाही. कारण great men think alike ही उक्ती मला माहीत होती. आपल्या प्रथा परंपरा कशा विज्ञानाला धरून होत्या याचाही मी अभ्यास केला. आणि त्या सर्व परपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. अर्थात ज्ञान कण वेचण्यातून वेळ मिळाला तर!
याशिवाय आयुर्वेद, आहारशास्त्र, वजन कमी करण्यासाठी असंख्य उपाय, घरगुती औषधे इत्यादी अनेक शास्त्रे मी अभ्यासली आहेत. त्या सर्व गडबडीत माझे वजन थोडे वाढले आहे, पण कदाचित ते वाढलेल्या ज्ञानाने असू शकेल असे मी मनाचे समाधान करून घेतले आहे. व्यायामाचे फायदे वाचता वाचता व्यायाम करायला वेळच न मिळाल्याने माझे आरोग्य गमावले आहे.
हे सर्व ज्ञान मिळवून त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करायला वेळच न मिळाल्याने मी माझे उरले सुरले शहाणपण गमावून बसले आहे हाच एक लहानसा तोटा!! ज्ञान मिळवून त्यातील काय घ्यावे व काय त्यागावे ही नीर क्षीर वृत्तीच मी हरवली आहे. बाकी काही फार नुकसान नाही. काही मिळवायचे असेल तर काही तरी गमवावेच लागते ना! शहाणपण गेले पण ज्ञान तर हाती आले ना!!
लेखिका : सुश्री नीलिमा जपे- कुलकर्णी
नाशिक
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





