वाचताना वेचलेले
☆ ‘ शून्य महत्वाचे की क्षण?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆
☆
जीवनाचे 20 वर्षे वाऱ्यासारखी उडून गेली. मग सुरू झाली नोकरीची शोधमोहीम. हे नाही ते, ते नाही हे. अशी धडपड करत करत 2–3 नोकऱ्या सोडल्या, आणि एक ठरली. थोडी स्थिरता सुरू झाली.
हातात आला पहिल्या पगाराचा चेक. तो बँकेत जमा झाला आणि सुरू झाला खात्यात जमा होणाऱ्या शून्यांचा अखंड खेळ. 2–3 वर्षे पुन्हा उडून गेली. बँकेतले शून्य थोडे वाढले. वय 25 झाले.
आणि मग विवाह झाला. जीवनाची रामकथा सुरू झाली. सुरुवातीची 1–2 वर्षे मऊ, गुलाबी, स्वप्नाळू गेली. हातात हात घालून फिरणे, रंगीबेरंगी स्वप्नं पाहणे. पण हे दिवस पटकन उडून गेले.
आणि मग बाळ येणार ही चाहूल लागली. वर्षभरात पाळणा झुलू लागला. आता सारे लक्ष बाळावर केंद्रित झाले. उठणं, बसणं, खाणं, पिणं, लाड कोड…
वेळ कधी निघून गेला, समजलंच नाही.
या दरम्यान माझा हात तिच्या हातातून कधी निसटला, फिरणं-गप्पा मारणं कधी थांबलं, हे दोघांनाही कळलंच नाही.
बाळ मोठं होत गेलं. ती बाळात गुंतली, मी कामात. घर आणि गाडीच्या हप्त्यांची चिंता, बाळाची जबाबदारी, शिक्षण, भविष्याची सोय, आणि त्याचबरोबर बँकेत शून्यं वाढवायची धडपड. तिनंही स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं, मीही.
इतक्यात मी 35 चा झालो. घर, गाडी, बँकेत शून्यं, कुटुंब—सगळं होतं, तरी काहीतरी कमी जाणवायचं. पण काय, हे कळत नव्हतं. तिची चिडचिड वाढू लागली, मी उदासीन होऊ लागलो.
दिवस निघत गेले. वेळ सरकत गेला. मुलगा मोठा झाला. त्याचं स्वतःचं जग तयार झालं. कधी दहावी आली आणि गेली, कळलंच नाही. तेव्हा आम्ही दोघं चाळिशीत पोहोचलो. बँकेतली शून्यं वाढतच गेली.
एका निवांत क्षणी मला ते गेलेले दिवस आठवले. मी प्रसंग पाहून तिला म्हटलं,
“अगं, इकडे ये जरा. हातात हात घेऊन फिरायला जाऊ या. “
तिनं विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
“तुला काहीही सुचतं, इथे ढिगभर काम पडलंय आणि तुला फिरायचंय! “
कमरेला पदर खोचून ती निघून गेली.
मग आलं पंचेचाळिसावं वर्ष. डोळ्यांना चष्मा लागला. केसांनी काळेपणा सोडला. डोक्यात गुंतागुंत वाढू लागली.
मुलगा कॉलेजमध्ये. इथे बँकेत शून्यं वाढतच होती. बघता बघता त्याचं कॉलेज संपलं. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याला पंख फुटले आणि तो परदेशात उडून गेला.
तिचेही केस पांढरे होऊ लागले. कधी कधी डोकं साथ द्यायचं बंद करायचं. तिलाही चष्मा लागला. मी म्हातारा झालो. तीही वयस्कर दिसू लागली.
दोघं पंचावन्न–साठकडे जाऊ लागलो. बँकेतील शून्यांचा पत्ता नाही. बाहेर जाणं–येणं बंद झालं.
आता गोळ्या–औषधं ठरावीक वेळेला घेणं सुरू झालं. “मुलं मोठी झाली की सोबत राहतील, ” म्हणून घेतलेलं घर आता ओझं वाटू लागलं. मुलं केव्हा परत येतील, याच विचारात उरलेले दिवस जात होते.
एके दिवशी मी सोफ्यावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत होतो. ती दिवा–बत्ती करत होती. तेवढ्यात फोन वाजला. मी पटकन उचलला. समोर मुलगा होता. त्यानं सांगितलं की त्यानं लग्न केलंय आणि आता परदेशातच राहणार आहे.
त्याने हेही म्हटलं, “बाबा, तुमचे बँकेतील शून्य एखाद्या वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथे राहा. “
काही औपचारिक गोष्टी बोलून त्यानं फोन ठेवला.
मी परत सोफ्यावर येऊन बसलो. तीही दिवाबत्ती संपवून जवळ आली. मी हळूच म्हटलं,
“चल, आज पुन्हा हातात हात घालून बोलूया. “
ती लगेच म्हणाली,
“हो आले. “
माझा विश्वास बसला नाही. चेहरा आनंदाने उजळला. डोळ्यांत पाणी आलं. अश्रू गालांवर ओघळले. अचानक डोळ्यांची चमक हरवली आणि मी कायमचा शांत झालो.
ती पूजा संपवून माझ्या जवळ आली. म्हणाली,
“बोल, काय म्हणत होतास? “
पण मी काही बोललो नाही. तिनं माझ्या शरीराला स्पर्श केला. शरीर पूर्ण थंड झालं होतं. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो.
क्षणभर ती शून्य झाली.
“काय करू? “
तिला काही सुचेनासं झालं.
पण दोन मिनिटांतच ती सावरली. हळूहळू उठली, देवघरात गेली, एक अगरबत्ती लावली. देवाला नमस्कार करून परत आली.
माझा थंड झालेला हात हातात घेतला आणि म्हणाली,
“चल, कुठं फिरायला जायचंय तुला? काय गप्पा मारायच्या आहेत तुला? सांग! “
असं म्हणताना तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. माझं डोकं तिच्या खांद्यावर झुकलं. बाहेर अजूनही थंड वारा वाहत होता.
हेच का जीवन?
सगळे आपलं नशीब घेऊनच जन्माला येतात. म्हणून थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. जीवन आपलं आहे, तर जगण्याची पद्धतही आपली असली पाहिजे.
सुरुवात आजच करा, कारण उद्या कधीच येणार नाही…
” तुम्हाला काय वाटतं… बँकेतले शून्य महत्त्वाचे आहेत की एकत्र घालवलेले क्षण? “
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



