? वाचताना वेचलेले ?

☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

ही कथा आहे ‘१३ लाख रुपये दहा रुपयांच्या बदल्यात’ची.

एका व्यावसायिकाने नुकतेच दुकान उघडले होते. तेवढ्यात एक महिला आत आली आणि म्हणाली,  “सेठ,  तुमचे दहा रुपये घ्या…! “

व्यावसायिकाने त्या गरीब महिलेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले,  जणू काही त्याची नजर विचारत होती,  “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले? “

बाई म्हणाली,  “काल संध्याकाळी,  मी वस्तू खरेदी केल्या तेव्हा मी तुम्हाला शंभर रुपये दिले. ७० रुपयांचा माल खरेदी केला. तुम्ही मला ३० रुपयांऐवजी ४० रुपये परत दिले. “

 व्यापाऱ्याने दहा रुपये कपाळावर लावले,  नंतर ते परत त्याच्या कॅश बॉक्समध्ये ठेवले आणि म्हणाला,  “मला सांग ताई,  वस्तू खरेदी करताना तू खूप वाटाघाटी करत होतीस. किंमत पाच रुपयांनी कमी करण्यासाठी तू खूप वाद घातलास आणि आता तू हे दहा रुपये परत करायला आली आहेस! ”

महिलेने उत्तर दिले,  “किंमत कमी करून घेणे,  हा माझा अधिकार आहे. पण एकदा सौदा झाला की,  त्या वस्तूचे कमी पैसे देणे हे पाप आहे. “

तो व्यापारी म्हणाला,  “पण,  तू कधी कमी पैसे दिलेस? तू पूर्ण पैसे दिलेस. हे दहा रुपये चुकून तुझ्याकडे गेले. तू ते ठेवले असतेस तर मला काही फरक पडला नसता. ”

ती महिला म्हणाली,  “तुम्हाला काही फरक पडत नसेल. पण माझ्या मनात नेहमीच हा सल असता की,  मी तुमचे पैसे जाणूनबुजून घेतले. म्हणूनच मी काल रात्री ते परत करायला आले होते. पण तुमचे दुकान त्यावेळी बंद होते. “

व्यापाऱ्याने त्या महिलेकडे आश्चर्याने पाहत विचारले,  “तू कुठे राहतेस? ”

ती म्हणाली,  “मी सेक्टर ८ मध्ये राहते. ”

त्या व्यापाऱ्याचे तोंड वासले गेले.

तो म्हणाला,  “तुम्ही ७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात,  मला हे दहा रुपये देण्यासाठी? “

त्या महिलेने सहज उत्तर दिले,  “हो,  मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले. माझा नवरा आता या जगात नाही,  पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण एखादा माणूस गप्प राहू शकतो,  पण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते. “

हे सांगून ती महिला निघून गेली.

व्यापाऱ्याने ताबडतोब कॅश बॉक्समधून तीनशे रुपये काढले आणि नोकराला म्हणाला,  “तुम्ही दुकान सांभाळा,  मी लवकरच परत येईन. ” तो व्यापारी बाजारातल्या एका दुकानात पोहोचला. दुकानदाराला तीनशे रुपये देत म्हणाला,  “प्रकाशजी,  तुमचे तीनशे रुपये घ्या. काल,  तुम्ही सामान खरेदी करायला आलात,  तेव्हा बिलाचे जास्त पैसे भरले. ”

प्रकाश हसून म्हणाला: ” मी जास्त पैसे दिले होते,  ते मी पुन्हा दुकानात आलो असतो,  तेव्हा तुम्ही ते मला देऊ शकला असता! पण इतक्या सकाळी तुम्ही मला तीनशे रुपये द्यायला आलात.”

व्यापारी म्हणाला,  ” तुम्ही पुन्हा कधी आला असता? तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला माहीत नव्हते की,  माझ्याकडे तुमचे तीनशे रुपये आहेत! बरोबर ना? म्हणूनच ते देणे आवश्यक होते. देव कधी हिशोब मागेल हे मला माहीत नाही… आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात…! “

तो व्यापारी निघून गेला होता.

पण प्रकाशचे मन अशांत होते.

दहा वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. पण पैसे परत करण्याअगोदर त्याचा मित्र मरण पावला.

त्याच्या मित्राच्या कुटुंबाला त्या पैशांची काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच कोणीही ते परत मागितले नव्हते.

प्रकाश लोभात बुडाला होता. म्हणून त्यानेही ते परत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आज त्याच्या मित्राचे कुटुंब गरिबीत जगत होते. त्याची पत्नी लोकांची घरे झाडून,  पुसून मुलांना वाढवत होती. तरीही,  प्रकाशने त्यांच्या पैशावर डल्ला मारला होता.

“देव कधी न्याय मागेल हे मला माहीत नाही.. आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात… ” सेठचे हे शब्द ऐकून प्रकाश घाबरला होता. तो दोन-तीन दिवस तणावात राहिला.

शेवटी,  त्याचा विवेक जागृत झाला. त्याने बँकेतून तेरा लाख रुपये काढले आणि ते देण्यासाठी मित्राच्या घरी गेला.

त्याच्या मित्राची पत्नी घरी होती. ती तिच्या मुलांसोबत गप्पा मारत बसली होती. तेव्हाच प्रकाश आला. तिच्या पाया पडला.

त्या विधवेसाठी,  जी एकेक रुपयासाठी झगडत होती,  १३ लाख रुपये खूप मोठी रक्कम होती.

ते पैसे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले.

ती प्रकाशला आशीर्वाद देऊ लागली,  ज्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले होते!

ही तीच महिला होती जी एका व्यावसायिकाला त्याचे दहा रुपये परत करण्यासाठी दोनदा गेली होती!

कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची देव नक्कीच परीक्षा घेतो. पण तो त्यांना कधीही सोडत नाही. एक दिवस तो नक्कीच न्याय करतो. देवावर विश्वास ठेवा!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments