सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ झापडं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
मला आठवतंय् माझ्या लहानपणी आम्हाला गावातल्या गावात कुठे जायचं असलं, तर आम्ही कितीदा तरी टांग्याने जायचो. आत्तासारखा तेव्हा रस्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचा सुळसुळाट नव्हता… आणि माणसांचाही… मुळात गावंच काय पण शहरंही एवढी विस्तारलेली नव्हती… आणि नागरिकांची संख्याही. त्यामुळे रस्त्यातून टांगे अगदी आरामात फिरायचे. त्या टांग्यातून प्रवास करतांना एक वेगळीच मजा यायची. वाटलं तर मागच्या बाजूला बसा… मनात आलं तर टुणकन् उडी मारून पुढे टांगेवाल्याजवळ जाऊन बसा… मज्जा यायची खूप. कुठे बघावं आणि कुठे नाही असं होऊन जायचं अगदी. पुढे बसलं की मग घोड्याचं निरीक्षण करता यायचं आणि पावलागणिक एका विशिष्ट लयीतलं त्याचं चालणं…त्याचं मान हलवणं…शेपूट हलवणं…या सगळ्याच गोष्टी लक्ष वेधून घ्यायच्या. वय थोडं वाढल्यावर त्याच्या डोळ्यांना बांधलेल्या झापडांकडेही आवर्जून लक्ष जायचं, आणि मनात यायचं की मनात आणलं तर स्वैर उधळू शकणारा हा घोडा ती झापडं कशी काय बांधून घेत असेल? … सहन करत असेल? मुळात त्यालाही चौफेर बघण्याचा जन्मजात हक्क असतांना, का झापडं लावून त्याची नजर अशी ‘बंदिस्त’ करून टाकत असतील…‘त्याने फक्त समोरचा…त्या झापडांमधून दिसेल तेवढाच रस्ता पहावा…उधळू नये म्हणून…’ हे त्या प्रश्नाचं उत्तर असायचं.
हळूहळू अतिशय सोयीची वाटणारी इतर अनेक वाहने आली, आणि टांगे कालबाह्य झाले. आम्हीही रिक्षा वापरायला लागलो… गाड्या वापरायला लागलो… टांगे विसरलो… पण कुठे एखादा घोडा दिसला की त्याच्या डोळ्यांना झापडं आहेत का हे बघण्याचं खूळ मात्र डोक्यातून गेलं नाही.
… काल असाच एक उगीचच इकडेतिकडे फिरणारा घोडा पाहिला. अगदीच हडकुळा-निकामी झाल्यामुळे मालकाने सोडून दिला असावा…झापडं अर्थातच नव्हती. शांतपणाने फक्त खाद्य शोधत फिरत होता…का कोण जाणे.. पण त्याच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद.. ’आता मी मला हवं तसं वागायला मुक्त आहे’ असे काहीसे भाव दिसताहेत असं मला नक्कीच वाटून गेलं.
…. या असल्या विचारांनी भरकटणारं मन कसंतरी आवरलं खरं…पण ‘झापडं’ काही विसरता येईनात… बरंय ना माणसांना अशी झापडं लावून फिरावं लागत नाही हा विचार मनात आला आणि मन परत भरकटायला लागलं… मनात विचारांची भिरभिर सुरू झाली… बघता बघता ती वाढतच गेली… खरंच का माणसांना झापडं नाहीत…? डोळ्यांना तरी लावलेली नसतात. पण त्यांच्या मनाला…? विचारांना…? आणि दिसायला लागली.. झापडं लावून फिरणारी असंख्य माणसं… खरं तर बहुतेक सगळीच.
अमुक एक गोष्ट अशीच करायची…तशी अजिबात नाही…हे आई-बाबांनी लहानपणीच आपल्या बुध्दीला आणि विचारांना लावलेलं पहिलं झापड… तेव्हा त्या वयांत म्हणजे ‘विचार’ या शब्दाचा अर्थ न कळण्याच्या वयात ती झापडं गरजेची असतात हे खरं… पण स्वत:च्याही नकळत ती इतकी सवयीची होऊ लागतात की तो स्वत:चा एक अंगभूत भाग झाला आहे, हे पुढे कधीही लक्षातच येत नाही… वयाबरोबर मग ही झापडं आहेत हेही जाणवेनासं होतं… त्यांची संख्या झपाट्याने वाढत रहाते… आणि गंमत म्हणजे ही गोष्टही अजिबात लक्षात येत नाही.
खरं तर मन…विचार म्हणजे उधाणवारा…निर्बंध असा एक प्रवासी…बऱ्याचदा दिशा चुकून भरकटणारा. त्याला जागेवर आणणाऱ्या विचारांची झापडंच आवश्यक ठरतात मग. पण माणसाचं वय वाढतं तसतसा तो या झापडांच्या ‘साथीने’ ग्रासला जातो… एखाद्या चिवट आजारासारखा… बऱ्याचदा कायमचा…म्हणजे झापडांशिवाय जगूच शकत नाही मग तो.
लहानपणीचा निरागस-निष्पापपणा बघता बघता हरवतो, तसतशी झापडांची संख्या दिवसागणिक वाढत जाते. पहिलं झापड लागतं ते ‘मी’चं… मी… माझं… माझ्यापुरतं… या विचारांच्या घट्ट पट्ट्यांनी आवळून बांधलेलं. आणि अर्थातच् हे असतं स्वार्थाचं झापड. ‘इतरांशी मला काय देणं-घेणं आहे’ हा विचार नकळत रस्ता दाखवायला लागतो. तेवढाच त्या झापडातून दिसतो. आणि मग त्या रत्यावरून अशी झापडं जणू पडू नयेत म्हणून घट्ट सांभाळत वेगाने उधळल्यासारखं जातांना स्वत:च्या आयुष्याची दिशा कधी…कशी बदलते हे कधीच कळत नाही. मग ‘मी’ पाठोपाठ ओघानेच येतात इतर कितीतरी झापडं… मी… माझी बायको… माझी मुलं… माझं घर… माझी नोकरी… माझं सुख… माझं स्वास्थ्य! इतरांपेक्षा मी मोठा… श्रीमंत… सर्वतोपरी वरचढ कसा होईन या स्वार्थी विचाराचं झापड तर फारच जड. या अशा झापडांना मग स्वतःच्याही नकळत ‘अहंभाव‘ जोपासणारे.. गोंजारणारे विचार एखाद्या अस्तरासारखे कायमचे चिकटतात. एकदा विचार या असल्या झापडात घट्ट बांधले गेले की नजरही आंधळी होते बहुधा… पाय नेतील त्या वाटेने आपण भरकटल्यासारखे चाललोय् हेही लक्षात येत नाही… मग मनाला…विचारांना सद्सद् विवेकबुध्दीचा लगाम घालता येणं ही गोष्ट तर अशक्यच होऊन जाते. आजूबाजूचं काहीच दिसेनासं होतं… मग रस्ता चुकतोय का ही शंकाही येईनाशी होते.
काय होतं की अशी झापडं इतकी नकळत आपणहून आपण लावून घेतो की आपण झापडं लावली आहेत हेच मुळात लक्षात येत नाही.. रहात नाही. कारण आपण नेमके कसे आहोत याचा विचारच आपण कधी करत नाही. मग लावलेली झापडं आपल्याला सूट होताहेत की नाही, त्याचा आपल्याला मानसिक काही त्रास होतो आहे का? – की केवळ दुसऱ्या कुणीतरी ती तशी लावली आहेत म्हणून निष्फळ स्पर्धेच्या हेतूने आपणही ती लावतो आहोत? — असले विचार करण्याची गरजच जाणवत नाही. मग त्या बाबतीत ‘ अंगापेक्षा बोंगा जड ‘ असं तर होत नाहीये ना हा विचार मनात येतच नाही.
एक वेळ असं मान्य केलं की, झापडं लावणं ही गोष्ट काही काळासाठी अनिवार्य असू शकते, तरी एरवी आपली जन्मजात कुवत काय.. आवाका किती.. वजन पेलण्याची आपली ताकद किती.. या गोष्टींचा निदान स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करणं अत्यावश्यक आहे ना! तो न करता निव्वळ इतरांशी बरोबरी करणं.. अनावश्यक स्पर्धा करणं.. केवळ यासाठीच स्वतःला न पेलणारी झापडं लावायची का? जी माणसं आयुष्यात अपयशी झालेली दिसतात ना त्यांच्या अपयशाचं कारण बहुतेक वेळा त्यांनी स्वतःला न पेलणारी झापडं लावलेली असतात हेच असतं आणि त्यात चूक झापडांची नसते.. एकतर घोडदौड करण्यासाठी त्या माणसांनी चुकीचा रस्ता निवडलेला असतो.. आणि इप्सित साध्य करण्यासाठी भार पेलण्याच्या स्वतःच्या कुवतीपेक्षा जास्त वजनाची झापडं स्वतःच बांधून घेतलेली असतात. मग रस्ता कितीही चांगला असला तरी ठेचकळायला.. धडपडायला होणारच.. पळण्याचा वेग कमी होणार.. मग उद्दिष्ट गाठणार कधी आणि कसं??
ही आंधळी वाटचाल इप्सित ठिकाणी पोहोचली तर नशीबच म्हणायचं… पण दुर्दैवाने मध्येच ती वाट चुकली…भरकटली तर? …तर काय…हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावणं…अशीच अवस्था होते… मग त्यावेळी दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न पडतो… झापडांना दोष देता येतो सहजपणे… पण त्यांची काय चूक असते? ती चूक झापडं स्वत:साठी निवडणाऱ्यांची… स्वत:च्या हातांनी डोळ्याला बांधणाऱ्यांची असते… झापडं तर बिचारी निर्जीव… स्वत:चं काहीच म्हणणं नसणारी. आपण कुणाला कुठे कधी कसं बांधून घ्यायचं याचं स्वातंत्र्य तर नसतंच त्यांना… पण रस्ता चुकला तर खापर मात्र स्वतःच्याही नकळत झापडांवरच फोडलं जातं…ती बांधणाऱ्यावर नाही…आणि हा तर सरासर अन्याय आहे…
काही झापडांबद्दल तर जितकं बोलावं तितकं कमीच… असंच हे एक मनातलं पण मनालाच कधी जाणवत नाही असं झापड.. श्रद्धेचं.. जणू वंशपरंपरागत मिळालेलं.. इतकं घट्ट चिकटलेलं की जणू अंगाचाच एक भाग असावा. अर्थात हे झापड नसावंच असं अजिबात नाही…असहाय्यतेनं कोलमडू पाहणारं मन या झापडाने सावरू पहातं.. सावरतंही बरेचदा. मनाला नकळत आधार देणारंच असतं ते. पण अनेकांच्या बाबतीत बरेचदा असं दिसतं की त्याने नजरेबरोबर विचारांनाही पूर्ण झाकोळून टाकलेलं असतं.. बऱ्याच श्रद्धा कशा असतात.. तर खूप जुन्या गोष्टी आपण वर्षानुवर्षे अगदी जपून ठेवतो तशाच … पण अशा वस्तू आपल्याही नकळत कालबाह्य झालेल्या आपल्या लक्षातही येत नाही.. म्हणजे खरं तर तसा विचारच आपण कधी करत नाही. आणि अशी झापडं कितीही त्रासदायक वाटली तरी आपण कशीतरी.. वेळी उरस्फोड करूनही पेलत रहातो. ‘ बापरे हे इतर लोक अमुक तमुक गोष्ट करताहेत.. मग मीही तसंच करायला हवं ‘ या असल्या विचाराची भीती श्रद्धेच्या झापडाला मग इतकी घट्ट चिकटते की दृष्टीबरोबर विचारही फक्त अधू नाहीत तर पार आंधळे कधी होतात ते स्वतःलाच समजत नाही. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की प्रत्येकाची कुठेतरी.. कशावर तरी श्रद्धा असणं स्वतःला सावरण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे.. तरी पण बदलत्या काळाबरोबर चालतांना एखाद्या सायकलसारखं त्यांचंही Overhauling आपणच निदान आपल्यापुरतं तरी नक्कीच करायला हवं.. झापड श्रद्धेचंच पण.. त्यातले जुने कालबाह्य झालेले पार्टस काढून कालानुरूप नवे बसवायलाच हवेत असं मला ठामपणे वाटतं…. अर्थात हे माझं व्यक्तिशः मत झालं.
… या असल्या विचारात चालतांना मी मात्र रस्ता विसरले… चुकले, आणि घरी पोहोचण्याऐवजी, जिथून निघाले होते तिथेच परत जाऊन थांबले… केवळ उगीचच इकडेतिकडे पाहिल्यामुळे लक्ष विचलित होऊन चुकीच्या रस्त्यावर जाऊ नये याच एकमेव हेतूने घोड्याला जी फक्त त्या प्रवासापुरती हलकीशी झापडं लावलेली असायची.. निदान तशी तरी मला.. माझ्या भरकटणाऱ्या विचारांना.. आणि माझ्या सतत चंचलपणे मुक्त बागडणाऱ्या मनालाही लावायला हवीत का बहुतेक आता? … असो.
©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





खूप सुंदर लेख लिहिता मंजूषा ताई तुम्ही!आजचा पण सुंदरच!