श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- पुढं जे काही घडलं ते सगळं आपसूकच घडत जावं तसंच आणि कधी कल्पनाही केली नव्हती असं एक अनपेक्षित वळण येताच मी थबकलो. इथं वळायचं की आहे त्याच मार्गाने पुढं जायचं या माझ्या क्षणकाळाच्या द्विधा मन:स्थितीत ‘तो’ स्वतःशीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी… माझ्याजवळ! कारण पुढे जे घडत गेलं ते प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं असंच सगळं..!! )

स्वेच्छानिवृत्ती घ्यायचा माझा अट्टाहास नव्हता, पण आयुष्यात क्वचितच येणारी एकमेव संधी या दृष्टीने मी त्याकडे पहात होतो. या योजनेच्या अतिरिक्त आर्थिक मोहात न पडता, मिळू शकणारे ते लाभ माझ्या सर्व जबाबदाऱ्या विनासायास पार पडण्यासाठी पुरेसे आहेत कां याचाच विचार करणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे होते. सलिल आणि आरतीने जेव्हा नि:शंकपणे संमती दर्शवली त्यानंतर माझ्या विचारांना या दिशेने चालना मिळाली आणि मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक असल्याने मी हे कितपत फायदेशीर ठरेल हे पहायला सुरूवात केली.

या योजनेतील वरवर जाणवणारे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येकाच्या शिल्लक राहिलेल्या नोकरीच्या मुदतीच्या अर्ध्या कालावधीचा पूर्ण पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता. या हिशोबाने माझ्या उर्वरित नऊ वर्षांच्या कार्यकाळाच्या निम्म्या म्हणजे साडेचार वर्षांच्या पगाराची रक्कम अतिरिक्त लाभ म्हणून मला मिळणार होती. त्या रकमेचे मासिक व्याज माझ्या त्यावेळेच्या पगारापेक्षा थोडे जास्तच येत होते. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार केला तर मला ते सोयीचे आणि पुरून उरणारेच होते. शिवाय माझे घरापासून लांब, एकटा राहिल्याने होणारे अतिरिक्त सर्व खर्च जे दरमहा माझ्या पगाराच्या निम्म्या रकमेइतके होते ते वाचणार होते. शिवाय नोकरीतल्या जबाबदाऱ्यांची कायम मनात असणारी व्यवधानं आणि दडपणं नाहिशी होणार होती आणि त्यासाठी द्यावा लागणारा रोजचा दहा- बारा तासांचा वेळ हा माझ्यासाठी पूर्ण मला हवा तसा व्यतित करण्यासाठी मोकळा मिळणार होता जे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं होतं!

असे सगळेच घटक निदान माझ्यापुरते तरी सर्वार्थाने सोयीचे होते तसेच फायद्याचेही! नकारात्मक म्हणता येईल अशी एकच गोष्ट होती ती म्हणजे बॅंकांमधे पूर्वी पेन्शन योजना आस्तित्त्वात नव्हती. तरीही सुरुवातीपासूनच आपला जॉब पेन्शनेबल नाही हे गृहित धरूनच मी माझे आर्थिक नियोजन केलेले होते. त्यानंतर १९९६ मधे सर्वप्रथम पेन्शन योजना बँकांसाठी लागू करण्यात आली होती. ती ऐच्छिक होती. त्यामुळे ती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय अर्थातच खुला होता. आणि त्या वेळच्या हिशोबानुसार पेन्शन पर्याय न स्विकारता बऱ्याच जणांनी आणि मीही पीएफ् चा पर्यायच स्वीकारला होता. अर्थात पेन्शन नसणे हा योग्य अशा आर्थिक नियोजनामुळे माझ्यासाठी तरी तसा गौण मुद्दा होता. अर्थात स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर उच्चाधिकार पदांवरील बऱ्याच जागा रिक्त होणार असल्याने मागे राहिलेल्यांसाठी पुढच्या प्रमोशनच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार होत्या हे खरे, पण त्यामुळे वाढणाऱ्या अधिकारांबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि मला हव्यास नसणाऱ्या अॅमिनीटीज् भरपूर पण टॅक्सेशनचा विचार करता मिळणारे आर्थिक लाभ मात्र तुलनेने अतिशय नगण्य ही वस्तुस्थिती होती.

अर्थात इतर बऱ्याच जणांना या ना त्या कारणाने या योजनेचा फायदा घेता येणार नव्हता त्यामुळे त्याचे शल्य मनात घेऊनच उर्वरित काळ इच्छा नसूनही त्यांना शेवटपर्यंत नोकरी करणं क्रमप्राप्त होतं!

अशा रीतीने या सर्व बाबींचा विचार करून नोकरी चालू ठेवणे अधिक तोट्याचे आणि गैरसोयीचे होते याची खात्री झाल्यानंतर मी

स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करायचे निश्चित केले. घरी आई, आरती आणि सलिल यांना यासंदर्भातल्या सर्व हिशोबांची आणि माझ्या नियोजनाची सविस्तर कल्पना देऊन त्यांचे समाधान झाल्यानंतर माझा अर्ज तयार केला. तरीही तो सबमिट करण्यापूर्वी वखरे साहेबांना माझ्या निर्णयाची पूर्वकल्पना देणे मला आवश्यक वाटले. मी माझा अर्ज सोबत घेऊन साहेबांच्या केबिनमधे गेलो पण त्यामुळे माझ्या या संकल्पात अडसर निर्माण होऊ पहातोय याची मला कल्पना कुठं होती?

मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी मला बसायची खूण केली. मी त्यांचं बोलणं संपायची वाट पहात बसलो खरा पण फोन महत्त्वाचा होता हे वखरे साहेबांच्या अदबीने बोलण्यावरून आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून माझ्या लक्षात आले. आपण नंतर यावे असा विचार करून मी खुर्ची मागे सरकवून उठलो तेवढ्यांत त्यांनी बसायची खूण केली. पुढे कांही मिनिटातच फोनवरचं बोलणं संपलं तसं रिसिव्हर ठेवून ते क्षणभर शांत बसून राहिले आणि मग माझ्याकडे पहात सहज विचारल्यासारखं म्हणाले,

“फोन कुणाचा होता सांगा बरं…? “

“सेंट्रल ऑफिस? “

“एम्. डी. हिमसेल्फ वाॅज आॅन द लाईन… ” पाण्याचा ग्लास हातात घेत त्यांनी सांगितलं.

“कां? .. कांही प्राॅब्लेम..? “

“आपल्या ऑफिसपुरता तरी काही प्रश्न नसणाराय हे नशीब माझं. ” ते कांहीसे रिलॅक्स होत म्हणाले.

“म्हणजे? ” मला कांही अंदाजच येईना.

” आपल्याला डिपॉझिट, ॲडव्हान्सेस, रिकव्हरी.. अशी डोईजड टार्गेट्स दिली जातात ना नेहमी? आताही त्यांनी एक वेगळंच टार्गेट दिलंय. आश्चर्य म्हणजे ते ‘निगेटीव्ह टार्गेट’ आहे. पण ठीक आहे. फार टेन्शन घ्यावं असं कांही नाहीय. “

“निगेटिव्ह टार्गेट? म्हणजे? “

ते हसले.

“नुकत्याच आलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या सर्क्युलरच्या संबंधातलं टार्गेट.. “

“म्हणजे? “

अतिरिक्त स्टाफची संख्या कमी करण्यासाठी ही योजना तयार केलेली असली तरी त्यामागे अनप्राॅडक्टीव्ह स्टाफसंख्या कमी करण्याचा प्रमुख उद्देश आहे. तरीही कायदेशीर आक्षेप घेतले जाऊ नयेत म्हणूनच केवळ ती सरसकट सर्वांसाठी खुली ठेवली गेलीय हे मला माहित होतं पण..

” पण यासंदर्भातलं ‘निगेटिव्ह टार्गेट’ म्हणजे काय ते नाही समजलं.. ” मी साहेबांना माझी शंका विचारली.

” त्या संदर्भातच सगळं फोनवर ऐकवून झालंय” ते हसत म्हणाले, ” त्याचं काय आहे, नुकत्याच झालेल्या एक्झिक्युटिव्ह प्रमोशन प्रोसेसमधले रिसेण्ट प्रमोटीज् आहेत ना तुमच्यासारखे ते बॅंकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अॅसेटस् आहेत. त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यापासून परावृत्त करण्याची सूचना एम्. डी. नी आम्हा सर्व झोनल हेडस् ना दिलीय. त्यापैकी कुणीही ही स्वेच्छानिवृत्ती स्विकारू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. या अर्थाने आपल्या झोनसाठी मला दिलं गेलेलं हे ‘निगेटिव्ह टार्गेट’च ना? “

वखरे साहेबांचं बोलणं त्यांच्या नकळत माझ्या निर्णयात मोठ्ठा अडसर निर्माण करणारं होतं. माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायलाच मी आलेलो असताना नेमका त्यातच हा अडसर निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तो अर्ज आत्ताच देणं मला योग्य वाटेना. न द्यावा तर मी इथे कां आलो होतो हा प्रश्न निर्माण होणार होताच. मनातली ही अनिश्चितता मनात तशीच घेऊन मी जायला उठलो..

“अरे, बसा ना, बोला, तुम्ही कां आला होतात? ” वखरे साहेबांनी विचारलंच.

आता मात्र खरं कारण सांगणं मला अवघड वाटेना….

” मी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलंय. ते सांगायलाच मी आलो होतो. ” मी मोकळेपणानं सांगून टाकलं.

ते अविश्वासाने पहातंच राहिले.

” तुम्ही आणि स्वेच्छानिवृत्ती? चेष्टा करताय कां माझी? ” त्यांचा आवाज थोडा चढल्या सारखा वाटला.

“नाही सर. खरंच सांगतोय. ” मी म्हंटलं, आणि सोबत आणलेला माझा अर्ज मी त्यांच्यासमोर ठेवला.

त्यांनी तो हातात घेऊन त्यावरून झरझर नजर फिरवताना त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला अस्वस्थ करीत राहिले. तो अर्ज घडी घालून मला परत देत ते म्हणाले,

” हा सध्या तुमच्या जवळच राहू दे. यू प्लीज गिव्ह सेकंड थाॅट टू युवर डिसिजन. आपण यावर सविस्तर बोलू नंतर. मग ठरवू काय करायचं ते. ” ते शांत पण ठाम स्वरात म्हणाले.

त्यांचं म्हणणं मला स्विकारता येईना न् डावलताही.

” ठीक आहे. आपण बोलू नंतर ” असं म्हणत त्यांनी पुढे केलेला तो अर्ज मुकाट्याने परत घेऊन मी केबिनमधून बाहेर आलो.

जे सुरळीत पार पडणार हे मी गृहितच धरलं होतं ते गृहितच असं चुकीचं ठरलं होतं. त्यामुळं जे सहजसाध्य वाटत होतं तेच अप्राप्य ठरत असल्याचं लक्षात येताच माझी चलबिचल सुरू झाली. जे घडेल ते आपल्या हिताचंच असेल हा विश्वास मनात असूनही आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जातं असल्याची रूखरूख माझं मन अस्वस्थ करीत राहिली.

आता यातून अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे अखेर ‘तो’च तर ठरवणार होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments