सौ. जयश्री पाटील

🔅 विविधा 🔅

☆ शंभर रुपये आणि चांदीची वाटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

जगामध्ये काही चांगली माणसं आहेत म्हणून हे जग चाललेलं आहे. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. किंवा खरोखर अनुभवतो सुद्धा. डॉ. सुजित भरत पाटील यांचा “ते शंभर रुपये “हा लेख वाचला आणि अगदी तसाच काहीसा प्रसंग मी अनुभवला तो मला आता लिहावासा वाटतो. प्रसंग अगदी असाच माणसा माणसातला फरक जाणून देणारा. 27 आणि 28 जानेवारी 2026 या दोन दिवशी आमच्या गावाकडची देवीची यात्रा होती. 28 जानेवारीला देवीचा प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. जेवण झाल्यामुळे घरी जायची गडबड नव्हती. समोर लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल लागलेले होते. मी सुद्धा नातीसाठी काहीतरी घ्याव म्हणून खेळण्यांच्या स्टॉल कडे गेले. खूपच लहान मुलांची खेळणी होती. त्यामुळे दुसरी मध्ये शिकणाऱ्या माझ्या नातीसाठी मी एक मोठा बॉल घेतला. माझी पहिलीच भवानी असल्यामुळे त्याच्याकडे मला परत द्यायला सुट्टे पैसे नव्हते. माझ्याकडे त्यावेळी दोनशे रुपये होते. त्यातली शंभर रुपयाची नोट मी त्याला दिली आणि पन्नास रुपये परत मिळण्याची वाट बघत होते. त्यावेळी मी उरलेले शंभर रुपये रुमालाच्या अगदी वरच्या कोपऱ्यात ठेवले होते.

“थोडं थांबा मॅडम पैसे देतो “असे म्हटल्यामुळे मी आणखीन खेळणी बघू लागले. खाली वाकून खेळणं घ्यायचं. बघायचं कसं आहे आणि परत जागेवर ठेवून दुसर खेळण घ्यायच. असं मी बऱ्याच वेळा केले. त्यानंतर त्याने माझे पन्नास रुपये दिले आणि मी आमच्या घरच्या स्त्रियांबरोबर घरी आले. कुलूप उघडेपर्यंत मी कट्ट्यावर बसले आणि सगळे पैसे एकत्र ठेवायचे म्हणून रुमाल उघडला. तर त्यात शंभर रुपये नव्हते. माझ्या लक्षात आले की बहुतेक खेळण्यांच्या तिथे पडले असावेत. मी आमच्या घरी आलेल्या एका पाहुणीला घेऊन पुन्हा खेळण्यांच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. पैसे मी नीट ठेवले नाहीत. माझ्या निष्काळजी पणामुळे ते पडले याचा दुःख माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. तिथे जाऊन मी खेळणी उलटी पालटी करून बघू लागले. तो खेळणी वाला म्हणाला, “मॅडम काय पाहिजे “मी म्हणाले “मघाशी माझे शंभर रुपये बहुतेक इथे पडले आहेत. “स्टॉल वाला 30 -32 वर्षाचा तरुण मुलगा होता. तो हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणाला, “हो हो आहेत माझ्याकडे पैसे. मला सापडले ते. ” हे ऐकल्यानंतर मला खूप हायस वाटलं. आणि माझ्या लक्षात आलं की तो माझी ही रिएक्शन टिपण्यासाठी माझ्याकडे एक टक बघत होता आणि अतिशय गोड हसत होता. “थँक गॉड “मी म्हणाले. थँक्स असे मी त्याला दोन-तीन वेळा म्हणाले. तो म्हणाला, “मॅडम असू दे हो. दिवसभर कष्ट करून जे पैसे मिळतात त्यात आम्ही समाधानी आहे. आम्हाला दुसऱ्यांचे पैसे कशाला हवेत. घरी गेल्यानंतर शांत झोप येते हे महत्त्वाच आहे. पण मॅडम पैसे नीट सांभाळून ठेवत जावा बरं का. ” मी त्याला हो हो म्हटले आणि तिथून निघाले. मला राहून राहून वाटत होते की जगात काही चांगली माणसं आहेत म्हणून जग चालते. असा प्रामाणिकपणा खूप दुर्मिळ असतो. त्याचबरोबर मलाही पैसे नीट जपून ठेवायला हवेत याची जाणीव झाली. एक मोठा अनुभव येऊनही माझ्याकडून पुन्हा पुन्हा चुका होतात याचे कधीकधी मला आश्चर्य वाटते. या प्रसंगा बरोबरच सहा महिन्यापूर्वी श्रावणामध्ये घडलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळला. माझ्याकडे भिशी होती. श्रावण महिना आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणींना जेवणाचे आमंत्रण दिले. आणायसे श्रावण महिना आहे तर सवाष्णी घालूयात असा विचार केला होता. मैत्रिणी बरोबर सव्वा बारा वाजता घरी आल्या. पण हे सगळं करायच्या नादात माझी पूजा राहिली होती. पण आता एवढ्या सगळ्या गोंधळात शांतपणे पूजा होणार नाही म्हणून मी या सगळ्या गेल्या की पूजा करू आणि नंतर जेवण करू असा विचार केला. मी पूजेची चांदीची भांडी धुतलेली तिथेच किचनमध्ये ठेवली होती. माझ्या सुनबाई सर्विसला गेल्यामुळे दोघी चौघीं मैत्रिणींचा मदतीसाठी म्हणून वावर किचन मध्ये होता. त्यांच्या नजरेला ती भांडी पडलेली होती. सगळ्या सवाष्णींना जेवण दिले. एक छोटासा गेम ही घेतला आणि नंतर त्या सगळ्या घरी गेल्या. मी पूजा करण्यासाठी ताम्हण हातात घेतले तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यातली चांदीची वाटी गायब झाली आहे. वाटी बऱ्यापैकी मध्यम आकाराची होती. मला प्रचंड धक्का बसला. मी सगळीकडे शोधाशोध केली. पण वाटी काही सापडली नाही. मी देवाची पूजा नीट करू शकले नाही. तसेच मी जेवनही नीट करू शकले नाही. माझा मैत्रिणींवरचा विश्वासच उडून गेला. मी खूप अस्वस्थ झाले. आमच्या यांना काही सांगण्याची सोय नव्हती. काय करावे काही सुचत नव्हते. कोणी बरं घेतली असेल याचा विचार करून करून डोके भनभानून गेले. प्रत्येक मैत्रिणीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. आणि त्यांना वाचायचा मी प्रयत्न करत होते. तरीही मला काही अंदाज येत नव्हता. मी आल्यानंतर माझ्या सुनबाईंना सांगितले. तिने सगळी भांडी व वाट्या चेक केल्या. तरीही वाटी सापडली नाही. कोणाला कसे विचारावे काही समजेना. शेवटी मुलाला मी ही गोष्ट सांगितली आणि दोघांनाही सांगितलं की मला आत्ता जाऊन सगळ्यांना जाब विचारता येईल पण वाटी तर एकीनेच घेतली आहे. मी घेतली आहे म्हणून कोणीही सांगणार नाही. आणि इतर सगळ्यांना वाटणार की मी त्यांच्यावर संशय घेतला. मैत्रीमध्ये एवढ्या वर्षांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार म्हणून मी ही गोष्ट आमच्या तिघांमध्ये ठेवली. अजूनही राहून राहून वाटते की एवढ्या चांगल्या घरातल्या स्त्रिया सुद्धा अशा असू शकतात अशा वागू शकतात. आमची कामवाली सुद्धा खूप प्रामाणिक आहे. तिने कधी कशाला हात लावलेला नव्हता. उलट कधी पॅन्टच्या खिशात पैसे सापडले तर तिने आणून दिले होते. पण एखादी मैत्रीण अशी वागते याचा अजूनही भरोसा वाटत नाही. उलट मैत्रिणींनी सांगायला हवे होते की तू ही सगळी भांडी देवघरात नेऊन ठेव. यांना अस करून झोप कशी काय लागत असेल. एका व्यक्तीबरोबर या विषयी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना याचे काही वाटत नाही. उलट मी कशी चालाखी केली आणि मला फायदा झाला याची फुशारकी ते घरात मारत असतील. आज चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. केव्हाही आता चांदीचा विषय आला की मला ती डोळ्यासमोर चांदीची वाटी दिसते. आणि मैत्रिणी दिसतात. आणि तो खेळण्यांचा स्टॉल वाला दिसतो.

© सौ. जयश्री अनिल पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments