सौ शालिनी जोशी
विविधा
☆ समर्थ रामदास, दासबोध आणि प्रपंच… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
जगाच्या कल्याणाचा विचार करणारे समर्थ रामदास. बारा वर्षे बालपणीची गेल्यावर, ’ विश्वाचि चिंता वाहणारा’ हा मुलगा, नारायण सूर्याजीपंत ठोसर घर सोडून नाशिक जवळ टाकळीला आला. बारा वर्षे साधना व तपश्चर्या केली. विविध विषयांच्या ग्रंथांचा अभ्यास केल्यावर बारा वर्षे भारत भ्रमण केले. लाखो लोकांचे जीवन जवळून पाहिले. त्यावेळची लोकांची कर्तव्याविषयीची, धर्माविषयीची उदासीनता, परकीय राजांची स्विकारलेली लाचारी, स्त्रियांची होणारी विटंबना पाहून त्यांचे मन कळवळले. मृतप्राय झालेल्या समाजाला आपल्या वाणीने आणि लेखणीने जागृत करण्यात त्यानी आपले आयुष्य पणाला लावले. त्यासाठी विपुल ग्रंथरचना केली. त्यातील श्रेष्ठ ग्रंथ दासबोध.
वीस दशक २०० समास आणि ७७५१ ओव्या असा हा ग्रंथराज दासबोध. इ. स.
१६८१ (शके १६०३) मध्ये सिद्ध झाला. ही रचना समर्थांनी शिवथरघळीत सुंदर मठातील मुक्कामात केली. कल्याणस्वामीनी लिखाणाचे काम केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही ग्रंथावरील टीका नसून स्वतंत्र ग्रंथ आहे. समर्थांच्या दिव्य प्रज्ञा प्रतिभेतून हा ग्रंथ उदयाला आला. स्वानुभव हाच ग्रंथाचा गाभा आहे. मूर्खलक्षणापासून राष्ट्रकारणापर्यंत ग्रंथाची व्याप्ती आहे. मंदबुद्धीपासून धुर्तांपर्यंत सर्वांसाठी हा ग्रंथ असल्याचे समर्थ आत्मविश्वासाने सांगतात. पहिल्याशिवाय दोष देऊ नये, असेही टीकाकाराना सुनावतात. समर्थांचा परखडपणा आणि आत्मविश्वास या ग्रंथात दिसून येतो. तो समाजाविषयीच्या कळवळ्यातून आहे. त्यामुळे वाचत असताना समर्थ आपल्या बरोबर आहेत अशी अनुभूती येते.
परमार्थ मार्गावरील पुरुषांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे स्त्री व प्रपंच. असा बऱ्याच साधू, संतांचा अभिप्राय होता. त्यांच्या साहित्यात त्यानुसार स्त्रियांची अवहेलना पाहायला मिळते. पण समर्थानी प्रपंच व परमार्थ दोघांना समान पातळीवर आणलं. प्रपंचाला विरोध केला नाही, तर प्रपंच करून परमार्थाचा मार्ग दाखवला. प्रपंच सोडून परमार्थ केला तर केवळ आत्मोन्नती होते. पण प्रपंच करून परमार्थ केला तर राष्ट्रन्नती होते. म्हणून ते म्हणतात,
प्रपंची जो सावधान l तोचि परमार्थ करील जाण l
प्रपंची जो अप्रमाण l तो परमार्थी खोटा ll दा. १२/१/९
व्यक्तिहित व समाजहित यांची सांगड त्यांनी घातली. सद्गुणाच्या आधारे प्रपंच संपन्न केल्यावर, प्रापंचिकाने कुटुंबकेंद्रीत न राहता परोपकाराच्या माध्यमातून समाजाची नाते जोडावे. समाजाचा घटक म्हणून जगावे. यासाठीच ते म्हणतात,
आधीं प्रपंच करावा l नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका l
येथें आळस करूं नका l विवेकी हो ll दा. १२/१/१
एकसंध समाजातून एकसंध राष्ट्र निर्माण होत असते. हे वैचारिक क्रांतीचे काम त्यांनी आपल्या शिष्यामार्फत केले. त्यासाठी महंतांची फळी उभी केली. मठ, मंदिरे स्थापन केली. समाजाला बलवान करण्याचे प्रयत्न केले. प्रपंच सुखी करण्याचा विवेक सांगताना ते म्हणतात,
लेकुरें उदंड झाली l तो ते लक्ष्मी निघोन गेली l
बापडी भिकेस लागली l काही खाया मिळेना ll दा. ३/४/१
समर्थांचा ४०० वर्षांपूर्वीचा हा विचार कुटुंब नियोजनाचे द्रष्टेपण दाखवणारा आहे. समर्थ स्वतः परमार्थी असले तरी सामान्य लोकांना शक्य नाही ते तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले नाही.
प्रपंच सांडून परमार्थ केला l तरी अन्न मिळेना खायला l
मग त्या करंट्याला l परमार्थ कैचा ll दा. १२/१/३
भुकेल्याला परमार्थाचा विचार मानवणारा नाही. तर
प्रपंची पाहिजे सुवर्ण l परमार्थी पंचीकर्ण l
असे त्यांनी स्पष्ट सांगितले. समर्थानी प्रपंचाला हीन न लेखता त्याचे महत्त्व विशद केले.
नाना वेश नाना आश्रम l सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम l
जेथे पावती विश्राम l त्रैलोकेवासी ll
कारण देव, ऋषी, मुनी, योगी, तपस्वी सर्वांचा मूळ आधार गृहस्थाश्रमाचा आहे. स्वधर्माचरण आणि भूतदया यांनी युक्त गृहस्थाश्रम उत्तमच. धनसंपादन आणि त्याचा उपयोग याला भगवंताचे स्मरण आणि नीतीचे पालन यांची बैठक हवी. याला ते सुकृताचा योग म्हणतात. यामुळे माणूस समर्थ आणि भाग्यवान होतो. अशाप्रकारे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुवर्णमध्य साधणारा समाज समर्थांना अपेक्षित होता.
संसार त्याग न करिता l प्रपंच उपाधी न सांडिता l
जनामध्ये सार्थकता l विचारेचि होये ll दा. ६/९/२४
प्रपंच अथवा परमार्थ lजाणता तोचि समर्थ l
नेणता जाणिजे वेर्थ l नि: कारण ll दा. ९/४/१९
दासबोध हा व्यापक व शाश्वत समाजहिताचा विचार मराठी भाषेत सांगणारा अलौकिक ग्रंथ आहे. ऐहिक व पारलौकिक उद्धार हा उदार हेतू यामागे आहे. प्रापंचिकांना नेटका प्रपंच, भाविकांना देव प्राप्ती, ज्ञानियांना ज्ञानप्राप्ती आणि योग्याना वैराग्य देणारा हा ग्रंथराज. समर्थांच्या अंतर्यामीचे आर्त पानोपानी प्रगट आहे. प्रत्येक समास हा स्वतंत्र विषय असून सुबोधप्रद आहे. कोणतेही पान उघडावे आणि वाचावे समाधानी व्हावे असा हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






