सौ शालिनी जोशी
विविधा
☆ संकल्प… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
‘संकल्प’ हा संस्कृत शब्द सम् अधिक कल्प. सम् म्हणजे चांगला आणि कल्प म्हणजे इच्छा, प्रतिज्ञा किंवा निश्चय म्हणून कोणताही चांगला म्हणजे हितकारक निश्चय हा संकल्प असतो.
परमात्मा एकटाच सर्व विश्वाला व्यापून होता. तेव्हा ‘एकोsहं बहुस्याम’ ‘एकटाच आहे बहु व्हावे ‘असे स्फुरण त्याला झाले. हाच पहिला संकल्प. याला ‘हरी संकल्प’ म्हणतात. यातूनच पुढे सृष्टीची रचना झाली. म्हणजे संकल्पाचे मूळ परमात्म्याकडे जाते. सहजच ते आपल्यापर्यंत आले. म्हणूनच कोणत्याही धार्मिक विधी पूर्वी संकल्प करून त्या देवतेला कार्यपुर्तीसाठी प्रार्थना केली जाते म्हणजे तो सिद्धीला जातो इच्छापूर्ती होते.
परमात्म्याचा संकल्प तत्काळ सिद्धीला गेला. आपल्यासाठी मात्र संकल्प आणि सिद्धी यामध्ये जमीन आसमानाचे अंतर. म्हणजे बराच काळ, कष्ट, प्रतीक्षा, संयम आणि सातत्याची गरज. समर्थ मनोबोधात सांगतात ‘सत्य संकल्प जीवी धरावा’ ‘ पाप संकल्प सोडून द्यावा’ म्हणजे संकल्पचे दोन प्रकार. परिणाम चांगला घडवणारा सत्य संकल्प. जसा ध्रुवाने अढळपद प्राप्तीचा केला. बालपणी तपश्चर्या आणि बराच काळ चांगले राज्य केल्यावर त्याला अढळपद प्राप्त झाले. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या प्रतिमेला पुढे ठेवून श्रेष्ठ धनुर्धर बनण्याचा संकल्प केला. मोठ्या कष्टाने त्याने आपले ध्येय साधले. संकल्प सिद्धीला पोहोचला. हे सत्य संकल्प. पण दुर्योधनाने ‘सुईच्या टोकावर राहील एवढीही जमीन पांडवाना देणार नाही’ असा संकल्प केला आणि तो युद्धाला कारण झाला. कौरवांचा नाश झाला हा पाप संकल्प. चाणक्य, शिवाजी महाराज यांचे संकल्प देशोध्दाराला कारण झाले. आर्य चाणक्याने नंदाच्या सभेत ‘तुझे भ्रष्टाचाराने बरबटलेले राज्य नाश करून समर्थ असा राजा सिंहासनावर बसवेपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली ‘ती पूर्ण करून दाखवली. अडीच तपाचा कालावधीमध्ये गेला. पण संकल्प पूर्ण झाला. तसेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पूर्ण केली. हे सत्य संकल्प. अशा प्रकारे संकल्प करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.
गीतेत संकल्प हा शब्द बरेच वेळा आला आहे
१) न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन।(गी६/२)
२) सर्व संकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते। (गी६/४)
येथे संकल्प म्हणजे कामनायुक्त इच्छा असा अर्थ आहे त्यांचा त्याग येथे सांगितला आहे.
पूर्वी स्त्रिया चातुर्मासाच्या निमित्ताने काही व्रते करीत ते संकल्पच. संकल्पच यशाला कारण होतो. आताही कोणी एव्हरेस्ट चढण्याचा, कोणी खाडी पार करण्याचा, कोणी समाज सुधारण्याचा, कोणी अनाथांना सांभाळण्याचा, तर कोणी प्राण्यांची काळजी घेण्याचा संकल्प करतात. अशा प्रकारे संकल्पाना मर्यादा नाही. ज्याला जो आवडेल, झेपेल, पचेल, रुचेल पण दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही. तो त्याने अवश्य करावा. रोज काही वाचण्याचा, लिहिण्याचा, पाठांतराचा, व्यायाम करण्याचा, काही नियम करून त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प नेहमी चांगलाच असतो. त्यामुळे शिस्त लागते. शरीराला म्हणाला वळण लागते. मनाची चंचलता कमी होते. अशा प्रकारे संकल्प करावा. सिद्धीचा आनंद भोगाव व सुखी व्हावे.
सध्या भ्रष्टाचार मुक्त भारत हा मोठा संकल्प आपल्या देशापुढे आहे.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






