श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “साडेतीन शहाणे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

साडेतीन म्हटल्यावर नकळतच तोंडातून शहाणे असाच पुढचा शब्द बाहेर पडतो. किंवा साडेतीन शहाणे अस म्हंटल्यावर पेशवाई व सोबत सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हीच नांव डोळ्यासमोर येतात.

पेशवाईच्या अगोदर किंवा नंतर अशा प्रकारची माणसं नव्हती किंवा नाहीत अस नाही. पण पेशवाई आणि हिच नांव साडेतीन शहाणे असा ऊल्लेख झाल्यावर येतात.

राजेशाही, पेशवाई संपली. राज्य, संस्थानं जाऊन देश, व प्रादेशिक प्रदेश म्हणजे राज्य उदयास आली. याच बरोबर वेगवेगळे पक्ष आणि त्या पक्षातल्या खंबीर नेतृत्वाची माणसं समोर आली. काहिंंनी खंबीरपणे पक्षाच नेतृत्व केलं. तर आपण खंबीर असल्याच्या बळावर काहींनी वेगळा पक्ष, गट तयार केला. तसंच काही घराणी आणि घराण्यातली काही माणसं कर्तुत्ववान असल्याच दाखवत त्यांना पुढे आणण्याचा अटोकाट प्रयत्न सुरु झाला, व तो अजूनही काही प्रमाणात बर्‍याच ठिकाणी सुरु आहे. आणि हीच राज्य, पक्ष, आणि कुटुंबातील काही माणसं पाहिली की परत आठवण होते ती साडेतीन शहाणे या शब्दाची.

पेशवाई काळातले साडेतीन शहाणे यांचा ऊल्लेख नक्की कोणत्या अर्थाने (म्हणजे चांगले का कारस्थानी) करतात हे ठामपणे सांगता आलं नाही तरी ते नक्की कोण आणि त्यातले पूर्ण आणि अर्धे शहाणे कोण हे पक्क होतं. या माणसांची आज एक उद्या अर्धा अशी अदलाबदल नव्हती. पण आज जाणवणाऱ्या साडेतीन शहाण्यांच तसं वाटत नाही.

कारण आज जो पूर्ण शहाणा वाटतो तो कदाचित उद्या अर्धा शाहणाच वाटेल, किंवा शहाणा या यादितही नसेल. तसेच सध्या एकाच पक्षात, राज्यात, घराण्यात या प्रकारचे लोक असल्याच बोललं जातं. सत्तेसाठी किंवा विरोधासाठी एकत्र येण्याचा कल दिसतो. यासाठी धर्म, जात, भाषा, ऊत्सव या (साडेतीन) गोष्टिंचा आधार घेतलेला दिसतो. काहीवेळा खरंच याच गोष्टिंना आधार देण्याची, व यांचा आधार घेण्याची गरज आहे याची जाणीव होते. तर काही वेळा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी याचा वापर केला असं वाटतं. मग यासाठी एकत्र आलेल्या लोकांमधे या प्रकारचे साडेतीन शहाणे सत्तेेसाठी, विरोधासाठी एकत्र असल्याचा सुर निघतो. या एकत्र आलेल्या साडेतीन शहाण्यांचे परत आपले आपले साडेतीन शहाणे असल्याची चर्चा होते. आणि या साडेतीन शहाण्यांची साखळी किंवा संख्या वाढत जाते असं वाटलं तरी जनमानसात सगळ्यांचा ऊल्लेख साडेतीन शहाणे असाच होतो. आणि बर्‍यचदा त्यात उपहास, टिंगलच जाणवते.

यातला एखादा मुळातच अर्धा असतो. पण आपणच पूर्ण असल्याच्या विश्वास त्याला वाटतो. लोक आपल्यामागे फिरतील असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाल्याने मग तो तळ्यात मळ्यात करतो. आणि तो येऊन मिळाल्याने अगोदर संख्येने तीन असणारे व्यावहारिक द्रृष्ट्या साडेतीन झाल्याची चर्चा सुरू होते. विचारांप्रमाणे या चर्चेत गांभीर्य, उपहास, विनोद सगळच जाणवतं.

मुहूर्तांंमधे साडेतीन मुहूर्त, देेवस्थानात साडेतीन शक्तीपीठं हे शब्द कायम वापरले जातील. तसंच शहाणे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला तरी साडेतीन शहाणे असा वापर यापुढे सुध्दा होत राहील असं वाटत.

 ©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments