सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ खेळ पुढे सरणार… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

खेळ पुढे सरणार…!

अलीकडेच एक पोस्ट वाचली. एका एकट्याच राहाणा-या चिनी आजीबाईची. तिने स्वतः, एका नर्सिंगहोममध्ये कायमसाठी राहायला जाण्यापूर्वी लिहिलेली…

‘तिने आता आपल्या आयुष्याच्या कटू सत्याचा स्वीकार केला आहे. आपली मुलं त्यांच्या आयुष्यात गर्क आहेत आणि त्यांच्यावर, स्वतःच्या मुलांना मोठं करण्याची जबाबदारी असल्यामुळे ती आता आपल्या आईची काळजी घ्यायला असमर्थ आहेत..  हे तिला पटतं आहे आणि म्हणून तिने आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठी सर्व सोयी असलेल्या नर्सिंगहोम मध्ये कायमचं राहायला जायचा निर्णय घेतलेला आहे. तिथे जाऊन राहाणं हे तसं खूप महागडं असणार आहे. त्यासाठी तिला स्वतःचं रहातं घर विकावं लागणार आहे. आणि ते तिच्या मुलांना मान्यही आहे.’

 – – नर्सिंग होममध्ये तिची एक छोटी खोली असणार आहे. त्यात पलंग, एक कपाट, टेबल, फ्रीज, TV, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन इतक्याच गोष्टी असणार आहेत. तिचा आयुष्यभराचा संसार…   कपडे, स्वयंपाकाची भांडी, हौसेने घेतलेलं महागडं फर्निचर..  आवड म्हणून घेतलेल्या असंख्य शोभेच्या वस्तू..  वाचनाचा छंद म्हणून घेतलेली विविध विषयांवरची पुस्तकं… ह्या सगळ्या गोष्टींमधून, एका कपाटात मावेल एवढंच सामान ती बरोबर नेऊ शकणार आहे… आणि उरलेल्या ढीगभर सामानाची विल्हेवाट कशी लावायची हा मोठाच प्रश्न आहे… ना तिच्याकडे या सगळ्या गोष्टी विकून टाकण्यासाठी लागणारा वेळ आहे..  ना तेवढी शक्ती आहे… त्यातल्या महागड्या वस्तू कोणाकोणाला भेट म्हणून द्यायचं म्हटलं तरी सुद्धा देणार तरी कोणाला…? अगदी तिची मुलंबाळं.. नातवंडं.. अगदी जवळची माणसं..  ह्यांनाही त्यातलं काहीही नको आहे…  

….   नर्सिंगहोममध्ये जाताना ती फक्त जरुरीपुरती भांडी, थोडे कपडे, काही पुस्तकं आणि आता तिच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोष्टी म्हणजे…   स्वतःचं ओळखपत्र, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, बँकेचं कार्ड..  ज्येष्ठ नागरिक कार्ड…   वगैरे वगळता आणखी काहीही घेऊन जाऊ शकणार नाहीये.

….   आता तिला जाणवतंय की तुम्ही आयुष्यभर खूप प्रसिद्धी, मानपान, यश, बंगले, गाडीघोडे, काहीही मिळवलं असेलही..  पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसांसाठी, तुम्हाला राहायला फक्त एक खोली..  आणि झोपायला एक बिछाना..  एवढंच लागतं…  

…..   आणि या जगातला मुक्काम हालवून जाताना तर तुम्ही अक्षरशः रिकाम्या हाताने निघून जाणार आहात…!

– – ही post वाचली आणि क्षणभर तर मला काही सुचेचना..  घशाशी आवंढा दाटून आला आणि पोटात कसंसंच व्हायला लागलं. सगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल अनासक्ती मनात दाटून आली…   सगळं फोल वाटायला लागलं…   स्वतःचा पन्नास वर्षांचा गोळा केलेला संसार डोळ्यासमोर उभा राहिला. खरंतर मी त्यामानाने खूपच कमी हौशी आहे. तरीसुद्धा पन्नास वर्षांत खूप सामान गोळा झालंय. मुली कधीच्या लग्न होऊन गेल्या. त्यांचे कपडे, त्यांच्या सर्व वस्तू त्या घेऊन गेल्या. घरात आम्ही दोघेच उरलो, तरीही घरातली सगळी कपाटं आपली भरलेलीच होती… आता तर मी एकटीच उरले आहे मागे. ना दुकानात जायची इच्छा ना खरेदीची आवड, त्यामुळे नवीन कपडे वगैरे नाहीच येत घरात. पण तरीसुद्धा कपाटं रिकामी पडलेली काही दिसत नाहीयेत.

मी ही post वाचली, तेव्हा घरातला हा पसारा डोळ्यासमोर येऊन धडकलंच. माझ्यासाठी नव्हे तर माझ्या मुलींचा विचार करून. त्या दोघी आपल्या देशातच असत्या तर इतका प्रश्न नव्हता. मी गेल्यावर त्यांनी दहा फे-या घालून घर आवरलं असतं… पण त्या दोघी तर परदेशात. मी गेल्यावर एकदा येतील. नंतर त्या येणार तरी कोणासाठी…? मग त्या एका खेपेत काय काय कामं करतील..? सगळं भंगारवाल्याला देतील कदाचित…   पण आईची आठवण म्हणून काय काय घेऊन जातील…?

….   मला एकदम माझ्या सासूबाई गेल्या, तेव्हाची आठवण झाली. खूप वर्षं लोटली त्यांना जाऊन. त्या गेल्या तेव्हा मी अगदी मनापासून त्यांचा चष्मा घेतला होता, ‘ हा मला त्यांची आठवण म्हणून हवा. ‘ असं वाटून. पण आता तो कधी कुठे गेला ते आठवतही नाही. अगदी आई अण्णांच्याही किती वस्तू मी जपल्या आहेत..? अण्णांची एक वही ठेवली आहे जपून. पण ती देखील इतकी जपून कुठे तरी ठेवली आहे, की मलाही हवी तेव्हा सापडणार नाही…..  मग माझ्या मुली तरी ‘ आईची आठवण ‘ म्हणून काय घेतील…?

फारतर माझी एकेक साडी घेऊन जातील बरोबर…   आणि ती ही त्यांच्या कपड्यांच्या ढिगा-यात, कुठेतरी तळाला अगदी जपून ठेवली जाईल…   सुरुवातीला आठवण आली की ती घडी बाहेर काढतील आणि तिच्यावर प्रेमाने हात फिरवतील…   आणि मग बघता बघता स्वतःच्या संसारात पुन्हा गुंतून जातील.

..  आई बाबांची आठवण येणार नाही असं नव्हे. पण ती आठवण मनातल्या मनात असेल. त्यासाठी आमची एखादी वस्तू बाहेर काढून तिच्यातून आमचा स्पर्श शोधला जाईल असं नाही मला वाटत…   हळूहळू ती साडी तशीच घडीतल्या घडीत जीर्ण होत जाईल…!

– – पाणी नेहमी पुढे पुढेच वाहत जातं ना..? वाहताना खूपशा गोष्टी, आयुष्याच्या वळणावळणांच्या प्रवाहात कुठल्या तरी तीरावरच मागे सुटून जातात..  आणि त्या प्रवाहात शेवटी काही आंबटगोड चवीच फक्त शिल्लक उरतात…  

….   आपल्याला कदाचित आपले शेवटचे दिवस वृध्दाश्रमात किंवा नर्सिंगहोममध्ये नाही घालवावे लागणार…   पण आपणां सर्वांनाच, शेवटच्या प्रवासाला जाताना सर्व धनदौलत..  घरदार..  जीवापाड जपलेल्या वस्तू..  नातीगोती…   आठवणी..  रागलोभ..  प्रेम…   रुसवा..  माया मोह..  सारं सारं इथेच सोडून जायचं आहे.. 

….   आपली मुलं, नातवंडं, आपले प्रियजन, यांच्यात अडकलेला आपला जीव जेव्हा हे शरीर सोडून बाहेर पडेल, त्याक्षणीच आपण या सगळ्या पासून खूप खूप दूर…   एका वेगळ्याच जगात निघून जाणार आहोत….   आणि थोड्या काळानंतर आपली मुलंबाळं, आपली मित्रमंडळी…   सगळे सगळेही आपल्याला विसरून त्यांच्या जीवनात नव्याने रमून जाणार आहेत…!

‘जन पळभर म्हणतील हाय हाय…!’ हे अटळ सत्य आपल्याला स्वतःच्या वागण्यातूनही आयुष्यभर जाणवत आलं आहे…   हा जगाचा नियमच आहे…!

 या खेळातले खेळाडू बाद झाले की कायमसाठी आपल्या आयुष्यातून आणि हळूहळू सर्वांच्या आठवणीतूनही नाहीसे होतात, हे त्रिकालाबाधित सत्य प्रत्येकाने समजून घ्यायचं आहे आणि एकच गोष्ट स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत राहायची आहे…   

 ठाऊक आहे मला न काही,

 मजवाचुनी अडणार…  

 एक सोंगटी बाजू सारून,

 खेळ पुढे सरणार…!!!

लेखिका : सुश्री मंगला खानोलकर

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments