सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ मैत्री… लेख क्र. २१ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
चौथीच्या वर्गावरच्या शिक्षिका पेपर तपासायला गेल्यामुळे मी त्यांच्या वर्गावर जरा डोकावले, तर ऋजुता मोरे (नाव बदललेले) जोरात किंचाळत होती.
तिला म्हटलं, “बाईंनी दिलेला अभ्यास घेऊन माझ्या वर्गात ये. ”
ती जागेवरून उठायला तयार नव्हती. दुसरी मुलं तिला उठवायला गेली तर ती त्यांना मारायला लागली, एकाला चावली. तिची तक्रार घेऊन मुलं माझ्या वर्गात आली.
मी तिला बोलवलं, समजावून सांगितलं, “तू खूप चांगली आहेस, मला आवडतेस, म्हणून तुला माझ्या वर्गात बोलावलं. “
ती खूप खुश होऊन आनंदाने वर्गात गेली पण लगेच दुसऱ्या मुलीसोबत परत आली, म्हणाली, “ही मला चिडवते. “
मी म्हटलं, “अगं, ही तुझी मैत्रीण आहे ना? मग भांडता काय अशा? “
त्यावर ती म्हणाली, “बाई, हिने त्या मुलाला मारले. हे हिच्या वडिलांना समजले तर ते तिला मारतील, आणि हे मला सहन होणार नाही. हिला मारलं, तर मला दुःख होईल, ही मी तिला समजावून सांगत होते. पण ती ऐकतच नाही. बाई, आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. कितीही भांडलो, तरी एकत्र येतो, आमचं भांडण पाच मिनिटंही टिकत नाही. “
हे सांगताना तिचे डोळे भरून आले होते. एवढ्या लहान वयात मैत्रीचे उदात्त भाव तिच्या निरागस चेहऱ्यावर दिसत होते.
लहान मुलं ती – क्षणात भांडणार, क्षणात एक होणार. परंतु, आपल्या मैत्रिणीच्या चुका दाखवून तिला चांगलं वागायला प्रवृत्त करणाऱ्या या चिमुरडीचा मला खूप अभिमान वाटला. तिचा हा युक्तीवाद माझ्या मनाला स्पर्शून गेला.
खरंच आम्ही मोठ्यांनी यातून बरेच शिकण्यासारखे आहे, नाही का?
क्रमशः दर गुरुवारी…
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





