श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक क्र. १ आणि २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’ – 

– – श्लोक पहिला 

मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. कोणत्याही महान कार्याचा प्रारंभ मंगलभावनेने होणे ही भारतीय परंपरा आहे. समर्थ रामदासांनीही मनाच्या या महाग्रंथाची सुरुवात गणेश व शारदा यांच्या वंदनाने केली आहे.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |

नमू शारदा मूळ चत्वार वाचा |

गमू पंथ अनंत या राघवाचा ||

अर्थ : जो गणांचा अधिपती आहे, जो सर्व गुणांचा स्वामी आहे आणि निर्गुण परब्रह्माचा मुळारंभ आहे, अशा श्रीगणेशाला वंदन. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे मूलस्रोत असलेल्या देवी शारदेला नमस्कार करून आपण राघवाच्या—ईश्वराच्या—अनंत मार्गावर वाटचाल सुरू करूया.

कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता असते. म्हणूनच प्रत्येक शुभकार्याचा प्रारंभ श्रीगणेशाच्या मंगलस्तवनाने केला जातो. समर्थांनीही मनाच्या श्लोकांचा प्रारंभ श्रीगणेशाच्या नमनाने केला आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे—तो अडथळे दूर करतो, मार्ग सुकर करतो आणि साधकाचे रक्षण करतो.

समर्थ श्रीगणेशाला “सर्वा गुणांचा ईश” म्हणतात. येथे केवळ सत्त्व, रज, तम हे त्रिगुण अभिप्रेत नाहीत, तर चांगले–वाईट, त्याज्य–ग्राह्य असे सर्व गुण येतात. मुळात सृष्टीत कोणतीही गोष्ट स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते; तिचा उपयोग आपण कसा करतो, यावर तिचे स्वरूप ठरते. अग्नी स्वयंपाकासाठीही उपयोगी पडतो आणि जाळण्यासाठीही. शस्त्र एखाद्याला जखमी करू शकते, तसेच शस्त्रक्रियेतून प्राण वाचवूही शकते. दैनंदिन व्यवहारात त्याज्य मानले जाणारे विष अनेक रोगांमध्ये औषध ठरते. सृष्टीत शुद्ध तत्त्वच विराजमान आहे आणि त्या तत्त्वांचा अधिपती गणपती आहे.

गणेशवंदनेनंतर समर्थ विद्येची देवता असलेल्या शारदेचे—सरस्वतीचे—स्मरण करतात. “नमू” हा शब्द गणेश आणि शारदा या दोघांनाही उद्देशून आहे. दैनंदिन जीवनात असो वा अध्यात्ममार्गावर, प्रगतीसाठी ज्ञान अत्यावश्यक आहे; आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवता म्हणजे शारदा. तिच्या कृपेअभावी कोणतेही ज्ञान संपादन शक्य नाही.

शब्दाचे मूळ स्फुरण परा, त्याचा भावार्थ पश्यंती, त्याचा नाद मध्यमा आणि प्रत्यक्ष उच्चार वैखरी—या चारही वाणींचे मूलस्थान शारदा आहे. कोणत्याही वाङ्मयाची, विचारांची किंवा अभिव्यक्तीची निर्मिती तिच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच समर्थांनी या मनोपनिषदाच्या प्रारंभी शारदेला वंदन केले आहे. शारदाच आदिमाया, आदिशक्ती आहे.

या वंदनाचा हेतू स्पष्ट आहे—आपली ही वाटचाल निर्विघ्नपणे पार पडावी. आपल्याला ज्या मार्गावर चालायचे आहे, तो मार्ग म्हणजे श्रीरामांचा मार्ग. येथे श्रीराम म्हणजे केवळ दशरथपुत्र नव्हे, तर परमात्मस्वरूप. हा मार्ग अनंत आहे, न संपणारा आहे. या मार्गावर स्वयं भगवान शंकरही चालत आहेत; तेही अखंड रामनामाचा जप करत आहेत.

समर्थांचे दैवतच श्रीराम आहे. ते स्वतःला रामदास म्हणतात—रामाचे दास. श्रीराम जणू त्यांना प्रत्यक्ष समोर उभे दिसतात. म्हणूनच ते म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा. ” या अनंत मार्गावर चालण्यासाठी समर्थ श्रीगणेश आणि शारदेचे आशीर्वाद मागतात—आणि ते आशीर्वाद आपल्यासाठीही आहेत.

आपणही भक्तिभावाने त्यांना वंदन करून, या राघवाच्या अनंत मार्गावर चालण्यासाठी सज्ज होऊ या.

आत्मचिंतनासाठी – – – 

  • कोणत्याही कार्याची सुरुवात करताना माझ्या मनात मंगलभाव आहे का, की केवळ घाई?
  • माझ्यातील गुणांचा उपयोग मी साधनेसाठी करतो की बंधनांसाठी?
  • शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यामागील भाव आणि अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो का?
  • श्रीरामांचा “अनंत मार्ग” हा माझ्यासाठी बाहेरचा आहे की अंतर्मनातून सुरू होणारा?

– – –

– – श्लोक दुसरा

मना सज्जना भक्तीपंथेची जावे |

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे |

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे ||

अर्थ : हे सज्जन मना, तू भक्तीमार्गानेच वाटचाल कर. त्या मार्गावर चालल्यास तुला निश्चयाने परमेश्वराची प्राप्ती होईल. समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींचा त्याग कर आणि समाजहिताची, कल्याणकारी कर्मे पूर्ण भावाने आचर.

या श्लोकात समर्थ रामदासांनी मनाला “सज्जन” असे संबोधले आहे, हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. एखाद्याला सज्जन म्हटले, की त्याच्याकडून सज्जनासारखेच वर्तन अपेक्षित धरले जाते. कदाचित म्हणूनच समर्थांनी मनाला सज्जन म्हटले असावे—मनावर विश्वास ठेवत, पण त्याचबरोबर त्याला जबाबदारीची जाणीव करून देत.

मन स्वभावत: चंचल आहे. त्याच्या असंख्य वाटा आहेत. परंतु त्या सर्व वाटांमधून अंतिमतः हितकारक ठरणारी वाट म्हणजे भक्तीमार्ग—हे समर्थ येथे ठामपणे सांगतात.

ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग असे तीन मार्ग सांगितले जातात. त्यापैकी सर्वसामान्य माणसाला सहज आचरता येणारा, जीवनाशी सलग राहणारा आणि व्यवहारात उतरवता येणारा मार्ग म्हणजे भक्तीमार्ग. म्हणूनच सर्व संतांनी एकमुखाने भक्तीमार्गाचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. समर्थही येथे तेच सांगतात—भक्तीमार्ग हा सरळ, सोपा आणि थेट ईश्वराकडे नेणारा आहे.

खरं तर जीव हे परमेश्वराचेच स्वरूप आहे; पण अज्ञानामुळे तो त्या परमेश्वरापासून दूर गेलेला असतो. जेव्हा जीव भक्तीमार्गावर चालू लागतो, तेव्हा ईश्वर त्याच्यासमोर उभा राहतो—ईश्वर संमुख होतो. आणि एकदा का ईश्वर संमुख झाला, की त्याच्या चरणांपर्यंतची वाटचाल आपोआप सुरू होते. म्हणूनच समर्थ येथे “भक्तीपंथ” हा शब्द वापरतात. हा केवळ विचारांचा नव्हे, तर प्रत्यक्ष चालण्याचा—आचरणाचा—मार्ग आहे.

या श्लोकातील तिसरी आणि चौथी ओळ विशेष अर्थपूर्ण आहे—

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे |

जनी वंद्य ते सर्वभावे करावे”

येथे ‘जनी’ म्हणजे केवळ सामान्य लोक असा अर्थ अभिप्रेत नाही. जनी म्हणजे समाजातील सज्जन, विचारवंत, ऋषितुल्य व्यक्ती—ज्यांच्या विवेकावर आणि आचरणावर समाज उभा राहतो. अशा सज्जनांना जी गोष्ट निंद्य वाटते, ती आपण टाळावी; आणि जी गोष्ट त्यांना वंद्य, म्हणजेच आदरणीय वाटते, ती पूर्ण भावाने आचरावी—हा या ओळींचा गाभा आहे.

आजच्या समाजजीवनात अनेक गोष्टी रूढ झालेल्या दिसतात. काही प्रथा, सवयी किंवा उत्सव साजरे करण्याच्या पद्धती काळानुसार बदलल्या आहेत. त्या सर्वच चुकीच्या आहेत असे नाही; पण त्या आपल्या संस्कृतीला, सामाजिक भानाला आणि संवेदनशीलतेला पूरक आहेत का, याचा विचार करणे आवश्यक आहे. लग्नसमारंभात आणि इतर वेळी डीजेचा वापर करणे, फटाके फोडणे, वाढदिवस प्रसंगी केक कापणे आणि दिवे विझवणे इ. सज्जन आणि विचारवंतांच्या दृष्टीने ज्या गोष्टी योग्य वाटतात, ज्या समाजात सुसंस्कार वाढवतात, अशाच गोष्टींचा अंगीकार करणे—आणि ज्यामुळे समाजात विकृती, उथळपणा किंवा अनावश्यक अतिरेक वाढतो, अशा गोष्टी टाळणे—हेच समर्थ येथे सूचित करतात.

आपण इतरांनी केले म्हणून काही करायचे नसते. ज्या गोष्टी इतरांनी केल्या तर आपल्याला अस्वस्थ वाटते, त्या आपणही करू नयेत. आणि ज्या कृतींमुळे इतरांच्या मनात आनंद, समाधान किंवा प्रेरणा निर्माण होते, अशा कृती आपण कराव्यात. आधी स्वतः आचरणात आणले, मग सांगितले—हेच खरे नैतिक बळ आहे.

परमेश्वरप्राप्तीसाठी समर्थ ज्या भक्तीमार्गाचा उपदेश करतात, त्या मार्गावर चालण्यासाठी मन आणि आचरण शुद्ध असणे अत्यावश्यक आहे. मन शुद्ध नसेल आणि आचरण स्वच्छ नसेल, तर भक्ती केवळ बाह्य स्वरूपाची राहते. म्हणूनच संतांनी आणि सज्जनांनी ज्या गोष्टी त्याज्य ठरवल्या आहेत त्या टाळणे, आणि ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या आहेत त्यांचा स्वीकार करणे—हे भक्तीमार्गावरील यशस्वी वाटचालीचे खरे गमक आहे.

आत्मचिंतनासाठी – – 

समर्थ मला “सज्जन मना” म्हणतात—मी स्वतःकडून तशी अपेक्षा ठेवतो का?

.. माझ्या दैनंदिन जीवनात भक्ती ही केवळ भावना आहे, की आचरणाचा मार्ग?

.. सज्जनांना निंद्य वाटणाऱ्या कोणत्या गोष्टी मी अजूनही सवयीने करत आहे का?

.. माझ्या कृतींमुळे समाजात सुसंस्कार वाढतात की केवळ गोंधळ?

 – क्रमशः – श्लोक १ आणि २.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments