सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ “बल्ब …” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
खूप जुनी गोष्ट आहे. नुकतेच आम्ही नवीन घरात राहायला आलो होतो. त्यावेळी ट्युबलाईटचा विशेष प्रसार झाला नव्हता. घरोघरी पिवळे बल्बच असायचे.
दहा दिवसांच्या अवधीत तिसऱ्यांदा बल्ब गेला. पुन्हा बल्ब गेला, म्हटल्यावर आई आणि त्यामुळे मी व संध्याही कावऱ्याबावऱ्या झालो.
बंद दरवाजाचा जमाना तोपर्यंत आला नसल्याने शेजारीपाजारीही जमा झाले.
मग नवीन बल्ब आणून लावण्याचे सोपस्कार झाल्यानंतरही गप्पा चालूच होत्या.
“संध्याच्या आई, वरचेवर बल्ब जातो, म्हणजे वायरिंगचा प्रॉब्लेम असणार. “
“हो. हो. इलेक्ट्रिशियनला बोलावून चेक करून घ्या. “
“मला वाटतं…… “
तेवढ्यात आईला आठवलं, “वर राहतात ना, ते ठोकत असतात अधूनमधून. “
“बरोबर. मग त्यामुळेच हादरे बसून बल्ब जात असणार. “
“तुम्ही जाऊन सांगा त्यांना. म्हणावं, नवीन बल्बचे पैसे द्या. “
“हो, हो. जाच तुम्ही, संध्याच्या आई. “
“आता ‘यां’ची यायची वेळ झालीय. स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. उद्या सकाळी बघूया. “
मग शेजारणींनाही आपापल्या घरच्या स्वयंपाकाची आठवण झाली.
आजचं मरण उद्यावर गेलं, म्हणून हुश्श करत आई रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.
बाबा आल्यावर त्यांनीही शेजारणींना दुजोरा दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा-अकराच्या सुमाराला पुन्हा वरून ठोकाठोकी सुरू झाली.
“संध्याच्या आई, आत्ता जा आणि रेडहॅन्डेड पकडा त्यांना. “
“पण त्या भांडायला लागल्या तर? “
“घाबरू नका तुम्ही. त्या भांडायला लागल्या, तर खाली आवाज येईलच. मग मी येईन वर. “
“मीही येईन, ” म्हणत सगळ्याच तयार झाल्या.
जीव मुठीत धरून आई वर गेली.
दहा-पंधरा मिनिटं झाली, तरी सारं कसं शांत शांत म्हटल्यावर कुमक गोंधळून गेली. मग एका दूताला वर पाठवण्यात आलं.
“संध्याच्या आई त्यांच्या घरात बसून चहा पित होत्या. “
पाच-दहा मिनिटांत आई आलीच. एकदम शांत दिसत होती.
“काय झालं? ” “काय झालं? ” सगळ्यांनी कल्ला केला.
मग आईने सुरुवात केली, “अहो, मी जरा भीतभीतच गेले वर. म्हटलं, त्या बाईंनी तोंड सोडलं, तर मी काय करणार? पण त्या चक्क म्हणाल्या, ‘गे, भायेरसून कित्याक, घरात येवन बसा आणि बोला. ‘ त्याबरोबर माझ्या जिवात जीव आला. त्या खलात काहीतरी घेऊन बत्त्याने कुटत होत्या. मग मी सांगितलं बल्बचं. तर म्हणाल्या, ‘अरे द्येवा! धा दिसांत तीन बल्ब गेल्यानी? माका ठावक न्हाय, गे, असा काय होईत म्हणान. आता काळजी घेयीन मिया. ‘मग त्या थोड्या सरकून बसल्या. सुनेकडून एक गोधडी मागून घेतली. तिची जाडशी घडी केली. तिच्यावर खल ठेवून त्यांनी आपलं कुटण्याचं काम चालू केलं.
‘माजो हातपण वाईच जोरात चलता. दोघांची शक्ती एकाच हातात इली हा मा? आता हळूहळू मारतंय. ‘
तेव्हा कुठे माझं लक्ष गेलं. त्या डाव्या हाताने बत्ता मारत होत्या. उजवा हात फक्त अर्ध्या दंडापर्यंतच होता.
‘म्हणजे? तुमचा हात? ‘
‘अगे, धाकटो चार वर्साचो होतो, त्या येळा त्येचो बापूस ग्येलो. माज्या पदरात चार पोरा. मगे घोवाच्या मिलमद्ये माका नोकरी दिल्यानी. द्येव त्येंचा भला करो. एक दिस मशनीत हात गावलो आन कापान टाकाचो लागलो. माका दिसला – संपला सगळा. पण पोरांकडे बघून पुन्ना उभ्या रवलंय. मिया डाव्या हाताक सांगलंय – इतकी वर्सां उजव्याच्या जिवाsर तू आराम क्येलंय. आता तुज्याsर दोगांच्या वाट्याचा काम करुची पाळी इली हा. मग तो लागलो कामाक. तेणा माका बगलंला मा, पोरांची आऊस आणि बापूस जालंला… अरे, मिया बोलत काय बसलंय? पयल्यांदाच इल्यात घरी. इल्लो च्या घेवा. ‘
मग त्यांच्या सुनेने चहा करून दिला.
‘अगो, थोडी कोकमां दी गो त्येंका. कालच पावण्यान हाडली गावसून, ‘ म्हणून आमसुलांची पुडीही हातात ठेवली.
‘थोरलो आयलो, का त्येका सांगतंय हां, तुमका बलब हाडून देवक. ‘
‘अहो, नको. राहू दे. आता लावला आम्ही. यापुढे जरा काळजी घ्या, एवढंच सांगायला आले होते. ‘ “
– – – बल्बची भरपाई मागायला गेलेली आई आयुष्यभर पुरेल एवढा सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन आली होती.
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




डोळ्यात पाणी आले वाचून