अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
अभंगातून समजलेले संत तुकाराम
गाथेतील एकेक अभंगांचे वाचन करत असताना संत तुकारामांचे पांडुरंगाशी असलेले भक्तीचे नाते आपल्याला हळु. हळू उलगडत चालले आहे. हे भक्तीचे नाते कायम तसेच राहावे एवढेच त्यांचे देवाकडे मागणे आहे. म्हणून ते म्हणतात, “अनेक जन्मात माझे आचरण चांगले नव्हते. म्हणून हे देवा मला तुमच्या पायांचा वियोग झाला. मात्र या जन्मात काहीतरी चांगले कर्म माझ्या हातून घडले असावे, आणि म्हणूनच तुमची माझी भेट झाली. आता तुम्ही कृपा करा. मी अपराधी, दुराचारी आहे. संसाराच्या तापाने त्रस्त झालो आहे. माझ्या अंतरंगातील काम, क्रोध, कल्पना विक्षेप यामुळे मी तुमच्या पर्यंत पोहोचत नाही असे झाले आहे. इकडे संसार धड नाही, तिकडे परमार्थात गती नाही, अशी माझी कुचंबणा झाली आहे मी निरुपयोगी ठरलो आहे”
हा न तोसा ठाव झाला पांडुरंगा/
नयेची उपेगा काय करू/
आपुलिया नावा धावुनिया धावे/ लवकर यावे तुका म्हणे//
अशा परिस्थितीत हे पतितपावना, तुझे नाव सार्थ कर आणि माझ्याकरता धावत ये.
आता या अभंगात तुकाराम बुवा काय म्हणतात?
कारे तुम्ही ठेवा बहुतानिमित्ते/
माझीया संचिते वोढवले/
भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी/
आनंद अंतरी येणे झाला/
पुसले पडळ तिमिर विठ्ठले/
जगती भरले ब्रह्मानंदे//
तुका म्हणे केलो कामने वेगळा/
आवडी गोपाळा असे वरी//
तुकाराम लोकांना सांगत आहेत की जन हो, मी संसाराचा त्याग केला म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करता, पण खरं सांगायचं तर हेच माझं संचित आहे. माझ्या अंतःकरणातील विठूच्या प्रेमामुळे माझ्या दृष्टीतील अज्ञानाचा अंधार दूर झाला आहे, आणि मला सर्व जग ब्रह्मानंदाने भरलेले दिसत आहे. मी कामनाशून्य होऊन माझ्या मनात फक्त एका कृष्णाची प्रीती आहे.
या ठिकाणी संत तुकारामांची देह बुद्धी पूर्णतया विनाश पावली आहे.
आमुची विश्रांती/ तुमचे चरण कमळापती/
हेचि एक जाणे/ काया वाचा आणि मने/
नीच जना लोका/ तळील पायरीस तुका//
या ठिकाणी तुकाराम महाराज स्वतःस सर्वांहून नीच म्हणजे खालच्या पातळीवरचा असे संबोधित आहेत. देवा, तुमच्या चरणांवर अनेक भक्त लोटांगण घालतात, त्या सर्व भक्तात मी खालच्या तळाच्या पायरीवर आहे.
खरा भक्त हा नेहमी लीन असतो, विनम्र असतो हेच आपल्याला तुकारामांचे रूप या अभंगात पहावयास मिळते.
संत प्रवृत्तीचे तुकाराम महाराज कसे होते यासंबंधी अधिक माहिती या खालील अभंगातून आपल्याला मिळते.
होईल तो भोग/ भोगीन आपुला/
न घालीन विठ्ठला/ भार तुज//
तुम्हा पासाव हे / इच्छितसे दान/
अंतरीचे ध्यान/ मुखी नाम//
नये काकुळती/ गर्भवासासाठी/
न धरी हे पोटी/ भय काही//
तुका म्हणे मज/ उदंड एवढे/
नाचेन मी पुढे/ मायबापा//
“विठ्ठला, प्रारब्धाने मला जे भोग भोगायचे असतील, ते मी आनंदाने भोगीन. तुझ्यावर त्याचा जराही भार टाकणार नाही. मला तुझ्याकडून हेच दान हवे आहे. तुझे ध्यान माझ्या अंतरंगात सदैव राहो आणि तुझे नाम माझ्या मुखी अखंड राहो. मला गर्भवासाचे भय नाही.
अनेक जन्म मला मिळाले तरी हरकत नाही, फक्त माझी एकच मागणी तू पूर्ण केलीस तर तुझ्यापुढे मी प्रेमभराने सदैव नाचत राहीन. “
सदैव भगवंताची भक्ती आणि प्रीती अंतरंगात राहावी एवढी एकच इच्छा तुकाराम त्यांच्या अनेक अभंगांतून वेळोवेळी व्यक्त करतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी कितीही जन्म घेण्याची त्यांची तयारी आहे. ते देवाकडे मोक्षाची याचना करत नाहीत.
कधी कधी तुकाराम महाराज लहान होऊन आपल्या मायबापांकडे बाल हट्ट करतात.
भोगलो मी आता/ आपुल्या स्वभावे/
कृपा करून देवे/आस्वासीजे//
मी सांसारिक नित्य कर्म करून फार थकलो आहे, तेव्हा कृपा करून तुम्ही मला असे आश्वासन द्या की,
देऊनी आलिंगन/ प्रीतीच्या पडीभरे/
अंगेही दातारे/ निववावी//
उदार अंतकरणाने हे देवा, तुम्ही मला आलिंगन देऊन माझ्या थकलेल्या शरीराला शांत कराल.
अमृताची दृष्टी/ घालूनिया वरी/
शीतळ हा करी/ जीव माझा//
तुमच्या अमृतरुपी कृपादृष्टीचा वर्षाव करून माझ्या जीवाची तळमळ शांत कराल.
घेई उचलोनी /पुसे तहानभूक/
पुसी माझे मुख/ पितांबरे//
माझी तहानभूक जाणून मला कडेवर उचलून घ्याल, आणि माझे मुख आपल्या पितांबराने स्वच्छ कराल.
बैसोनिया माझी धरी हनुवटी/
ओवाळूनी दिठी करुनी सांडी//
तुका म्हणे बापा अहो विश्वंभरा/
आता कृपा करा ऐसी काही//
मला आपल्या मांडीवर घेऊन माझी हनवटी धराल, माझी दृष्ट काढाल, अशा प्रकारे विश्वंभरा तुम्ही माझ्यावर कृपा कराल. मला असे आश्वासन द्या.
काय हा तुकारामांचा बालहट्ट! भक्ताचे व देवाचे नाते कसे अधिकाराचे होऊ शकते हे आपल्याला या अभंगातून अगदी सहज समजते.
सतत पांडुरंगाचा धावा केल्याने तुकाराम महाराजांना पंढरीच्या विठोबाचे आता दर्शन घडलेले आहे आणि त्यामुळे धन्यता पावलेले तुकाराम ब्रह्मानंद अवस्थेत बेधुंद होऊन गात आहेत.
पावलो पंढरी वैकुंठ भुवन/
धन्य आजी दिन सोनियाचा//
पावलो पंढरी आनंद गजरे/
वाजतील तुरे शंखभेरी//
पावलो पंढरी क्षेम आळिंगणी/
संत या सज्जनी निवविलो//
पावलो पंढरी पार नाही सुखा/
भेटला हा सखा मायबाप//
पावलो पंढरी येरझार खुंटली/
माऊली वोळली प्रेम पान्हा//
पावलो पंढरी आपुले माहेर/
नाही संसार तुका म्हणे//
भू वरचे वैकुंठ म्हणजे पंढरपूर, या ठिकाणी तुकाराम महाराज येऊन पोहोचले आहेत आणि त्यांचा दिवस धन्य धन्य झाला आहे. पंढरीत संत जनांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिल्यामुळे त्यांचे सर्व श्रम निमाले आहेत. मायबाप पांडुरंगाच्या भेटीने त्यांच्या आनंदाला पारावार नाही. आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची कायमची सुटका झाली आहे. विठाईच्या प्रेम पान्ह्याने त्यांना आता संसाराचे बंधन राहिले नाही. या ठिकाणी परमेश्वराशी ते संपूर्णपणे एकरूप झाले आहेत.
जय जय विठ्ठल/ श्री हरी विठ्ठल/
विठ्ठल विठ्ठल/ पांडुरंग//
क्रमशः… १०
© अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





