सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “कुठे हरवली ती मैना खेर??” – लेखक : श्री बिपिन देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आज एका रद्दीच्या दुकानावरून जाताना सहज एका गोष्टीवर नजर गेली. एक लक्झरी कार त्याच्या दारात थांबली होती. त्याने खटका दाबून डिकी (सॉरी.. त्याला आता ट्रंक म्हणायचं! ) उघडली आणि कारच्या डिकीतून अगदी किरकोळ रद्दी काढून ती दुकानदाराला देऊ केली.

माझ्या खट्याळ मनात उगीचच विचार आला की आज २८ तारीख, हा मनुष्य रद्दी विकायला आलाय म्हणजे याच्या घरी ‘ मैना खेर’ आली की काय?

मी मनाने एकदम ४०-५० वर्षे मागे गेलो. ‘मैना खेर…! ‘

बहुतेक पगारदार मध्यमवर्गीय घरांमध्ये प्रत्येक महिन्याची साधारण २०-२५ तारीख आली की ही ‘मैना खेर’ नावाची नावडती पाहुणी हटकून येत असे.

आज हा २८ तारखेला रद्दी विकणारा मनुष्य दिसल्यावर तिची आठवण झाली.

त्यावेळी मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात दर महिन्याच्या ४ आठवड्यांना नावही मोठी भन्नाट दिलेली असायची.

दर महिन्याला १ तारखेला पगार झाल्यावर येणारा पहिला आठवडा म्हणजे ‘ गोल्डन विक’!

महिन्याची वाणी, दूधवाला, पेपरवाला, मुलांच्या फिया (त्यावेळचं ‘फी’ चं मराठी अनेकवचन) वगैरे देऊन थोडी मध्यमवर्गीय मौजमजा करून झाल्यावर, दुसरा आठवडा यायचा तो म्हणजे  ‘सिल्व्हर विक’!

पैशाचं पाकिट बऱ्यापैकी हलकं व्हायला लागलेलं असताना महिन्याचा तिसरा आठवडा यायचा तो म्हणजे ‘ ब्रॉंझ विक’!

हा संपतोय नाही तर यायचा महिन्याचा ४था आठवडा. हा म्हणजे ‘ रद्दी विक’!

पगाराचं पाकिट रिकामं झालेलं असायचं. रोजच्या खर्चासाठी महिनाभर साठलेला रद्दीचा गठ्ठा नाडीनं बांधून सायकलीच्या कॅरियरला लावला जायचा. जे काही पैसे येतील, त्यातून बारीकसारीक खर्च भागवले जायचे. रद्दी विकून आलेल्या थोड्याफार पैशातून आठवडा ढकलला जायचा म्हणून याचं नाव ‘ रद्दी विक’ इतकंच! आधीच्या गोल्डन, सिल्व्हर वगैरे आठवड्यांचा गोल्ड, सिल्व्हरशी तसा काही संबंध नाही.

या आठवड्यात नवीन खरेदीवर बॅन आलेला असायचा.

नवीन काही आणायचं असेल तर “आत्ता हट्ट नको करूस, आत्ता ‘मैना खेर’ आहे ! बाबांचा पगार झाल्यावर घ्यायला सांगते हं मी त्यांना! “अशी आश्वासनं मुलांना दिली जायची.

तर अशी ही ‘ महिना अखेर’ यायची. तिचं लाडाचं नाव ‘ मैना खेर’!

शाळकरी मुलांना मात्र या महिना अखेरीत देखील एक आनंदाचा दिवस असायचा, तो म्हणजे, महिन्याचा शेवटचा दिवस!

त्या दिवशी शाळा ‘अर्धा दिवस’ असायची. वर्गशिक्षकांना महिन्याच्या ‘फी’चा हिशोब  करायला वेळ मिळावा म्हणून शाळा अर्धा दिवस असायची. तसं पाहिलं तर या अर्ध्या दिवसाच्या शाळेलाही काही अर्थ नसायचा म्हणा. वर्गशिक्षक त्या वेळातही काम करायचे.

कुणी फी भरलेली नसेल तर त्याला सूचना दिली जायची. प्रगती पुस्तकात महिन्यातल्या हजेरी-गैरहजेरीचा हिशोब मांडला जायचा.

त्या अर्ध्या दिवसातही सगळा गडबड गोंधळच चालायचा.

मला आजही एक गोष्ट खटकते ती म्हणजे वर्गशिक्षक मंडळी हिशोबात गोंधळ नको म्हणून ‘नादारीवाल्या’ मुलांना एका बाजूला वेगळे बसवत असत. तेव्हा ते ‘नादारी’ प्रकरण काय आहे ते समजायचं नाही. खरंतर ज्या मुलांना ‘नादारीवाले’ म्हणून अस्पृश्यासारखं वेगळं बसवलं जायचं, त्यांनादेखील खरंतर ते माहिती नसावं. कारण तेवढी समज कुणाला होती म्हणा?

हे आत्ता या ‘ मैना खेरच्या’  आठवणीत आठवलं खरं!

आता  या ‘मैना खेर’चं नाव कुठे ऐकायला मिळत नाही.

मोबाईल ॲप वरून सहज मिळणारी फसवी कर्जं, क्रेडिट कार्ड्स, चौका चौकात उघडलेली गोल्ड लोनची दुकानं आणि महत्त्वाचं म्हणजे ‘इएमआय’वर उपलब्ध असणाऱ्या जीवनासाठी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींमुळे,

“आत्ता नको ! बाबांचा पगार झाल्यावर पुढच्या महिन्यात ह्यांना आणायला सांगते हं! “असं म्हणणारी आई तरी कुठे राहिली आहे आता!

या सगळ्या ‘इझी क्रेडिट’, ‘इन्स्टा लोन’ च्या या आभासी सुबत्तेच्या आणि चंगळवादाच्या युगात, ती दुष्ट चेटकिणीसारखी वाटणारी  ‘मैना खेर’  कुठेतरी हरवली आहे, हे मात्र निश्चित!

लेखक: श्री. बिपिन देशमुख

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments