शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ सावित्रीबाई खानोलकर ☆ शालिनी जोशी

(८ मार्च —- ‌महिला दिनानिमित्त, परदेशी असून भारतासाठी कार्य करणाऱ्या महिलांची ओळख –)

(साभार – यूट्यूब चैनल >> IMC Business Official)

जन्मभूमी निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नसते. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपली कर्मभूमी आपण निवडू शकतो आणि आपल्या कर्माचा ठसा तिथे उमटवूं शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सावित्रीबाई खानोलकर.

सावित्रीबाई म्हणजे एखाद्या मराठमोळ्या स्त्रीचे नाव वाटते. पण त्यांचे मूळचे नाव ‘इव्हा युओन लिंडा’. असे होते. जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंड मध्ये झाला. आई रशियन व वडील हंगेरीचे होते. आई लहानपणीच वारली. वडील समाजशास्त्राचे प्राध्यापक तसेच ग्रंथपालही होते. त्यामुळे इव्हाना लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून भारत व भारताचा इतिहास कळला. भारताविषयी ओढ निर्माण झाली.

मेजर विक्रम खानोलकर हे भारतीय लष्कर अधिकारी मुळचे महाराष्ट्रातील सावंतवाडीचे रहिवासी होते. रॉयल मिलिटरी अकॅडमी, सॅंडहस्ट येथे त्यांचे शिक्षण झाले. तेव्हा ते स्विझर्लंडला गेले असताना त्यांची व इव्हा यांची भेट झाली. १६ वर्षाची इव्हा २७ वर्षांच्या भारतीय तरुणांच्या प्रेमात पडली. आई-वडिलांचा विरोध पत्करून १९३२साली, आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही मुलगी, भारतात आली. त्यावेळी त्या अठरा वर्षाच्या होत्या. २९ वर्षांच्या मेजर विक्रम यांचे बरोबर त्यांनी लग्न केले. हिंदू धर्म स्वीकारला. इव्हाच्या सावित्रीबाई खानोलकर झाल्या.

त्या पूर्णपणे बदलल्या. भारतीय संस्कृतीचा त्यांनी पूर्णपणे अंगिकार केला. साडी, कुंकू, साध्या चपला, शाकाहारी जेवण यांचा स्वीकार केला. भारतीय भाषा, वेद, उपनिषदे, संस्कृत काव्य यांचा अभ्यास सुरू केला. पाटणा विद्यापीठात प्रवेश घेतला व पदवी मिळवली. रामकृष्ण मिशनचा भाग बनल्या. चित्रकला, संगीत व नृत्याची आवड होती. त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी उस्ताद पंडित उदयशंकर यांची शिष्या झाल्या. हे सर्व करून ‘सेंटस् ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘संस्कृत डिक्शनरी ऑफ नेम्स’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. ती खूप गाजली. हिंदी, मराठी, संस्कृत बोलू शकत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यात त्या समरसून गेल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. देशाच्या शुरानी बलिदान केलं. तेव्हा युद्धात प्राण्याची आहुती देणाऱ्या वीरांच्या सन्मानार्थ नवीन पदकांची रचना करण्याचे काम मेजर जनरल हिरालाल अटल यांच्याकडे आले. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंची निवड केली. सावित्रीबाईंनी हे आव्हान स्वीकारले. भारतीय संस्कृती आणि वेद पुराणांच्या अभ्यासाचा उपयोग केला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पदकांची रचना मे. ज. अटल यांच्याकडे त्यांनी पाठवली. सर्वाना ती पसंत पडली. हे बनवत असताना इंद्राचे शस्त्र वज्राची प्रेरणा मिळाली. महर्षी दधिचीनी वृत्रासुराला मारण्यासाठी लागणारे अमोघ शस्त्र (वज्र) बनविता यावे म्हणून त्यांचे शरीर त्यागले होते. त्यांच्या अस्थी पासून बनवलेले वज्र हे समर्पणाचे प्रतीक. म्हणून परमवीर चक्राच्या मध्यभागी भारताची राजमुद्रा आणि त्या भोवती इंद्राच्या वज्राची चार चिन्हे कोरलेली आहेत. हे गोलाकार चिन्ह ३. ५ सेंटीमीटर व्यासाचे कास्य धातूचे आहे. दुसऱ्या बाजूला हिंदी व इंग्रजी मध्ये परमवीर चक्र असे कोरले आहे. या दोन शब्दांच्या मध्ये कमळ आहे. सैनिकाची शक्ती आणि बलिदान राष्ट्राचे रक्षण कसे करेल याचं ते चिन्ह म्हणजे प्रतीक. त्याग आणि शक्तीचे हे प्रतीक, यातून युगानुयुगे चालत आलेल्या संस्कृतीचा धागा मजबूत केला.

पहिलं परमवीर चक्र पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या मेजर सोमनाथ शर्मा यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हे मेजर शर्मा सावित्रीबाई खानोलकर यांची कन्या कुमुदिनी हिचे दिर होते. परमवीर चक्रा प्रमाणेच अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, वीरचक्र, शौर्यचक्र अशा प्रमुख चक्रांची रचना सावित्रीबाईंनी केली. ही देशाला त्यांनी दिलेली देणगी. त्यामुळे भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.

१९२९ मध्ये किंग्स कमिशन मध्ये जॉईन झालेल्या खानवीलकरानी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केले. पाच ऑगस्ट १९४९ रोजी दिल्ली क्षेत्राचे जी ओ सी नंतर १९५२ मध्ये कलकत्ता पायदळ तुकडीचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. ते कठोर, शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखले जात. पत्नीसह ट्रेन ने कलकत्त्याला परतत असताना २९ ऑगस्ट १९९२ रोजी सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर मेजर जनरल पदावर त्यांना बढती देण्यात आली. त्याना दोन मुली व एक मुलगा होता.

विक्रम खानवीलकरांच्या मृत्यू नंतर सावित्रीबाईंनी पूर्णपणे अध्यात्माला समर्पित केले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि निर्वासितांसाठी त्यांनी भरपूर काम केले. १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. अशी ही निसर्गाची आवड असणारी, स्वित्झर्लंडची कन्या पूर्ण भारतीय होऊन राहिली. आपल्या कार्याने अजरामर झाली.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments