शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “युद्ध आणि भारत…” ☆ शीला पतकी 

युद्ध हा शब्द आपण रामायण महाभारत हे वाचताना ऐकला यावरचे सिनेमे त्याच्या सिरीयल पाहताना ते पाहायला खूप मजा येत होती. रावणाची 10 तोंड बाणाने कापली जात असताना लहानपणी छान वाटायचं… मग बिभीषण सांगायचा नेमका बाण कुठे मारायचा आहे… मग रावण मरायचा… रामाचा विजय… रावणाचा अंत्यविधी… त्याला रामाची उपस्थिती… आणि मग सितेला घेऊन रामाचे परतणे…!

तसंच महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध. सख्खे आणि चुलत यांचं… श्रीकृष्णाने सांगितलेली गीता… कुरुक्षेत्रावरती असलेल्या व्यवस्था… म्हणजे उद्या सैन्याचा किती सैनिकांचा स्वयंपाक करायचा किती मेले आहेत… किती उरले आहेत… हे श्रीकृष्ण खात असलेल्या शेंगाच्या टरफलावरून ठरत असे… आणि तितक्या लोकांचा स्वयंपाक युद्धभूमीवर व्हायचा… ह्या सगळ्या रंजक कथा वाचून कमाल वाटायची.

मी सातवीत असताना हिंदी प्रवीण परीक्षेला बसले होते. खरं तर ती परीक्षा बीए समकक्ष होती आणि मी फक्त सातवीत. त्यात अभ्यासाला एक पुस्तक होतं ‘भारत दर्शन ‘आणि त्यात काही लेख होते त्यातला कुरुक्षेत्रावरचा एक शेवटचा लेख होता त्यामध्ये मरताना दुर्योधन युधिष्ठराला म्हणतो “युधिष्ठिर मै तो विरोंको साथ लेकर स्वर्ग जा रहा हूं तुम विधवाओंको लेकर राज करो”*हे वाक्य संदर्भा सहित स्पष्टीकरण.. चार मार्क इतकाच अभ्यास केला… पण त्या वाक्याचा खरा अर्थ मोठ झाल्यावर कळायला लागला… की अरे खरंच युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाच होत असेल तर ते स्त्रियांचं होतं. पुरुष सगळे सैनिक… ते युद्धभूमीवर मरतात तो मरणारा माणूस कोणाचातरी भाऊ असतो,  कुणाचा तरी मुलगा असतो,  कुणाचा तरी बाप असतो,  कुणाचा तरी नवरा असतो, आणि या सगळ्या बायकांची म्हणजे आई मुलगी बायको या सगळ्यांची यानंतर परवड होते म्हणजे सर्वात जास्त नुकसान स्त्रियांचं होतं… त्यांना वैधव्य घेऊन बिनआधाराचे जगावे लागते आणि ते खरोखर कठीण होते… आणि तो विजय पांडवांच्या हातात येताना सुद्धा त्याला कारुण्याची केवढी झालर होती हे आपल्या लक्षात येईल. पांडव कोणावर राज्य करणार होते? … पुरुष तर सगळे मेले होते ना युद्धात…! ही ही सगळी त्याकाळी होणारी जमिनीवरची युद्ध त्या युद्धाला नियम होते. सामान्य माणसाला त्याची झळ फक्त या पद्धतीने लागत होती मालमत्तेचं नुकसान नव्हतं आताची युद्धं वेगळी आहेत पण कारणं तीच आहेत.. सत्ता…! माझ्या हातात सत्ता असायला हवी. आपल्या भूभागापलीकडे जाऊन मला सत्ता हवी आहे. आणि तो भूभाग मला काबीज करायचा आहे. तेच कारण आहे… तेल साठ्यांचा भूभाग आपल्या ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न…! यामध्ये भारत मात्र चतुर आहे. एकीकडे विरोधी पक्ष हाकाटी पिटत आहे की भारताने कोणाची तरी बाजू घ्यावी नरेंद्र मोदी सारखा हुशार पंतप्रधान त्यांनी कोणाची बाजू घेणे पसंत केले नाही पण आपणच युद्धात मध्यस्थी केली पाहिजे अशी परिस्थिती मात्र फार पूर्वीपासून त्यांनी तयार केली आहे चाबहार(चारबहार) बंदर

विकसित करून भारताने त्या ठिकाणी मोठे काम केले आहे त्यामुळे हा भौगोलिक प्रदेश तेल साठे उपलब्ध करून देण्याला अत्यंत उपयुक्त आहे तो विकसित करून देण्याची ताकद भारतीय इंजिनियर्स मध्ये आहे त्यामुळे इराणला आपल्या विरोधात जाऊन चालणार नाही तसेच ट्रम्प साहेबांना सुद्धा युद्धामध्ये तेल साठ्यावरती आक्रमण करायचे नाही. कारण ते संपले तर युद्धाचे कारण संपेल तेव्हा यातील काही बेटांवर येथे तेल साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत ती बेटे सुरक्षित आहेत.! … कालच बातमी आपण वाचली की रिलायन्स कंपनीने तेला साठ्याबद्दल मोठा सौदा केला आहे वगैरे वगैरे… हे काय आज ठरलेलं नसतं अनेक वर्षापासून याची योजना झालेली असते ते साठे आपल्या वर्चस्वाखाली कसे येतील याची तरतूद मोदी सरकारने आधीच करून ठेवली त्यामुळे आता मध्यस्थिला जर बोलावलं गेलं तर ते फक्त मोदींना बोलवलं जाईल आणि युद्ध थांबेल. युद्ध भौगोलिक कारणाने सुरू होते त्याने इतिहास घडतो,  बदलतो, सत्ता पालट होऊ शकतो, याचा नेमका फायदा कसा उठवायचा याचे ज्याला सूत्र कळाले तो त्या युद्धात न पडताही त्यावर वर्चस्व गाजवतो.

भारतासारख्या शांतता प्रिय राष्ट्राला युद्ध नकोच आहे.. कुणाचेच नकोय! कारण आम्ही बुद्धाला मानणारे लोक आहोत कोणत्याही देशातल्या शाळेतली मुलं एखाद्या बॉम्बने मृत्युमुखी पडणं या बातमीने आमच्या देशातला प्रत्येक नागरिक अस्वस्थ होतो. युद्धात अपरिमित हानी होते ती महिलांची आणि मुलांची परवा तर मी एक व्हिडिओ पाहिला आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॉम्ब चे गोळे पडत होते. अंगाला तोंडाला काळ लागलेल आहे पडल्यामुळे काहीतरी थोड्याशा जखमा झाल्यात असा एक छोटा मुलगा जो पाठीमागे होत असलेल्या बॉम्ब च्या आवाजाने भयभीत झालेला आहे आणि तो हात हलवून सांगत होता” प्लीज स्टॉप इट प्लीज स्टॉप इट “… त्याच्या चेहऱ्यावरचे भय पाहून डोळे पाणावले. तसेचयुक्रेंनच्या युद्धाच्या वेळी सुद्धा तेथील मुलांना सुरक्षितपणे हलवत होते तेव्हा एक मुलगी अगदी पाच सहा वर्षाची बापाला सोडून जायला तयार नव्हती आणि ते दोघे इतके धाय मोकलून रडत होते. त्यांच ते दूर जाणं बघून पोटात अक्षरशा कालवत होत..! काय मिळवणार आहोत जमिनीच्या तुकड्यावर सत्ता साधून..? हे सत्तेची अभिलाषा असणाऱ्यांनाच ठाऊक पण दुनियेतल्या सगळ्या दुःखाची जाणीव झाल्यानंतर शांततेच्या शोधात फिरलेल्या बुद्धांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे त्यामुळे आपण भारतीय लोक युद्धापेक्षा शांती पसंत करतात परवाच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही फक्त जो संदेश द्यायचा होता तो दिला वास्तविक पाहता पाकिस्तान बरोबर दोन हात करून त्याला नेस्तनाबूत करणे इतकी ताकद भारताकडे नक्कीच आहे पण आपल्याकडे एक मंत्र आहे फुत्कारो लेकिन काटो नही आम्हाला कोणालाही बेचिराख करायचे नाही त्या देशातल्या निरपराध सामान्य माणसाला काहीच करायचे नव्हते तुम्ही तुमच्या देशात सुखाने नांदा आम्ही आमच्या देशात पण… पण जर काही कराल तर मात्र सोडणार नाही हे नुसत्या फुत्कारण्यावरून आम्ही दाखवून देतो आमच्यासमोर उदाहरण असतं… सगळं जग जिंकल्यानंतरही मोकळ्या हाताने परत जाणाऱ्या नेपोलियनचे… आणि प्रेतांचे खच पाहून अस्वस्थ झालेल्या सम्राट अशोकाचे… म्हणून आम्हाला भारताला युद्ध नकोच आहे. आम्हाला फक्त बुद्ध हवा आहे! शांततेचा संदेश देणारा… स्थिर जीवनाची शाश्वती देणारा… निसर्गाला जपायला सांगणारा. आणि युद्धभूमी वरती ही गीता सांगणारा कृष्ण.. आम्ही आजही पसंत करतो आणि मला वाटते हेच आम्हा भारतीयांच्या संतोषकारक समाधानाच्या जीवनाचे रहस्य असावे…!

टीप :वरील लेख खूप अभ्यासाचा नाहीच आहे मला नेमकं काय वाटलं त्याचा आहे त्या दृष्टिकोनातून याचे मूल्यमापन करावे.

©  शीला पतकी

निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि संचालिका नापास शाळा सोलापूर

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments