शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पाच मिनिटं… आणि बदललेलं घर’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

 

एका मित्राच्या घरी गेलो होतो…

साधंसं २ BHK… पण समाधानाने भरलेलं.

 

मित्र—माझ्याच वयाचा.

शून्यातून उभं राहिलेला.

पुण्यात स्वतःचं घर, छोटंसं का असेना पण स्वतःचं.

बायको—घर सांभाळणारी, मनापासून आदरातिथ्य करणारी.

दोन मुलं—आधुनिक, स्मार्ट, स्वतःच्या जगात रमलेली.

 

अरे पिठलं-भाकरीला ये कधी!

असा अचानक आलेला फोन… आणि मी गेलो.

 

घरात गेलो…

हॉलमध्ये बसलो…

चहा आला… गप्पा रंगल्या…

पण एक गोष्ट सतत खटकत होती—

दोन्ही मुलं समोर बसलेली…

पण खरंतर तिथे नव्हतीच.

त्यांचं पूर्ण जग मोबाईलमध्ये हरवलेलं.

 

इतक्यात एक छोटासा प्रसंग घडला…

मित्राचा मोबाईल हँग झाला.

त्याने मुलाला बोलावलं.

मुलाने दोन सेकंदात सगळं ठीक केलं…

पण जाताना एक वाक्य टाकून गेला—

इतकी घाई कशाला करता? थांबता येत नाही का? ”

मुलगीही लगेच—

हो, परवा पण असंच केलं होतं…

 

त्या दोन वाक्यांनी वातावरण बदललं.

मित्र शांत… सवयीचा झालेला.

पण वहिनीचा चेहरा…

तो मात्र सगळं सांगून गेला.

 

मीही शांत बसलो होतो…

पण आत काहीतरी हलत होतं.

वाटलं—आपलं काम नाही… जेवून निघू.

पण दुसरं मन म्हणालं—

आज नाही बोललास, तर कधीच नाही.

 

मी त्यांना हाक मारली.

पाच मिनिटं द्या… लेक्चर नाही… फक्त गप्पा.

 

ते दोघं आले… मोबाईल बाजूला ठेवून.

आणि तिथून पुढे…

फक्त शब्द नव्हते—

ती एक पिढी दुसऱ्या पिढीशी बोलत होती.

 

मी त्यांना सांगितलं—

हो… आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये थोडे मागे आहोत.

पण लक्षात ठेवा—

आमच्या आयुष्यात साधा फोनही उशिरा आला.

तिथून इथपर्यंत आलोय… स्वतःच्या बळावर.

 

तुम्ही मोबाईलसोबत मोठे झालात…

म्हणून ते तुम्हाला जमतं.

पण त्यामुळे तुम्ही मोठे होत नाही…

कारण मोबाईल हुशारी नाही मोजत…

तो फक्त वापर मोजतो.

 

आई-बाबांनी गुगलशिवाय आयुष्य जगून दाखवलंय…

तुमच्यासाठी.

आणि तुम्ही… त्यांच्याच पैशाने घेतलेल्या मोबाईलवर

त्यांनाच शिकवता?

 

टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे…

पण ती सगळं नाही.

नातं दुखावलं, तर

कोणतीही ‘ऍप’ ते परत जोडू शकत नाही.

 

मोबाईल तुम्हाला जग दाखवतो…

पण घरातली माणसं विसरायला लावतो…

तर तो उपयोगाचा नाही.

 

आम्ही आजही मित्रांना घरी बोलावतो…

गप्पा मारतो…

त्या दोन तासात मोबाईल आठवत नाही.

आणि तुम्हाला…

टॉयलेटलाही मोबाईल लागतो…

मग खरा ‘ऍडिक्ट’ कोण? ”

 

घरात शांतता होती…

पण ती अस्वस्थ नव्हती—

ती विचारांची होती.

 

मी थांबलो.

 

दोन क्षण गेले…

आणि अचानक—

मुलगा उठला…

बाबांच्या जवळ गेला…

आणि हळूच म्हणाला—

सॉरी…

 

तो एक शब्द…

पण त्या घरातला सगळा आवाज बदलून गेला.

 

वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं…

मुलगी शांत झाली…

मित्र काही बोलला नाही…

पण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान…

सगळं सांगून गेलं.

 

मी वातावरण हलकं केलं…

एक जोक सांगितला…

आणि आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो.

 

 

शेवटी त्यांना एकच सांगितलं होतं—

 

आभाळाला गवसणी घालायची असेल…

तर जमिनीला विसरू नका.

कारण ज्या मातीवर उभं राहून तुम्ही उंच जाता…

तीच माती कधीतरी आधार बनते.

 

आई-बाबा हे फक्त नातं नसतं…

ते तुमचं मूळ असतं.

आणि मूळ जपलं…

तरच झाड कायम हिरवं राहतं…

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments