प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – राणी वेलू नचीयार  – लेख क्र. ६. ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं मनात आठवणींचे मोहोळ उठतं! ब्रिटिश राजवटीचं दाटलेलं, दाट, गर्द सावट; लाखों-करोडोंनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात केलेलं जीवांचं समर्पण!! अनेक स्मरणीय, काही मात्र विस्मृतीत! काहींचं बलिदान लक्षणीय, तर काही अलक्षित!! पण बलिदान मात्र सगळ्यांचंच! ते व्यर्थ नाहीच! पण तरीही इतिहासात नोंद न झालेल्या अशा अनेक स्त्री हुतात्म्यांच्या प्रेरणा स्त्रोतांच्या झाकोळलेल्या कर्तृत्वाला नव्याने झळाळी देण्याचा हा प्रयत्न!

राणी वेलू नचियार

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील रामनाथपुरम च्या राज परिवारात जन्मलेली एकुलती एक कन्या. जन्मजात विलक्षण प्रतिभेचं लेणं लेऊन आलेली! पित्याने तिचं लालन-पालन राजकुमारासारखंच केलेलं. अस्त्र, शस्त्र, तलवारबाजी, तिरंदाजी, भाला फेक, लाठी चालविणे, आदि सर्व युद्धकलेत पारंगत झालेल्या *वेलू* ने, ‘सिलंबम’ या तामिळी मार्शल आर्ट मध्ये ही कुशलता प्राप्त केली होती.

युद्धकला प्रविण वेलू नचियार ने तमीळ, तेलगू, मल्याळी, फ्रेंच, उर्दू… या भाषांवर ही प्रभुत्व मिळवले होते. हे कमी होतं म्हणून की काय तिने महान अशा तामिळ ग्रंथांचे वाचन करून ही, आपलं व्यक्तित्व बहुपेडी, बहुआयामी, बहुश्रुत बनवून स्वतः ला राज्याची उत्तराधिकारी म्हणून सिद्ध ही केले.

वयाच्या १६ व्या वर्षी राजा शशीवर्मा यांचे सुपुत्र… *मुत्तू वेदुंगानाथ थेवर* यांच्याशी विवाह झाला. वेलू आपल्या जीवनसाथी ची ख-या अर्थाने ‘ संगिनी’ सिद्ध झाली. वेळोवेळी आपल्या पतीची… मित्र, सल्लागार, एक विश्वासू सहयोगी सिद्ध झाली ती! पण दुर्दैवाने ईस्ट इंडिया कंपनी ची नजर शिवगंगा वर पडली, त्यांनी १७७२ मध्ये शिवगंगा वर आक्रमण केले. एक *विध्वंसक युद्ध* म्हणून इतिहासात नोंदलं गेलेलं हे युद्ध! निर्दयता आणि नृशंसता याची हद्द पार केली इंग्रज सैनिकांनी! अगदी वृद्ध, महिला, बालके ही नाही सुटली त्यांच्या हिंसाचारातून! वेलू नचियार च्या पतीला ही हौतात्म्य प्राप्त झाले.

वेलू आणि तिची कन्या वेल्लाची स्वतः ला सुरक्षित वाचवंत, तामिळनाडूतील डिंडिगुल येथील जंगलातील एका सुरक्षित जागी जाऊन पोहोचल्या आणि तेथेच वास्तव्य केले.

आपलं राज्य परत मिळविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा, या राणीला स्वस्थ बसू देईना. तिचा आत्मविश्वास तिला आतून सारखा *लढ, आगे बढो*… अशी साद घालत होता.

वेलू नचियार ने कंबर कसली. आपली अस्त्र-शस्त्र विद्येतली पारंगतता पणाला लावायचं ठरवलं आणि आसपासच्या महिलांना गोळा करून त्यांच्यात देशाचं रक्षण करण्याचं स्फुल्लिंग चेतवलं या *समिधेने*! स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या होमकुंडात स्वतः ला समर्पित करणा-या अशा अनेक महिलांची सांगड घालंत, जणू एक *मोळीच बांधली* तिने! स्त्रियांना स्वतः तलवारबाजी, निशाणे बाजी सातत्याने ८ वर्षे शिकवत राहिली, तयारी करीत होती ती युद्धाची!

तिने त्यांना सैन्य रणनीती शिकवली. राणी वेलू नचियार चा हा मार्ग अतिशय खडतर होता. एकटीने बांधलेली सांगड तिला योग्य वेळी अर्पण करायची होती. पण दुर्दैवाने त्या त्याग आणि बलिदानासाठी, स्वातंत्र्य मंत्रोच्चारांनी सिद्ध आणि सिक्त समिधांमधील एक समिधा जिला युद्धा आधीच… राणीच्या शोधात आलेल्या इंग्रज सैनिकांना तिचा ठाव-ठिकाणा सांगितला नाही म्हणून हौतात्म्य पत्करावं लागलं! ती होती ऊदइयाल… राणीची मानसकन्या! जिने जणू काही आपल्या प्राणांचे बलिदान देऊन, मातृ वंदना दिली आणि ही समिधा निमाली!!

मग तिच्या वीर गती प्राप्ती च्या स्मरणार्थ राणीने स्थापिली एक नारी सेना… आणि तिला नाव दिले उदयियाल!!

एका समिधेच्या समर्पणाने चेतविलेल्या अनेक समिधा गोळा झाल्या… देश प्रेमाने बांधलेल्या, भारलेल्या, एकजुटीने!!

राणीने त्यांचं सेनापतीपद सोपवलं… तिच्या दुस-या मानसकन्येला… विश्वासू, तीक्ष्ण बुद्धी, वीरांगनेला… कुयिली ला!! आणि मग सुरू झाली युद्धाची तयारी!!

राणी वेलू नचियार… आपलं राज्य परत मिळविण्यासाठी ज्या योजना मोठ्या योजकतेने आखत होती, त्यांत एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिने म्हैसूर च्या राजाला हैदरअली ला पत्र लिहून केलेली भेटीची विनंती!

राजाने ही तिचे अगदी राणीचा आब, इतमाम, आणि स्वाभिमान कायम राखणारं असं सन्मानित स्वागत केले. तिचे आतिथ्य ही केले. राणीने ही आपल्या उर्दू भाषेत संवादी होत, त्याला खूप प्रभावित केले. त्यानंतर हैदरअली ने राणीला मदत करण्याचे नुसते वचन नाही दिले, तर प्रत्यक्षात ४०० पौंड आणि ५००० सैनिकांची फौज ही दिली. इतकंच नाही तर असं म्हणतात की, राजाने त्यांच्या या आगळ्या, पवित्र, आणि एकाच ध्येयासाठी झपाटलेल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून महालात एक मंदीर ही बांधले.

अशी ही युद्धाची तयारी ८ वर्षे चालली होती. आणि शेवटी तो दिवस आला. ज्याची वाट राणी आणि तिची नारी सेना… रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग… असं म्हणंत त्या प्रसंगाची वाटच बघत होती.

दस-याचा दिवस उजाडला! शिवगंगा किल्ल्यात देवी राजराजेश्वरी चं मंदीर! प्रतिवर्षी दसरा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया येत. तशाच आल्या. स्त्रियांसाठी मंदिराचा दरवाजा उघडला गेला. मंदिराजवळच इंग्रजांचे शस्त्रागार असल्याची खबर नारी सेनेच्या सेनापती ला… *कुयिली ला* आधीच लागलेली. त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार, विजेच्या लोळासारखा शिरला. त्याचा तिने कुणाला थांगपत्ता ही नाही लागू दिला.

तिच्या विचारांत ते विद्युल्लतेचं तेज झिरपू लागलं हळूहळू!!!

मंदिराचा दरवाजा उघडला… उदायल नारी सेना साधारण वेषात… फुला-फळांच्या टोपलीत; हत्यारे लपवून आत प्रवेशल्या. दस-याचा क्षणी *कुयिली* ने क्षणाचाही विचार न करता… एक क्षण ही न दवडता… सेनेला आपल्या अंगावर पूजेसाठी आणलेल़ सगळं तूप ओतायचा जणू हुकूमच दिला… आणि तशी कार्यवाही होताच… तिने आग लावली स्वतः ला! पापणी लवायच्या आत… आगीचे लोळ उठले… कुयिलीने उडी घेतली थेट शस्त्रागारात… आणि कानठळ्या बसविणा-या, एकामागोमाग एक होणा-या स्फोटात, संपूर्ण शस्त्रागार राख झाले… आणि त्यातच

इतिहासातला पहिला आत्मघातकी मानवी बॉंब… कुयिली… एक जळती, तेज:पुंज, पवित्र उद्देशाने भरलेली, आणि भारावलेली समिधा समर्पित झाली, त्या अग्नी दाहात!

नाही कुठेच नोंद फारशी… आणि तिच्या दहनभूमी वर नाही चिरा नाही पणती

अशा या दोन समिधा आपल्या जुडीत, सांगडीत बांधून घेणा-या तिस-या समिधेने… राणी वेलू नचियार ने मग… सर्वशक्तीनीशी शिवगंगा किल्ला काबीज केलेल्या इंग्रजांवर हल्ला बोल करून… आपल्या युद्ध कौशल्याने आणि रणनीती ने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आणि शेवटी विजयश्री माला तिच्या गळ्यात पडली. त्यानंतर राणी ने १० वर्षे राज्य केले. राजा हैदरअली शी असलेली मैत्री थेट पर्यंत टिकवून ठेवली. त्याचा मुलगा *टिपू सुलतान* वर ही सख्ख्या भावासारखं प्रेम केलं. आणि नंतर आपल्या लेकीच्या हाती राज्य सोपवून ही पती निधनानंतर, सतत जळंत, धगधगंत, प्रज्वलित राहून, प्रजा हितासाठी स्वतः चं जळंत राहणं, प्रज्ज्वलन टिकवून ठेवणारी ही समिधा ही १७९६ मध्ये निमाली!!

राणी वेलू नचियार ला प्रजा वीर मंगईवीर महिला या नावाने संबोधायची. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई च्या जवळ जवळ ७५ वर्षे आधीचा हा वेलू चा संघर्ष! त्यामुळे ती एका अर्थाने राणी लक्ष्मीबाई ची प्रेरणा स्त्रोत च ठरते!

२००८ मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तिच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढलं!

 वेलू नचियार आजही… साहस, रणनीती, आणि नेतृत्व याचा आदर्श आहे महिलांसाठी!!

पण तरीही… भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित नायिका च ठरतीये! समिधांच्या सांगडीतल्या या… उदयियाल, कुयिली आणि वेलू नचियार… तिनही समिधांना कोटी कोटी प्रणाम!

स्मृतीतल्या संपुटीत जपूयात ही त्रिपुटी… आणि म्हणूयात ना… तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हां घडो! 

– लेख क्र. ६.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments