श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ जिंदगी, एक सफर, है सुहाना! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
२१ जानेवारी…
वडोदरा (बडोदा) रेल्वे स्टेशनवरची एक आळसावलेली सकाळ. सकाळी ८ वाजता अपेक्षित असलेली जोधपूर – हडपसर (पुणे) एक्सप्रेस दोन तास उशीरा धावत होती.
लोकं थोडेसे कंटाळलेले, उशीर होतोय ही तक्रार तर होतीच, पण “पु लं”च्या म्हैस कथेत म्हटल्याप्रमाणे, बस उशीरा येणार हे आधीच ठाऊक असतं, तर तासभर जास्त झोपलो असतो, हा सूर जास्त होता.
AC III मध्ये १७ ते २४ क्रमांकामधले उतरणारे प्रवासी उतरले होते, नवे प्रवासी चढून स्थिरावत होते, सामान जागेवर लावलं जात होतं, आणि त्या वेळी, “त्या दोघींचं” तिथे आगमन झालं.
त्यातली छोटी – पियू – गुलाबी दुपट्यात गुरफटलेली होती, भरतकामाने दुपट्यावर तिचं नाव मोठ्या झोकात लिहिलेलं होतं. पण लक्ष वेधून घेत होती ती तिची आई – रसिका. ती गुजराती होती, माहेर सुरतचं, सासर बडोद्याला, आता भाऊ IT कंपनीत पुण्याला नोकरीला असतो म्हणून ती आणि पियू मामाच्या गावाला निघाले होते.
ही सगळी माहिती आम्हाला कळण्याचे कारण रसिका स्वतःच होती. डब्यात शिरल्याशिरल्याच, आम्ही कोणीही न विचारताच, तिने ही माहिती आम्हा सर्व सहप्रवाश्यांना मोठ्या उत्साहाने सांगितली होती.
खिडकीत बसलेले पन्नाशीचे गृहस्थ कोणत्या तरी कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर असावेत, दोन तास आधी अहमदाबादला ते गाडीत चढले होते, आणि आल्यापासून कॉम्प्युटर उघडून काम करत बसले होते. बाळ आलेलं पाहिल्यावर त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या, बाळाच्या रडण्याने त्यांच्या कामात व्यत्यय येईल अशी त्यांची रास्त शंका होती.
रमणिकभाई आणि ज्योत्स्नाबेनसुद्धा बडोद्याहूनच पुण्याला निघालेले, आजी आजोबा कॅटेगरीतील या दोघांना या अनोळखी मायलेकींबद्दल प्रेम आणि कुतूहल.
Gen z ची रमोना हेडफोन लावून इतरांना न ऐकू येणाऱ्या संगीतात मग्न, पण तिनंही या दोघींना पाहिलेलं, या दोघींची दखल घेतलेली.
आणखी एक सहप्रवासी कोल्हापूरकडच्या भामाकाकू, एक पुण्याचा घारागोरा तरुण – जोशी किंवा गोखले आणि साईड बर्थला वरती स्थानापन्न झालेला मी – असे त्या १७ ते २४ क्रमांकाचे आम्ही तात्पुरते सहप्रवासी.
बाळाच्या कपड्यांच्या ढीगाने भरलेली मोठ्ठी पिशवी, खाण्याचा मोठा डबा, आणि पर्समधून डोकावणारी “बाल संगोपना”ची माहिती देणारी पत्रकं – अशा आयुधांनी रसिका सज्ज होती.
पियू झोपलेलीच होती, पण गाडीने स्टेशन सोडलं, आणि रसिकाच्या मोबाईलमधून “हा लू लू लू, हाला रे हाला” या प्रसिद्ध गुजराती अंगाईगीताचे सूर ऐकू येऊ लागले. रेल्वेत अचानक मिळालेल्या या संगीतसेवेने आम्ही सगळेच जण चमकून एकमेकांकडे बघू लागलो. कॉम्प्युटरवाल्या काकांनी घाऱ्यागोऱ्याकडे बघून “हे असं काहीतरी होईल असं मला वाटलंच होतं”, असं सांगणारा मुद्राभिनय केला, घाऱ्यागोऱ्यानेही नजरेतूनच त्याला दुजोरा दिला.
हे गाणं म्हणजे रमणिकभाई ज्योत्स्नाबेनचं होम पीच – त्यामुळे ते दोघं मात्र त्या तालासुरात हरवून आणि हरखून गेले.
पियूने झोपेत आळोखेपिळोखे दिले, हातवारे केले किंवा काही कुरकुरली, की रसिका लगेच त्याचे वेगवेगळे अर्थ आम्हाला, न विचारताच, संदर्भासह स्पष्ट करून सांगे. “बघा ना, माझी चहाची वेळ झालीये, असं सांगतीये ती. सगळं कसं बरोब्बर लक्षात असतं तिच्या! ” म्हणत रसिकाने पोतडीतून एक थर्मास काढला आणि आम्हा सगळ्यांच्या हातात रिकामे कप कोंबत त्यात वाफाळता चहा ओतू लागली. “मसाला चहा – चाय गरम. नाही म्हणायचंच नाही! ” तिनं कॉम्प्युटरवाल्या साहेबांना ठणकावून सांगितलं.
चहा फर्मास होता, कॉम्प्युटरवाल्या साहेबांचा चेहरा फ्रेश झाला, कपाळावरची एखाद आठी कमी झाल्यासारखी वाटली.
एव्हाना सूरत स्टेशन आलं होतं, पाच मिनिटं ट्रेन थांबणार होती. पियूला भामकाकूंच्या मांडीवर ठेवून रसिका दारात उभी राहिली. आणखी खाण्याचं सामान घेऊन तिचे आई बाबा आले होते. गाडी सुटल्यावर आम्हा सगळ्यांना “मेरे माँ के हाथोंसे बनाये” हुवे सुरती उंधियू दिले गेले. या चवीला रमोनानेसुद्धा हेडफोनसह दाद दिली.
पियूचे घोराख्यान सुरूच होतं.
उंधियू पाठोपाठ तोंड गोड करण्यासाठी “फ्रूट मठ्ठो” नावाने फ्रुट श्रीखंड आलं. “तमे खबर छे? पियू का पहला सॉलिड खाना यही था” मग इथून पुढे काही काळ पियूच्या वेगवेगळ्या “पहिल्या गोष्टी” ऐकण्यात गेला. पहिलं smile, पहिली ढेकर, पहिल्यांदा तिनं आईचं बोट धरलं, आणि अशा अनेक कथा!
स्वतःबरोबर आणलेल्या खाण्याव्यतिरिक्त येणाऱ्या जाणाऱ्या फेरीवाल्याकडून भेळ, समोसे, वडापाव यावर ती मनसोक्त ताव मारत होती. तिने दिलेले खारे शेंगदाणे आम्ही सगळे कुडूम कुडूम आवाज करत खात होतो आणि भरूचचे शेंगदाणे, नारळ पाण्यात भिजवलेले शेंगदाणे या विषयांवरच्या परिसंवादात सहभागी होत होतो. “नारळपाण्यात भिजवलेले शेंगदाणे गोड होतात, त्यामुळे त्यांना खारे शेंगदाणे का म्हणावे? ” असा अस्मितेचा प्रश्न घाऱ्यागोऱ्याने उपस्थित केला.
जेवणखाण्याचे आदानप्रदान केले गेले, आणि मग मोबाईलमध्ये गजर लावून, “चला, पियू झोपली आहे, जेवणानंतर तुम्ही सगळेसुद्धा अर्धा तास झोपा पाहू” असं फर्मान सोडत, गाडीत शिरल्यापासून पहिल्यांदाच, रसिकाचा लाऊडस्पीकर शांत झाला.
आता आमच्या १७ – २४ मध्ये, गाडीचा लयबद्ध आवाज आणि त्याला विसंवादी भामाकाकूंच्या घोरण्याचा खर्ज एवढे दोनच आवाज भरून राहिले होते. घोरण्याला लय सापडली, काकू समेवर आल्या, आणि नेमका रसिकाच्या फोनचा गजर खणखणला, “चलो, wake up, wake up. जादा सोना सेहत के लिये हानीकारक होता है”, रसिकाची टकळी पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली.
मग कर्जतचे वडे आले, रसिकाने दिलेले फाफडा – खाकरे खाणं झालं, कॉम्प्युटरवाल्या सरांनी सगळ्यांना कॉफी पाजली.
बघता बघता चिंचवड यायची वेळ झाली. रसिका इथे उतरणार होती, तिचा भाऊ हिंजवडीला नोकरीला होता, तिथे जायला चिंचवडला उतरणं जास्त सोयीचं होतं.
उतरण्यापूर्वी, रसिकाने आम्हा सगळ्यांना हाताने चित्र काढलेली छान छान ग्रीटिंग कार्डं दिली – ती त्या पियूच्या नावाने होती – प्रवासात तिच्यामुळे काही त्रास झाला असला तर त्याबद्दल खूप सॉरी म्हणणारी.
चिंचवड आलं, स्टेशनवर रसिकाचा भाऊ तिला घ्यायला आला होता. प्रवासात बहुतेक वेळ झोपलेली पियू आता मात्र जागी झाली होती. आम्हा सगळ्यांना टाटा करत ती मामाच्या कडेवर जाऊन बसली.
प्रवासात पियू तर छान झोपली होती, तिचा काहीच त्रास झाला नव्हता. पूर्ण प्रवासभर तिच्या आईचीच – रसिकाचीच चिवचिव सुरू होती. पण त्यामुळे एरवी संभावित सौजन्याचे पोशाखी मुखवटे घालून प्रवास करणाऱ्या आम्हा सहप्रवाशांचा प्रवास मात्र “जिंदगी, एक सफर, है सुहाना” होऊन गेला होता.
(काल्पनिक कथा)
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





