प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ११. ☆ प्रा.भारती जोगी ☆

” ओठांवर हसू म्हणजे येसू

 पावलात यश म्हणजे येसू!

आजपासून ही आमची येसूबाई! “

.. हे मोठ्या कौतुकाने उच्चारलेले गौरवोद्गार आहेत… दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे! 

महाराज कोकण मोहिमेवर गेले असतांना, दक्षिण कोकणातील शृंगारपूर इथल्या पिलाजीराव शिर्के यांच्या भेटीचा योग आला. शिर्के घराणे धाडसी, पराक्रमी म्हणून प्रसिद्ध. त्यावेळी महाराजांच्या नजरेस पिलाजीरावांची कन्या राजाऊ उर्फ जिऊबाई पडली.

त्यांच्या नजरेनं ताडलं त्वरित की, आपल्या संभाजी राजे नावाच्या वादळाला हे तुफानच बांधू शकतं. त्यांनी लगेच तिचं येसूबाई हे नामकरण करून आमची म्हणत आपली स्नुषा म्हणून मान्यता देऊन टाकली.

त्यावेळी येसूबाई अवघ्या ६-७ वर्षे वयाच्या होत्या. पण मांसाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली अशा काही घडत गेल्या… जसं मुशीतून झळाळतं सोनं बाहेर यावं. मांसाहेबांचे सगळे गुण… माया, ममता निर्णयक्षमता, निरपेक्ष वृत्ती… सगळे उतरले त्यांच्यात. जिजाऊंची सावली, छबी म्हणत लोक!

येसूबाईंना जबाबदारीची समज त्यामुळे लहानपणीच आली. असं म्हणतात की, छोट्या येसू ने छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा हातात तलवार घेऊन तलवार ही स्त्रीच आहे… हे सिद्ध करत… तलवारीला

जणू… नाक, नथ, नथनी, डोळे, नखं, गळा, कंठी फूल, मोगरा, पुतळा कटोरा, नखा, सुचिन्ह,… या सगळ्या आभूषणांनी मंडित दाखवून दिले आणि शेवटी तिची तेज धार दाखवत सूचित केले की, आभूषणांनी शृंगारलेली असली म्हणून तिला शोभेची बाहुली समजण्याची चूक कधीही करू नका. वेळ आली तर तिची धार तिचं शस्त्र बनून ती रणचंडी ही बनू शकते. येसू मधली राज्ञी आणि वीरांगना ही दोन्ही चकित करणारी पण महाराजांना अपेक्षित अशी रूपं बालपणीच निदर्शनास आली ती अशी! बालपणातील अवखळपणातलं ; करारीपण दिसलं आणि महाराज आपल्या अचूक आणि सुयोग्य निवडीवर संतोष पावले.

येसू जसजशी मोठी होत गेली, जाणीवा ही विस्तारत गेल्या तिच्या! तिला जाणवलं की तिची गाठ एका वादळाशी बांधली गेली आहे. म्हणूनच मग तिनेही या स्वराज्य रक्षक पतीच्या… संभाजी राजेंच्या या स्वराज्याच्या धगधगत्या होमकुंडात आपण ही एक समिधा होऊन समर्पित व्हावं असा निश्चय केला. बघता-बघता स्वराज्याचं कुलमुखत्यार पद बहाल झालं तिला. स्वराज्याची पहिली कुलमुखत्यार झाली ती! राजेंनी तिचा सन्मान म्हणून… तिच्या नावाची… तिच्या गुणविशेषांना अधोरेखित करणारी अशी राजमुद्रा असलेली शिक्के कट्यार दिली. त्यावर कोरलेले शब्द… श्री सखी राज्ञी जयती… खरंच त्या काळात एका कर्तबगार पतीचा, आपल्या पत्नीच्या कर्तबगारीवर असलेला ठाम, दृढ विश्वास नक्कीच लक्षणीय आणि विचारप्रवर्तक ठरावा!!

येसूबाई संभाजी राजेंची ख-या अर्थाने सहचरी, सोबती, सावली, सुकांता सिद्ध होतच गेल्या… प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात! अगदी खांद्याला खांदा लावून उभी रहात, सोबतीने आणि प्रसंगी एकटीने ही दमदार पावलांची साथ दिली या हिंदवी स्वराज्याच्या वाघिणी ने या वाघाला!!

अवघा २३ वर्षांचा संसार… त्यातही जोडीदाराच्या सतत सहवासाला मुकलेल्या येसूबाई… अगदी शांत स्थिर चित्ताने, स्थिर मतीने ठाम राहून राजेंच्या अनुपस्थितीत, ते स्वारीवर असतांना स्वराज्य सांभाळलं! एकही राजकारण शिजू दिलं नाही. प्रजेला अगदी लेकरासारखं सांभाळलं. पती जिवंत असतांनाही एकदा काही काळ छत्रपतींच्या सूचनेनुसार विधवेचं आयुष्य ही व्यतीत करणारी ही समिधा कणा-कणाने जळतच राहिली… समर्पित झाल्यानंतर तिचं स्वतः चं असं अस्तित्व उरलंच कुठे होतं ना! ती स्वराज्यरक्षक संभाजी राजेंची सच्ची सहधर्मचारिणी होती ना!!!!

संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेत गेल्यानंतर… त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जखमेच्या वेदनेची झळ, धग, थेट पोहोचत होती येसूबाईंच्या हृदयी! वेदनांच्या विचारांनी रक्तबंबाळ होत, होरपळून निघायच्या त्या! पण तरीही आपल्या वेदनांचा, दु:खाचा बाजार नाहीच मांडला या राज्ञी ने… स्थितप्रज्ञ राहून राज्यकारभार चालवला. संभाजी राजे गेले… संपूर्ण राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली.

… पण ही हिंदवी स्वराज्याची वाघीण डगमगली नाही. यावेळी स्वराज्यानं एक वेगळंच रूप पाहिलं येसूबाईंच!! त्यागमूर्ती!!! रायगडाला मुघलांचा वेढा पडला त्यावेळी ठरवलं असतं तर आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करवला असता. पण येसूबाईंनी त्यावेळी जो दूरदर्शीपणा आणि धोरणीपणा दाखवला तो लक्षणीयच होता. त्यांनी पुत्र प्रेमापेक्षा, स्वराज्य प्रेमाला प्राधान्य दिले. आणि आपले दीर, राजाराम महाराज यांना गादीवर बसवले आणि इतर सगळ्यांना राजाराम महाराजांना घेऊन जिंजीला रवाना केले. राजाराम महाराज सुरक्षित राहिले तरच स्वराज्य जिवंत राहील हे त्यांनी ओळखले होते. दोन्ही वारस एकाच वेळी हाती लागू नये ही येसूबाईंची मुत्सद्देगिरी!! .

स्वराज्य राखण्यासाठी.. ८-९ महिने एकटीच स्त्री किल्ला लढवत होती. जयती राज्ञी च्या रूपात जणू स्वतः ला सिद्ध करत… राजमुद्रा सजीव, बोलकी करू पहात होत्या येसूबाई!!

.. पण हाय रे दैवा… फितुरीचा शाप नडलाच नेहमीप्रमाणे! आणि येसूबाई आणि शाहू राजे दोघांना औरंगजेबाच्या कैदेत जावे लागले. पण कैदेत ही येसूबाईतल्या मातेने आपल्या शाहूवर, राजधर्म, राज संस्कार आणि मराठी संस्कृतीचे संस्कार केले. जणू त्याच्या भविष्यातील राजेपदाची ही रुजवणच होती!

थोडी थोडकी नाहीच ना… तब्बल २९ वर्षे ८ महिन्यांची कैद भोगावी लागली असं म्हणतात. म्हणजे अर्ध आयुष्य आणि ७ वर्षांच्या शाहू राजेंचा ही उमेदीचा काळ कैदेतच गेला. पण येसूबाई कशा राहिल्या, त्यांनी हा एवढा मोठ्ठा प्रदीर्घ काळ कसा कंठला असेल… इतिहासाने येसूबाईंच्या एवढ्या लक्षणीय, नजरेत भरणा-या योगदानाची योग्य अशी, म्हणावी तशी आणि म्हणावी तितकी नोंदही घेतली नाही. त्यांच्या समाधी जवळ… नाही चिरा नाही पणती!!

जवळपास ३० वर्षांचा वनवास… चार भिंतीत… परकीयांच्या कैदेत… ७ वर्षांच्या लेकरासोबत… पती शिवाय… पण… तिच्या या वेदना, विरह, व्यथा… संसार आणि स्वराज्य पेलून धरण्याचं असिधारा व्रत… या सगळ्यांकडे डोळेझाक केली गेली की काय? असाच प्रश्न पडतो.

या समिधेचं समर्पण, जळत रहाणं… राख होईपर्यंत… खरंच… तेथे कर माझे जुळ*!!

– लेख क्र. ११  .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted