श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ घर – उतारवयातील आर्थिक भागीदार…  – लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पुण्यात राहणारे देशमुख काका आणि काकू. वय अनुक्रमे ६५ आणि ५८. आज त्यांच्या कोथरूडमधील फ्लॅटची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. पण हा फ्लॅट त्यांना आयता मिळालेला नाही. चाळिशीत असताना त्यांनी Home Loan घेतल, अनेक वर्षे EMI भरले, काटकसर केली आणि शेवटी हे घर स्वतःच्या मालकीचं केलं. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे, मुलगी बंगळुरूत. दोघेही सुखात आहेत. पण देशमुख दांपत्यासमोर एक प्रश्न उभा राहिला आहे. घर आहे, पण नियमित उत्पन्न नाही. FD वरील व्याज कमी पडू लागलं आहे. वाढते वैद्यकीय खर्च आहेत. मुलांकडे मागायचे नाही आणि आयुष्याच्या या टप्प्यावर पैशांची चिंता करत बसायचं नाही. अशा वेळी त्यांना ” रिव्हर्स मॉर्गेज ” या योजनेची माहिती मिळाली आणि त्यांना जाणवलं की आयुष्यभर ज्यासाठी कष्ट केले, ते घरच आता त्यांच्यासाठी काम करू शकतं.

सामान्य माणसाने घराला नेहमी संपत्तीपेक्षा जास्त काहीतरी मानलं आहे. ते फक्त चार भिंतीचं बांधकाम नसतं. त्यात आयुष्याची कमाई, आठवणी, त्याग आणि स्वप्न गुंतलेली असतात. म्हणूनच “घरावर कर्ज” हे शब्द ऐकले की अनेक ज्येष्ठ नागरिक घाबरतात. पण रिव्हर्स मॉर्गेज हे नेहमीच्या कर्जासारखं नाही. यात घर विकावं लागत नाही, घर सोडावं लागत नाही आणि मालकीही तुमच्याच नावावर राहते. उलट तुम्ही ज्या घरात राहता, तेच घर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनतं. विशेषतः ज्यांना पेन्शन नाही, ज्यांची बचत कमी पडू लागली आहे किंवा ज्यांना मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही, त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

रिव्हर्स मॉर्गेजमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं राहतं घर बँकेकडे तारण ठेवता आणि बँक तुम्हालाच दरमहा पैसे देते. साधारणपणे ६० वर्षांवरील व्यक्ती यासाठी पात्र असतात. पती-पत्नी संयुक्त अर्जदार असू शकतात. घराची मालकी मात्र तुमच्याच नावावर राहते. देशमुख काकांच्या ३ कोटी रुपयांच्या घराचं उदाहरण घेतलं तर बँक साधारणपणे घराच्या किमतीच्या ४० ते ६० टक्के मूल्य विचारात घेते. म्हणजे सुमारे १. २ ते १. ८ कोटी रुपयांच्या आधारावर त्यांना योजना मिळू शकते. प्रत्यक्ष मासिक रक्कम, बँक व्याजदर, वय आणि योजनेच्या अटींवर अवलंबून असते. पण अशा मूल्याच्या मालमत्तेवर साधारणपणे दरमहा ५० हजार ते १ लाख रुपयांच्या आसपास मासिक उत्पन्न मिळू शकतं. काही घरांसाठी ते यापेक्षा कमी किंवा अधिकही असू शकतं. मुद्दा एवढाच की आयुष्यभर कष्टाने उभं केलेलं घर आता खर्चाचं ओझं न राहता उत्पन्नाचं साधन बनतं. त्यांना आता जगभर प्रवास करायचा असेल, चांगले उपचार घ्यायचे असतील किंवा फक्त निर्धास्तपणे जगायचं त्यांच्यासाठी देखील हा एक स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत तयार होतो.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या घरातच राहू शकता. अनेक जण म्हणतात, “घर भाड्याने दिलं तर उत्पन्न मिळेल ना? ” पण जर तुमच्याकडे एकच घर असेल तर ते भाड्याने दिल्यानंतर स्वतः कुठे राहायचं हा प्रश्न उभा राहतो. मोठ्या शहरांमध्ये मिळणारं भाडं आणि स्वतः राहण्यासाठी द्यावं लागणारं भाडं यांचा हिशोब कधीच जुळत नाही. त्यामुळे एकच घर असलेल्या आणि त्याच घरात राहून उत्पन्न हवं असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज हा अनेकदा अधिक व्यवहार्य पर्याय ठरतो. कारण घरही तुमच्याकडे राहते आणि त्यातून उत्पन्नही मिळतं.

खरं तर ही योजना काही विशिष्ट प्रकारच्या कुटुंबांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. मुलबाळ नसलेली दांपत्य, फक्त मुली असलेले आणि त्या आपल्या संसारात स्थिरावलेल्या पालक, परदेशात किंवा दूरच्या शहरांत राहणारी मुलं असलेली कुटुंबं, तसेच म्हातारपणी कोणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही असं ठरवलेले ज्येष्ठ नागरिक, या सगळ्यांसाठी हा पर्याय गंभीरपणे विचार करण्यासारखा आहे. कारण सर्वांची मुलं आई वडिलांना टाकून देत नसले तरी प्रत्येकाला आईवडिलांना स्वतःच्या घरी नेता येत नाही. मुलांकडे हात पसारायला आई वडिलांना आवडत नाही. मग अशा वेळी आर्थिक स्वावलंबन हीच सर्वात मोठी सुरक्षितता ठरते.

समजा काही वर्षांनी देशमुख काकांचं निधन झालं तरी काकू संयुक्त अर्जदार असल्यामुळे त्या पुढेही आयुष्यभर त्या घरात राहू शकतात. बँक त्यांना बाहेर काढू शकत नाही. शिवाय योजनेच्या अटींनुसार त्यांना मिळणारी देयकेही सुरू राहू शकतात. त्यामुळे जोडीदार गेल्यानंतर अचानक आर्थिक आधार तुटत नाही. ही बाब विशेषतः एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. पुढे काकूंचंही निधन झाल्यानंतर मुलांसमोर दोन पर्याय असतात. एक म्हणजे बँकेची थकबाकी भरून घर स्वतःकडे ठेवणं. दुसरा म्हणजे घर विकणं. समजा त्या वेळेस घराची किंमत ५ कोटी रुपये झाली आहे आणि रिव्हर्स मॉर्गेजमधून मिळालेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून बँकेची एकूण थकबाकी २ कोटी रुपये झाली आहे. अशा वेळी घर विकल्यास सर्वप्रथम बँकेचे २ कोटी रुपये फेडले जातील आणि उर्वरित ३ कोटी रुपये वारसांना मिळतील. म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज केल्यामुळे मुलांना काहीच मिळणार नाही असं नाही. उलट अनेकदा मालमत्तेच्या वाढलेल्या किमतीचा फायदा वारसांनाही मिळतो. जर वारसांना घर विकायचं नसेल, तर ते बँकेची थकबाकी भरून घर स्वतःच्या मालकीत ठेवू शकतात.

सिनियर सिटीझन ह्यात सहभागी झाल्यास काही घरांमध्ये वर्षातून एकदाच फोन करणारी मुलं, रिव्हर्स मॉर्गेजमधून आई-वडिलांना उत्पन्न सुरू झाल्यावर अचानक नियमित फोन करू लागतील, त्यांचं प्रेम उतू जाऊ लागेल! ह्यातील विनोद बाजूला ठेवला तर एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे म्हातारपणी सन्मानाने जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्या पैशांसाठी मुलांकडे पहावं लागू नये असे प्रत्येकाला वाटत असत. त्यातून प्रत्येक मुलगा “वंशाचा दिवा” ठरेलच असं नाही. प्रत्येक मूल म्हातारपणी आई-वडिलांचा आधार बनेलच असंही नाही. पण आयुष्यभराच्या कष्टातून तुम्ही स्वतः उभं केलेलं तुमचं घर मात्र तुम्हाला कधीच सोडून जात नाही. गरज पडली तर रिव्हर्स मॉर्गेजच्या माध्यमातून तेच घर तुमच्या उतारवयाचा आर्थिक आधार बनू शकतं. आपणच तयार केलेल्या ॲसेटचा आपल्या हयातीत, ताठ मनानें जगायला पुरेपूर वापर करता येतो. अनेकांसाठी खरा प्रश्न “वंशाचा दिवा कोण? ” हा नसून “आयुष्यभर साथ कोण देणार? ” हा आहे. आणि त्याचं उत्तर अनेकदा आपल्या स्वतःच्या घरातच दडलंलेलं असतं. फक्त ते अनेकांना माहीत नसतं. म्हणून हा लेखन प्रपंच.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : मंदार जोग

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted