संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ आज आकाशात एक काळा ढग दिसला ☆ संगीता कुलकर्णी ☆

आज सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत उभी राहून मी आकाशाकडे पाहत होती… उन्हाळ्याची तीव्रता अजूनही वातावरणात जाणवत होती. सूर्याने आपले प्रखर तेज सर्वदूर पसरवले होते आणि निळ्याशार आकाश निरभ्र दिसत होते. झाडांची पाने निश्चल होती… पक्ष्यांचा किलबिलाटही मंदावला होता आणि धरती जणू एखाद्या दीर्घ प्रतीक्षेत मग्न होती… अशा शांत आणि स्थिर वातावरणात माझी नजर अचानक आकाशाच्या एका कोपऱ्याकडे वळली. तिथे एक काळा ढग दिसला.

तो ढग आकाराने फार मोठा नव्हता परंतु त्याच्या अस्तित्वाने संपूर्ण आकाशाचे स्वरूप बदलून गेले होते. अथांग निळाईच्या मध्यभागी तो एखाद्या कवीच्या अंतर्मनातील गूढ भावनेप्रमाणे तरंगत होता… त्याचा काळसर रंग आकाशाच्या शुभ्रतेशी एक सुंदर विरोधाभास निर्माण करीत होता. त्याच्या कडा सूर्यकिरणांनी उजळल्या होत्या त्यामुळे त्या ढगाभोवती एक प्रकारचे तेजस्वी वलय निर्माण झाले होते… तो ढग पाहताना असे वाटत होते की निसर्गाने आपल्या विशाल कॅनव्हासवर एक अर्थपूर्ण रेषा उमटवली आहे.

वाऱ्याची मंद झुळूक वाहू लागली आणि तो ढग संथ गतीने पुढे सरकू लागला. त्याच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता. तो कुठल्याही घाईत नव्हता जणू त्याला आपल्या प्रवासाचे उद्दिष्ट माहीत होते. त्या काळ्या ढगाकडे पाहताना माझ्या मनात अनेक विचार उमटू लागले… जीवनातही काही प्रसंग असेच अचानक समोर येतात.. ते सुरुवातीला काळ्या ढगांसारखे वाटतात परंतु त्यांच्याच आगमनातून नव्या शक्यता निर्माण होतात…

तो ढग पाहताच बालपणीच्या आठवणी मनात तरळू लागल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला आकाशात असेच काळे ढग जमले की आम्ही मित्र मैत्रीणी आनंदाने घराबाहेर पळत असू… पहिल्या सरीची आतुरतेने वाट पाहत असू… पावसाच्या पाण्यात कागदी होड्या सोडणे, चिखलात खेळणे आणि आईच्या हाकेकडे दुर्लक्ष करून भिजत राहणे हे सारे क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहिले. त्या एका ढगाने स्मृतींच्या दालनातील कितीतरी बंद दरवाजे उघडले होते.

काळा ढग हा केवळ पावसाचा सूचक नसतो तो आशेचा संदेशवाहक असतो. उन्हाने करपलेल्या धरतीला तो नवजीवनाची हमी देतो. शेतकऱ्याच्या डोळ्यांतील प्रतीक्षेला तो अर्थ देतो. कोरड्या विहिरी, तहानलेली झाडे आणि उष्णतेने व्याकूळ झालेली सृष्टी त्याच्या आगमनाने सुखावते. म्हणूनच त्या ढगाकडे पाहताना मला वाटले की निसर्गातील प्रत्येक गोष्ट माणसाला काहीतरी शिकवत असते. कठीण परिस्थिती कितीही दीर्घकाळ टिकली तरी तिचा अंत निश्चित असतो.

थोड्याच वेळात त्या ढगाने आकाशात आपला विस्तार वाढवला. त्याच्या सावलीने परिसरातील प्रकाश मऊ झाला. वातावरणात गारव्याची चाहूल लागली. झाडांच्या पानांत कुजबुज सुरू झाली. पक्षी अधिक चैतन्याने उडू लागले. जणू संपूर्ण निसर्ग त्या ढगाच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. त्यावेळी मला जाणवले की परिवर्तनाची सुरुवात अनेकदा अशाच सूक्ष्म संकेतांनी होत असते. एका छोट्याशा ढगातून मोठ्या वर्षावाची शक्यता दडलेली असते.

आज आकाशात दिसलेल्या त्या काळ्या ढगाने मला जीवनाचे एक सुंदर तत्त्व शिकवले. बाह्यतः काळोख वाटणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगातही सृजनाची शक्ती दडलेली असते. काळा ढग दिसतो तेव्हा आपण पावसाची आशा करतो त्याचप्रमाणे संकटे आली की त्यातून उगवणाऱ्या नव्या संधींचीही अपेक्षा ठेवली पाहिजे कारण निसर्गाप्रमाणेच जीवनातही प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो… प्रत्येक प्रतीक्षेनंतर आनंद येतो आणि प्रत्येक काळ्या ढगानंतर जीवनदायी पाऊस बरसतो त्यामुळे आज दिसलेला तो एकमेव काळा ढग माझ्यासाठी केवळ निसर्गदृश्य नव्हता तर आशा, परिवर्तन आणि नवचैतन्य यांचे सुंदर प्रतीक होता…

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted