संगीता कुलकर्णी
विविधा
☆ जागतिक आदिवासी दिन… ☆ संगीता कुलकर्णी ☆
९ ऑगस्ट रोजी झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने:
जागतिक आदिवासी दिन : निसर्गसंस्कृतीचा गौरव
ज्यांच्या पावलांनी जंगलाला वाटा मिळाल्या, ज्यांच्या श्वासांनी पर्वतांना जीवन मिळाले आणि ज्यांच्या संस्कृतीने निसर्गालाच देवत्व बहाल केले त्या आदिवासी समाजाला कृतज्ञ अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन.
“जंगल आहे म्हणून जीवन आहे आणि जीवन आहे म्हणून संस्कृती आहे, ” ही भावना ज्या समाजाच्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात दडलेली आहे तो म्हणजे आदिवासी समाज… निसर्गाशी सुसंवादी नाते, श्रमाला प्रतिष्ठा, सामूहिक जीवनपद्धती आणि सांस्कृतिक वैभव यांमुळे आदिवासी समाज मानवसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो… दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका समाजाचा गौरव करण्यासाठी नसून त्यांच्या परंपरा, संस्कृती, ज्ञान आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा सन्मान करण्यासाठी आहे.
भील, गोंड, वारली, संथाल, मुंडा, कोरकू, कातकरी, कोलाम, ठाकूर अशा अनेक जमाती भारताच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालतात. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा, लोकपरंपरा, श्रद्धा, कला, लोकनृत्य आणि जीवनपद्धती आहे. या विविधतेतून भारतीय संस्कृतीचे विशाल रूप अधिक उजळून दिसते… आदिवासी म्हणजे केवळ डोंगर-दऱ्यांत राहणारे लोक नव्हेत… ते निसर्गाचे खरे रक्षक आहेत. झाडे, नद्या, पर्वत, वन्यजीव आणि पृथ्वी यांना ते केवळ संसाधने मानत नाहीत तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात. त्यांच्या लोकगीतांत निसर्गाचे सौंदर्य आहे, लोकनृत्यांत जीवनाचा उत्सव आहे आणि लोकपरंपरांत पर्यावरण संवर्धनाचा अमूल्य संदेश आहे.
आदिवासी समाजाचे जीवन निसर्गाशी एकरूप झालेले आहे. जंगल, डोंगर, नद्या आणि वनसंपत्ती हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे ज्ञान त्यांनी अनुभवातून आत्मसात केले आहे… आज जग पर्यावरण संवर्धनाची चर्चा करत असताना आदिवासी समाजाने ती हजारो वर्षांपूर्वीच आपल्या जीवनात उतरवली होती तसेच ही जीवनमूल्ये ही शतकानुशतके आपल्या आचार-विचारांत जपली आहेत.. त्यांनी वृक्ष तोडण्याआधी त्याची क्षमा मागितली, नदीत उतरतानाही तिचा आदर राखला आणि जंगलाचा उपयोग करतानाही त्याचे संरक्षण केले. निसर्गाशी संघर्ष नव्हे, तर सहजीवन हेच त्यांचे जीवनतत्त्व आहे. म्हणूनच त्यांच्या संस्कृतीत पृथ्वीच्या भविष्याचे मौल्यवान ज्ञान दडलेले आहे… त्यांचे पारंपरिक ज्ञान हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही अत्यंत मौल्यवान ठरते.
आदिवासी समाज हा भारताच्या संस्कृतीच्या इंद्रधनुष्यातील एक तेजस्वी रंग आहे. त्यांच्या लोकगीतांत मातीचा सुगंध दरवळतो, लोकनृत्यांत स्वातंत्र्याचा आनंद डोलतो तर त्यांच्या चित्रकलेत निसर्गाचे स्पंदन जिवंत होते. त्यांच्या जीवनात कृत्रिमतेला स्थान नाही साधेपणा हीच त्यांची श्रीमंती आणि श्रम हीच त्यांची पूजा आहे. पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे त्यांचे जीवन निर्मळ तर उंच डोंगराप्रमाणे त्यांचा स्वाभिमान अढळ आहे… सभ्यतेच्या झगमगाटात अनेकदा विस्मरणात गेलेल्या या समाजाने निसर्गाच्या कुशीत राहून मानवाला जगण्याची खरी कला शिकवली. त्यांनी जंगलाला संपत्ती नव्हे तर आई मानले, नद्यांना केवळ पाण्याचा प्रवाह नव्हे तर जीवनाची गंगा समजले आणि पृथ्वीला उपभोगाची वस्तू नव्हे तर पूजनीय माता मानले.
भारतातील आदिवासी समाजाने देशाच्या इतिहासातही मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली… अनेक आदिवासी वीरांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित ठेवली… भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे… त्यांच्या संघर्षाची गाथा इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांची जपणूक अधिक बळकट झाली… स्वातंत्र्यानंतरही शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी विकासाच्या प्रवाहात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तरीही विस्थापन, वनहक्क, शिक्षणातील असमानता, कुपोषण, बेरोजगारी आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची समस्या आजही गंभीर स्वरूपात दिसून येते.
आज आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात अनेक आदिवासी परंपरा आणि बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे, विस्थापन वाढत आहे आणि त्यांच्या पारंपरिक जीवनपद्धतीसमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. तरीही त्यांनी आपल्या संस्कृतीची ओळख, परंपरेचा अभिमान आणि निसर्गाविषयीची निष्ठा जपली आहे. ही चिकाटी आणि आत्मसन्मान प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
जागतिक आदिवासी दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, जमीन, वनहक्क आणि सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रात आदिवासी समाजाला समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान करून आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. कारण निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याची कला जगाला शिकविण्याची ताकद आदिवासी संस्कृतीत आहे.
आज आपण पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकास यांविषयी चर्चा करतो परंतु हे विचार आदिवासी समाज शतकानुशतके आपल्या जीवनातून जगत आला आहे म्हणूनच त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर आदराने आणि समतेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या संस्कृतीचे जतन करणे म्हणजे आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे संरक्षण करणे होय…
जागतिक आदिवासी दिन हा विविधतेतील एकतेचा, मानवतेचा आणि निसर्गप्रेमाचा उत्सव आहे… हा केवळ उत्सव नाही तर आत्मपरीक्षणाची संधी आहे. आदिवासी समाजाला विकासाचा समान अधिकार देताना त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण करणे, त्यांच्या ज्ञानपरंपरेचा सन्मान करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे, हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन म्हणजे मानवतेच्या प्राचीन शहाणपणाचे जतन होय म्हणूनच विविधतेचा सन्मान, समानतेची जाणीव आणि निसर्गाशी सुसंवाद या मूल्यांच्या आधारे आपण अधिक न्याय्य, समृद्ध आणि संवेदनशील समाजाची उभारणी करूया… आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकले तरच निसर्गाचे संतुलन आणि मानवतेचे भविष्य अधिक समृद्ध, सुंदर आणि सुरक्षित राहील हाच जागतिक आदिवासी दिनाचा खरा संदेश आहे… जंगलातील प्रत्येक हिरवे पान पृथ्वीचा श्वास जपते तसेच आदिवासी समाज भारताच्या संस्कृतीचा आत्मा जपतो. त्यांच्या अस्तित्वाचा सन्मान म्हणजे निसर्गाचा सन्मान, आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग होय.
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन हा केवळ एका समाजाचा उत्सव नाही तर मानवसंस्कृतीच्या आद्य वारशाला अर्पण केलेला सन्मानाचा मुजरा आहे.
© संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे मो. 9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





