सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे
🪻 अभिनंदन 🪻
मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनलवर वर्षभर सातत्यपूर्ण विविध नामांकित कवी कवयित्रींच्या कवितांचे उत्कृष्ट रसग्रहण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कविता रसग्रहण पुरस्कार तसेच मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान आयोजित विशेष राज्यस्तरीय युट्युब काव्य सादरीकरण स्पर्धेत *तृतीय क्रमांक * असे दोन पुरस्कार आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. रेणुका मार्डीकर यांना प्राप्त झाला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ✒️💐🌹
🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌸
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कविता शतकांच्या यज्ञातून उठली… कवी : शंकर वैद्य आणि रसग्रहण
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
काव्यानंद : पुरस्कार प्राप्त रसग्रहण
☆ शतकांच्या यज्ञातून उठली… कवी : शंकर वैद्य ☆ रसग्रहण : सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान आयोजित विशेष राज्यस्तरीय युट्युब काव्य सादरीकरण स्पर्धेत पुरस्कार प्राप्त कविता आणि रसग्रहण)
☆
☆ मूळ कविता – शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला – कवी – शंकर वैद्य ☆
☆
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला
*
शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलुख सारा
दिशा दिशा भेदिक धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला
*
कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजिवन प्राणांचे
हे रूप शक्तीयुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला
*
गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्ष जयजयकार
*
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज
*
शिवछत्रपतींचा जय हो
श्री जगदंबेचा जय हो
या भारतभूमीचा जय हो
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
☆
☆ रसग्रहण : सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
शंकर वैद्य यांचा जन्म ओतुर महाराष्ट्र येथे जून 15, 1928 साली झाला. जुन्नरला प्राथमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य आधी नागपूर नंतर पुणे व शेवटी मुंबई असे ते नोकरीनिमित्त अध्यापन करत राहिले. त्यांचा कालस्वर हा पहिला काव्यसंग्रह अत्यंत सोपे आणि सहज सुंदर शब्द हे त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, कवी लेखक समीक्षक अशा विविधांगी भूमिकांसोबतच ते उत्कृष्ट वक्ते आणि प्रभावी सूत्रसंचालक म्हणून ज्ञात होते.
प्रवासी पक्षी या कुसुमाग्रज यांच्या व कवी मनमोहन यांच्या आदित्य काव्यसंग्रहाचे संपादन शंकर वैद्य यांनी केले. शंकर वैद्यांच्या पत्नी सरोजनी यादेखील प्रतिभाशाली कवयित्री व चरित्र लेखिका होत्या. त्यांच्या मुलाचे नाव निरंजन.
शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे इत्यादी अनेक त्यांच्या गाजलेल्या कविता
शंकर वैद्य यांची गाजलेली पुस्तके
- आला क्षण गेला क्षण हा कथासंग्रह
- कालस्वर हा कवितासंग्रह
- दर्शन हा कवितासंग्रह
शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार
कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मास्टर दिनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कार
मुग्ध रसिल्या कवितेचे धनी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते कवी शंकर वैद्य. शंकर वैद्य यांच्या वृत्तीतला समतोल आणि अनाग्रही स्वभाव त्यांनी कधी सोडला नाही. परंपरेतील सत्वशीलतेचा कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता बदलत्या काळातील कवितेशी कुठे सांधा जुळविता येईल याचा त्यांनी चिंतनशील वृत्तीने वेध घेतला होता. वास्तवाचे भान ठेवून सशक्त सौंदर्यवादी काव्यधारेची उपासना करणारे शंकर वैद्य हे कवी होते.
बीज अंकुरते कसे
नाजुकल्या वेदनांनी
मुळे पृथ्वीच्या धमन्या
होता वृक्ष ये फुलोनी
लागे मातीच्या इर्षेला
नव्या जन्माचा डोहाळा
तिचा जीव वृक्षातून
रंग गंधात व्यक्तला
नव बदलाची जाणीव असणारा कवी म्हणून शंकर वैद्यांना ओळखले जाते.
आई दिसली, उभी उंच सरस्वती
देवळातल्या चाफ्याची उंच माळ तिच्या हाती
हात वर धरलेला, तरी माळ रुळे पायी
अधांतरी चांदण्यात कशी ती चालत जाई
यासारख्या ओळीतून आपल्या आईला रेखाटत हृदयाला स्पर्श करण्याची ताकद असणारे कवी शंकर वैद्य म्हणजे विविध भाववृत्ती आपल्या कवितेतून सहजगत्या पकडणारे कवी म्हणून साहित्य वर्तुळात, काव्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध होते. कवितेची कोवळीक जपणारे कविवैद्य यांनी कधीच आपल्या कवितेत आक्रमकपणा आणला नाही. शंकर वैद्य हे मराठी कवितेतलं एक वेगळंच रसायन होतं. पाडगावकर झगमगता माणिक असतील तर वैद्य म्हणजे माजघरातील मंद दिव्याची वात होते. मराठीतील सर्व वृत्तं आणि छंद त्यांना ज्ञात होते.
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला
अनेक शतकांच्या या महायज्ञातून उठलेली एक केशरी ज्वाला म्हणजे आपले शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज. केवळ एका पूर्व दिशेला नव्हे तर दहा दिशांमधून आज अरुणोदय झाला आहे. शिवछत्रपतींना पाहण्यासाठी दहाही दिशा उजळल्या आहेत. हे स्वराज्य जिथे शिवप्रभूंची केवळ नजर फिरताच सारा मुलुख उभा राहतो. राजांनी इशारा करताच दिशा दिशांनी हातात तलवारी घेऊन इथला मावळा गनिमांवर तुटून पडतो.
शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा
दिशा दिशा भेदित धावल्या खड्गांच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला
हे तुफान स्वातंत्र्याचे आहे. हे उधाण आहे शिवरायांप्रति स्वराज्याप्रति अभिमानाचे. हे वादळ आहे जे धर्मासाठी स्वातंत्र्यासाठी उग्र विजांचे लोळ होऊन आलेले आहे. या उग्र विजांमुळे तममय अशा गनिमांचे तट कोसळले आहेत. चिरा चिरा ढळला आहे.
कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे सर्व शक्तीयुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला
आज या सह्याद्रीच्या कडेकपारीतून विजयाचे गान घुमू लागले आहे. अनेक वर्ष आलेल्या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे इथली भूमी मृतवत झाली होती पण आज या भूमीत स्वराज्य स्थापन करून माझ्या शिवाजीराजांनी पुन्हा नवे प्राण फु़ंकले आहेत. पुन्हा ही भूमी तेजोमय झाली आहे. रायगडावर माझ्या राजाचा राज्याभिषेक होणार आहे. खडा चौघडा वाजू लागला आहे. शिंगांच्या ललकारीवरती भगवे झेंडे अभिमानाने फडकत आहेत. शिवराय हे माझ्या देशाचे भाग्य आहेत. ते मृतवत झालेल्या स्वराज्यात प्राण फुंकणारे जीवन देणारे प्राणांचे संजीवन आहेत. शक्ती आणि युक्तीच्या बळावर स्वराज्य स्थापन करणारे शिवछत्रपती हे देवरूप आहेत. शिवाजीराजा नावाचा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला आहे आणि हा सारा मावळ प्रांत तेजोमय झाला आहे.
गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज
शिवछत्रपतींचा जय हो
श्री जगदंबेचा जय हो
या भारतभूमीचा जय हो
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
सप्त नद्याच्या जलाने शिवरायांना स्नान घालून गागाभट्टांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला. शिवराय जेव्हा सिंहासनारूढ झाले तेव्हा अधीर अशा सर्व स्वराज्याच्या हृदयातून शिवरायांचा जयजयकार होऊ लागला.
प्रौढप्रताप पुरंदर- हे शिवाजी महाराजांना महान शौर्य आणि विशिष्टतेचे व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जाते. जे युद्धातील त्यांच्या पराक्रम व प्रतिष्ठेला उजागर करते. क्षत्रिय कुलावतंस- यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराज क्षत्रिय योद्धा होते जे परंपरीकपणे भारतीय समाजात योद्धा भूमिका आणि कुलिनतेशी संबंधित असतात. सिंहासनाधीश्वर- याचा अर्थ सिंहासनाचा स्वामी असा होतो जो शासक आणि राजा म्हणून या पदासाठी अगदी सुयोग्य असतो. महाराजाधिराज- याचा अर्थ राजांचा राजा असा होतो जो राज्यकर्त्यांमध्ये त्याचे वर्चस्व दर्शवितो. महाराज श्रीमंत ही एक सन्माननीय पदवी आहे जगामध्ये श्रीमंत म्हणजे श्रीमंत किंवा थोर असे आदरयुक्त दर्जा दिला जातो. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांचे पूर्ण नाव आहे श्री हा आदर्श उपसर्ग आहे व छत्रपती म्हणजे राजा किंवा सम्राट की जय याचा अर्थ विजय असो. छत्रपतींचा जगदंबेचा व भारत मातेचा जयजयकार कवींनी प्रस्तुत कवितेचा शेवट करताना केला आहे ज्या जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले, त्या भारतभूचे ते सुपुत्र होते, त्यांचा जयजयकार असो अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक सहा जूनला रायगडावर झाल्यावर जय जय कारातून शतकांच्या विजयी माला उजळल्या त्याची स्मृती म्हणून आज ही शंकर वैद्यांची कविता शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला ही मी रसग्रहणासाठी घेतली आहे.
शेवटी शिवरायांना वंदन करून माझ्या कवितेच्या चार ओळींनी समारोप करते.
माझ्या राजा, तुझ्यासाठी
गडकिल्ल्यावर
पाठवीन पुन्हा पुन्हा
स्वराज्य समर
© सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







सुंदर रसग्रहण! पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन