श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे… ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
चिंतने अचिंत राहिलो निश्चिल
तेचि किती काळ वाढवावे
*
अबोल्याच्या काळ आता ऐशावरी
वचनाची उरी उरली नाही
*
करू आला तो तो केला लवलाहो
उरोचि संदेह दिला नाही
*
तुका म्हणे मोहे परतेचिना मागे
म्हणुन त्याने त्याग झाला
*
तुका म्हणे
जन्मभर केलेल्या चिंतनाने मनातील चिंताच नष्ट झाली आहे. त्याच्या मुळे चंचल असनारे मन शांत झाले आहे. आता हे असेच पुढे ही चालायचे. आता मौन पाळायचे आत्मबल प्राप्त झाले आहे. जे काही करण्यासारखे होते ते सर्व केले. बोलण्यासारखे जवळ काही राहिलेले नाही. मनात संभ्रमच उरला नाही. भोग भोगण्याचे मनाचे भोगही आता लांब गेलेत. ते परत येणारच नाहीत. मी स्थितप्रज्ञ झालो आहे. म्हणून आता त्यागाला ही त्यागले आहे.
तुकाराम महाराजांनी आपली मनस्थिती येथे कथन केली आहे.
ही मनस्थिती तपसाधनेच्या पराकोटीच्या अवस्थेने प्राप्त होते. चिंतन मनाने कोणतीही चिंता चिंताच वाटत नाही. मन, तन स्थितप्रज्ञ होऊन जाते. कोणाशी काहीही बोलण्याची आणि चर्चा करण्याची उर्मीच नष्ट होते. उरतो तो फक्त चिंतनाचा आत्मानंद. मग उरत नाहीत कोणतेच प्रश्न.
आणि यालाच म्हणतात पराकोटीचा त्याग.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







