सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ४९/२  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कोनाडा – – 

(जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. भरपूर, केव्हांही, कधीही आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता.) – इथून पुढे —- 

आता वाटतं, आम्ही तिला एकटीला टाकून जायचो. कशी राहत असेल ती एकटी? आमच्याशिवाय किती सुनी सुनी झाली असेल ती!

कधी सांगायची, “अग! त्या दिवशी वेणू आली होती. या एवढ्या मोठ्या करपाल्या कोलंब्या घेऊन. पाठीसच पडली. “घेच गं म्हातारे! तुला द्यायच्या म्हणून कुणालाच दिल्या नाहीत. “

“पण कुणासाठी घेऊ बाई? माझी नात नाही खायला. ती आली की आण पुन्हा नक्की. आता दे त्या चित्रेबाईला. “.. पण बिंबाला किती आवडतात या तळलेल्या कोलंब्या, म्हणून तिचा जीव हळहळायचा.

रविवार असला की, पाट्यावर नारळ वाटून ती त्याचं दूध काढायची आणि नहाण्यापूर्वी ती केसांना छान लावून द्यायची. त्यावेळी मिक्सर नव्हते. केसांना शांपू लावणे अथवा बाजारात मिळणारे केसांचे साबण लावणे तिला अजिबात मान्य नसायचे. सगळ्या नातींचे केस दाट आणि काळेभोर. आता या सगळ्याची पावती जीजीलाच देते पण त्यावेळी तिचा रागच यायचा. तिची ही साग्रसंगीत औषधं लावण्याचा आम्हाला कंटाळा यायचा म्हणून आम्ही तिच्याशी वाद घालायचो, भांडायचेही. पण ती ऐकून घ्यायची आणि तिला जे करायचे तेच करायची. कधी चिडून दातओठ खायचीही,

म्हणायची, “कार्टीला अक्कल नाही. चांगलं कळत नाही. दळभद्री कुठली. “

तिची गंमत वाटायची. एव्हढं आयुष्य तिनं उन्हात काढलं. सोळाव्या वर्षी विधवा झाली. पदरात चार महिन्याचं मुल. त्यावेळचा सामाजिक काळही चांगला नव्हता. विधवा बाईला खूप पीडा. तिला तिच्या सासरच्या माणसांनीही खूप त्रास दिला. कधी ती सांगायची,

“मला जीवनाचा कंटाळा आला होता. मी जनाला घरीच पाळण्यात ठेवले आणि तळं गाठलं. आता जीवच द्यायचा. तळ्याजवळच्या शंकराच्या देवळात घंटा वाजत होत्या. पाण्यात खूप कमळं फुलली होती. का कोण जाणे! मला एकदम वाटलं, पाळण्याच्या दांड्यात माझ्या बाळाचा पाय अडकलाय, माझं बाळ रडतंय्, त्याच्याजवळ कुणीच नाही आणि मी झपाट्याने घरी धावत आले.. बाळ पाळण्यात शांत झोपला होता.

गुटगुटीत, गोरागोमटा, भव्य कपाळ, काळंभोर जावळ. मी त्याला छातीशी कवटाळलं आणि ठरवलं याला मी वाढवेन, मोठा करेन, चणे दाणे खाईन, खूप कष्ट करेन. “

.. कष्टच केले तिने. आयुष्यभर, तेव्हांही, नंतरही, या ना त्या कारणाने, अथक, कंटाळा न करता.

पप्पा एव्हढाले कोहळे आणायचे ते किसायचे त्याचा रस काढायचा. पातेल्यात साखरेच्या पाकात शिजवून वड्या करायच्या. टोपलीभर कमळाचे देठ आणायचे, ते गोल कापायचे. तिखट मीठ, जीरपूड लावून वाळवायचेआणि तळून खायचे. त्याला कमळाची भिशी म्हणत. ही भिशी करणं अपार कटकटीचं होतं. गवारीच्या शेंगा ताकात भिजवून नंतर वाळवायच्या. बरण्या भरुन लोणची, मुरंबे करायची. दिवाळीच्या दिवसात, सुगंधी उटणे ती घरी बनवायची. अनारशाचे ओले तांदुळ जात्यावर दळायची. आम्हाला म्हणायची, “येग! जात्याला हात लाव. माझे हात दुखतात. तुझ्या आईलाही भरपूर कामं असतात. “

पण आम्ही तिला कधीतरीच मदत करायचो. खरं म्हणजे हे ती सर्व आमच्यासाठीच करत होती.

आता तिच्या हातचे जाळीदार कुरकुरीत सोनेरी अनारसे आठवले की वाटतं, ती गोडी अवीट होती आणि आता कायमची दुरावली.

पपांची आणि जीजीची भांडणं व्हायचीच. कधीकधी तर दोघेही मागे हटायचे नाहीत. आपला मुलगा आपल्याला बोलतो याचं तिला खूप दु:खं होत असलं पाहिजे आणि आम्हीही तिची बाजू उचलून धरायचे नाही. मग ती पिळवटून म्हणायची,

“जाते रे बाबा, मी आता देवळात बसते तिथे जाऊन. आता या घरात माझी गरज नाही ऊरली. “

आणि ती खरंच जायची कुठेतरी. भांडण संपायचं पण घरातलं वातावरण गढुळ व्हायचं. जीजीला आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. ती जाणार तरी कुठे होती?

त्यादिवशी दिवसभर शाळेत उदास वाटायचं. मन हळहळायचं. उगीच बोलतात पपा तिला. पपांची तत्वं कठोर. न पटणारं काहीही ते कधीच करायचे नाहीत.

जीजीनं तरी कशाला अट्टाहास करावा. जाऊ द्यावं ना. काय करायचं आता आपण?

पण शाळेतून घरी आल्यावर, मधल्या खोलीत जीजी पांघरुण घेऊन झोपलेली असायची.

रात्री सगळे झोपले की मी हळुच तिच्या जवळ जायची. ती जागीच असायची मग डोळ्यात पाणी आणून मला जवळ घेत म्हणायची,

“मला एखादी तरी मुलगी हवी होती. मुलीची माया वेगळी असते!! “

खरं सांगू तेव्हां तिच्या जखमा आम्हाला दिसल्याच नाहीत.

त्याही वेळी तिने मला लपेटून घेत म्हटलं होतं..

“तू जेवलीस ना? फडताळ्यात तुझ्यासाठी तळलेली सुरमई ठेवली होती. आईनं तुला वाढली कां.? “

किती विलक्षण प्रेमाचं नातं हे! याची जात कुठली? याचा रंग कुठला? या ओबडधोबडपणातही गुलाबपाण्याचा स्पर्श होता. जीवनातली ती शीतलता होती.

 ती आजारी पडायची. इतकी आजारी पडायची की आम्हाला वाटायचं आता ती यातून वाचणार नाही. पपा तिचे हात पाय दाबायचे आणि त्यांच्या टपोर्‍या डोळ्यांतून अश्रु गळायचे.

एका मे महिन्यात आमची काश्मीरची सहल ठरली होती. आणि नेमकी जीजी आजारी पडली. खूपच आजारी होती ती. आता सहल कॅन्सलच पण ती डाॅक्टरना सांगत होती,

“डाॅक्टर, या वेळेस कसंही करुन मला बरं करा नाहीतर माझ्या नातींचा हिरमोड होईल. त्यांची काश्मीर सहल सुखरुप पार पडू देत. मग माझं काही होऊ देत. “

डाॅक्टर हसायचे. त्यांना जीजीची चमत्कारिक प्रकृती माहीत होती. ते म्हणायचे,

“आजी तुम्ही आज आजारी आहात. पण उद्या ओकांच्या घरी जास्वंदीची फुलं द्यायला जाल. “

जीजी मला म्हणाली होती. “हे बघ! माझं काही बरं वाईट झालं तरी तुम्ही सहलीला जाच बरं! माझं काय मेलं महत्व? मी म्हातारी. कधीतरी मरणारच. पण तुम्ही जा.

इतके पैसे भरलेत, हौस केलीय्. जाच बरं!

लोक काय म्हणतील याचा विचार नका करु? “

 …. पण ती जगतच राहिली. प्रत्येकवेळी तिच्या जगण्याला कारणच मिळायचं जणु.

आजारपणात ती देवाला विनवायची,

“बाबारे! या निशाचं एव्हढं बाळंतपण होऊ दे! पहिल्या खेपेस तिचं ऑपरेशन झालं. आतां काय होतंय् कोण जाणे! सारं सुखरूप होऊदे रे बाबा! तिला धडधाकट पाहू दे मग ने मला. “

पपांना पहिला हार्ट ॲटॅक आला तेव्हांही ती अशीच आजारी होती. गादीत पडल्या पडल्याच पुटपुटायची,

” माझा जना असा गादीवर. माझं काही झालं तर हा उठेल, खांदा देईल मग नंतर याला काही झालं तर? नको आधी माझ्या जनाला बरं कर मग मला ने”.

जीजीच्या आयुष्याची दोरी अशी वाढतच गेली. ती इतकी लांबली की तिच्या आयुष्यातली एक शोकांतिका टळली नाही.

पपा गेले. ती राह्यली.

देवळातला घंटानाद आणि तळ्यातल्या कमळांना साक्षी ठेवून तिनं तिच्या बाळाला वाढवायचं व्रत घेतलं होतं. ते व्रत तिने आयुष्यभर पाळलं.

ती आम्हाला अनेक गोष्टी वारंवार सांगायची. त्यातलीच एक गोष्ट ही होती.

“जना लहान असताना त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं. आपली आई सोडून गेली. मग तो स्वप्नातून जागा व्हायचा. माझ्या कुशीत शिरुन म्हणायचा, “आई तू मला सोडून कधीही जाऊ नकोस. ” मग ती म्हणायची”नाही रे बाबा! मी तुला अगदी जन्मभर पुरेन! घाबरू नकोस. “

जणुं जीजीचे शब्द खरे ठरले की पपांना दिलेलं वचन तिने पाळलं?

पण आमचे पपा गेले आणि आम्ही दु:खात बुडालो. पपा आमचे सर्वकाही होते. वडील. मार्गदर्शक. मित्र.

आम्हां सगळ्यांना शोकाकुल बघून ती कळवळली. तिनं आम्हां सार्‍यांना जवळ घेतलं.

“बाबांनो! वडीलांच्या मृत्युचे दु:ख नका करु. पिकलं पान गळणार. मुलांच्या आधी बापानं जावं हाच जगाचा नियम. माझा बाबा गेला. मी मागे उरले, उलटं झालं. माझ्या मरणाचं दु:ख बाबाला सहन झालं असतं का? माझ्यात दु:ख सोसण्याची ताकद आहे. त्याला नसतं सोसलं म्हणून मी राहिले. “

 

९७वर्षाची होती ती! पण हिंडती फिरती होती. मी माहेरी येणार असले की तिची फार धावपळ असायची. माझ्यासाठी माझ्या आवडीचे खाद्यपदार्थ करण्याचा तिचा केव्हढा आटापिटा असायचा.

पहाटे दारात रिक्षा थांबली तर लगबगीने दार उघडायला तीच यायची. दारातच विळखा घालायची, पापे घ्यायची. इतकी कृश झाली होती! नजरही अंधुकली होती.

पण आम्हाला ती डोळ्यांच्या पलीकडे बघू शकत होती.

जातांना निरोप घेताना तिला म्हणावं,

“येते हं जीजी. “

“नीट जा हं! परत कधी येशील? “

मनात यायचं परत येईन तेव्हां ही असेल का?

ती म्हणायची, “आता देवानं मला न्यावं ग! कधी मरेन मी? “

तिचा हा प्रश्न किती केवीलवाणा असायचा.

ती गेली.

त्यादिवशी मला दार उघडायला ती नव्हती.

दाराला लटकलेलं तिच्या अस्थींचं गाठोडं पाहिलं अन् प्रवासात धरून ठेवलेला बांध तुटला.

जाणवलं.

आयुष्यातला एक निस्सीम प्रेमाचा कोनाडा

रिकामा झाला!! अशी आभाळा एव्हढी माया आता कोण करेल?

(२०२२ साली मी जीजीचं आत्मवृत्तपर पुस्तक, ”जीजी” प्रकाशित केलं. तिचं ऋण तर कधीच फेडू शकणार नाही पण पुस्तकरुपात मी तिचं अस्तित्व आमच्यात टिकवण्याचा फक्त प्रयत्न केला.)

 – भाग ४९/२ समाप्त –

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted