सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “एका रुपयात पोटभर आनंद!” – लेखक : श्री रवींद्र पिंगे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

घटना घडायच्या असल्या की, त्या ‘अचानक’ घडून जातात.

आता मी ‘अचानक’ हा शब्द वापरलाय खरा, पण तो निव्वळ सवयीने. अचानक वगैरे काहीही नसतं. सर्व काही ठरलेलं, पूर्वनियोजित असतं. महाकवी शेक्सपिअरचे शब्द आहेत, ‘‘कुठली घटना घडायची नि कुठली माणसं तुम्हांला आयुष्यात भेटायची, ह्याचं रोपण अगोदरच झालेलं असतं. ’’

ह्याचा मला प्रत्यय आला.

बाजारात नऊ रुपयांची खरेदी केली. त्यासाठी दहा रुपयांची नोट दिली, तर दुकानदार म्हणाला, ‘‘माझ्याकडे परत करायला एक रुपया सुटा नाही. ’’

आता काय करावं? माझ्या पत्नीने मला केव्हापासून बजावून ठेवले आहे की, कुणाकडेही परत करायला एखादी रुपया नसला, तर त्याला रुपयाच्या मिरच्या घालायला सांगायचं. स्वयंपाकात पावलापावलाला मिरच्या लागतात. त्या मागायच्या म्हणजे दुकानदार यांचंही नडत नाही नि आपलंही काम होऊन जातं. हे खरंच आहे, पण ज्या दुकानदाराकडे परत द्यायला सुटा रुपया नव्हता, ते भाजीपाल्याचं दुकान नव्हतं; वाटलं, आपण त्या रुपयाचा मोह सोडून द्यावा. नाहीतरी आजकाल रुपयाला मोल उरलंय कुठं? असं काय मिळणारंय त्या चिमुकल्या रुपयात? त्यापेक्षा आपण त्या रुपयावर पाणी सोडू या. रिक्षावाल्यांकडे परत करायला सुटे पैसे अनेकदा नसतात, तेव्हा आपण कुठे भांडत बसतो? सोडून देतो ते पैसे. तसंच हेसुद्धा करायचं. पैसे सोडायचे. मग फेरविचार केला, रुपयावर पाणी नाही सोडायचं. पैसे मिळवायला आपल्याला किती कष्ट उपसावे लागतात! आपण थोडा वेळ थांबू, दरम्यानच्या काळात दुकानदाराकडे सुटा एक रुपया नक्कीच येईल. तो घ्यायचा नि नंतरच निघायचं.

सुदैवाने तिष्ठावं लागलं नाही. माझा बाकी रुपया माझ्या ताब्यात घेतला.

पुढचा प्रश्न- ह्या रुपयात अशी काय मोठी खरेदी करता येणाराय? साधे मुरमुरेसुद्धा मिळणार नाहीत. इतक्यात आठवलं की एका रुपयात दोन पोस्टकार्ड मिळतात. ती घेऊ या. घेतली.

लगेच पुढचा प्रश्न – ही कार्डं पाठवायची तरी कुणाला? हल्ली घरोघरी दूरध्वनी यंत्रं बसलेली आहेत. जे काय निरोप द्यायचे-घ्यायचे असतात, ते तिथल्या तिथे वेळ न दडवता फोन वरून दिले-घेतले जातात. लिखापढीची कटकट करतो कोण? मग आता ह्या दोन कार्डांचं करायचं काय?

इतक्यात आठवलं, की आम्हांला साठ वर्षांपूर्वी शाळेत शिक्षक असलेले मुळ्येमास्तर आता नव्वद वर्षांचं पिकलं पान होऊन बोरिवलीला आपल्या नातवाकडे राहायला आले आहेत. त्यांनी मला कोणे एके काळी बीजगणित शिकवलेलं आहे. त्यांना जुनी आठवण काढून पत्र पाठवावं. कृतज्ञता व्यक्त करावी.

दोनांपैकी एक कार्ड मायाळू शब्द पेरून मी मुळ्येसरांना पाठवलं. आठवडाभराने त्यांचं कापऱ्या अक्षरातलं जिव्हाळ्यानं लिहिलेलं उत्तर आलं;

“चि…, तुझं पत्र वाचून आनंद झाला, त्यापेक्षा आश्चर्य वाटलं, कारण गेल्या पंचवीसेक वर्षांत मला कुणीही, कधीही साधं कार्डसुद्धा पाठवलेलं नाही. ही जगरहाटीच आहे. जुनी माणसं कालांतराने अडगळीत पडतात. त्यातून मी तर साधा शिक्षक. तू माझा विद्यार्थी होतास हे मला आठवत नाही, पण तू माझी इतक्या वर्षांनंतरही आठवण ठेवलीस ह्याचा संतोष आहे. कधीतरी समक्ष भेटायला ये. लवकर ये, मी कायम घरीच असतो. येताना भेटवस्तू आणू नये, मला त्याचा काहीच उपयोग नाही. फक्त प्रेम आणावे.’’

मुळ्येसरांचं पत्र वाचून मी गहिंवरलो. वाटलं, मी कृतज्ञतेने त्यांना कार्ड पाठवलं ही लाख मोलाची गोष्ट झाली. अस्ताला चाललेला तो म्हातारा जीव किती फुलला असेल!

दुसरं कार्ड तसंच पड़ून राहिलं. नंतर माझी कोकणात फेरी झाली. तिथे खाड़ीकाठावरल्या बंदरात मी तरीची वाट पाहत रेंगाळलो होतो. बंदरात कोकणी मुसलमान होडीवाल्यांची नि मच्छीमारांची अगदीच रया गेलेली वस्ती आहे. मूर्तिमंत दारिद्र्य, आश्चर्य म्हणजे मी तरीची वाट पाहात असताना बंदरावर माझ्या शेजारी एक गरीब कोकणी मुसलमान बाईसुद्धा तरीची वाट पाहत उभी होती. तिच्यासोबत तिचं तीन-साडेतीन वर्षाचं लेकरू होतं. त्याच्या अंगावर जेमतेम कपडे होते. तरीची वाट पाहणारी ती खेडवळ माता आपल्या त्या मुलाला गाणं म्हणत नाचायला, डुलायला, हावभाव करून कौतुकाने शिकवीत होती, नि ते बाळ आईने दाखवल्याप्रमाणे आपल्या परीने नाच करून दाखवीत होतं. गाणं होतं,

‘नाच रे मोरा…. ‘

मायलेकरांचा तो उमाळ्याचा प्रेमाचा प्रसंग पाहून मला खोलवर दिलासा वाटला. एक कंगाल कोकणी मुसलमान माता, जिला कदाचित मराठीची अक्षरओळखसुद्धा नसेल, ती आपल्या लेकराला एक गाणं तालावर म्हणून नाचायला, डुलायला शिकवते ही किती हृद्य घटना आहे! ह्या गीताचे शब्द गदिमांचे नि तालबद्ध स्वररचना पु. ल. देशपांडेंची. माझ्या मते मराठीतलं अगदी तळागाळापर्यंत झिरपत गेलेलं गाणं म्हणजे पु. लं. नी संगीतबद्ध केलेलं ‘नाच रे मोरा… ‘ अक्षरओळख असो-नसो, गळ्यात सूर असो-नसो, घरोघरच्या आयांनी आपल्या लेकरांना ते गाणं साभिनय म्हणून दाखविलेलं आहे, नि घरोघरचे बोबडे बालगोपाल ते सूर ऐकताना ठेक्यावर डुलले आहेत. गावोगावच्या मातांनी आणि त्यांच्या लेकरांनी ते गाणं गात गात घरीदारी आनंदाचा कल्लोळ अनुभवला असेल. हजार वेळा, घरी परतल्यावर त्या शिल्लक राहिलेल्या कार्डावर हा प्रसंग लिहून मी पु. लं. ना कळवला नि लिहिलं,

‘ज्ञानोबांचे नि तुकोबांचे शब्द समाजात तळागाळापर्यंत पोहोचले असं आपण म्हणतो, ते खरंच आहे. पण गायला सहज-सोपी आणि हावभाव करून दाखवायला त्याहीपेक्षा सोपी, अशी तुमची लयबद्ध चाल तळागाळापर्यंत पोहोचलेली, मी मालप्याच्या तरीवर ऐकली. कोण ती कोकणातल्या बंदरवस्तीतली एक मुस्लीम माउली? पु. ल. देशपांडे हे नावसुद्धा तिला माहीत नसेल, पण तुम्ही विणलेली रेशमी चाल मात्र तिच्या काळजापर्यंत पोहोचली नि ती तिच्या हाडकुळ्या लेकराला सुरावर म्हणते, ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात… ‘ आणि ते बाळ तसं नाचतं! अशा हजारो-लाखो आया गावोगाव असतील. भाई, तुम्ही जिंकलंत!’ 

भाईंचं कापऱ्या अक्षरात लिहिलेलं कार्ड उलट-टपाली आलं. त्यांनी लिहिलं होतं, ‘‘पिंगे, तू अगत्याने लिहिलंस त्याचा आनंद झाला. स्वर चिरंतन असतात. म्हणून तर भास्करबुवांच्या चाली शंभर वर्षं टिकून आहेत. एका चित्रपटासाठी मी बांधलेली चाल लोकांनी आपली मानली. आपलीशी केली. ती चाल पु. ल. देशपांडेंची आहे हे लोक विसरलेसुद्धा! पण कोमल सूर जिवंत आहेत. मी कसलाही पराक्रम केलेला नाही. फक्त जीव ओतून काम केलं. ते माझ्या हातात होतं. कंपवातामुळे हात थकला. थांबतो. ’’

तुझा,

‘भाई.’

हे पत्रोत्तर हाती पडलं तेव्हा माझं भान हरपलं. कलावंताच्या आयुष्याचे सार्थक कशात असतं, ते पु. लं. नी दोन वाक्यांत सांगितलं. जीव लावून काम करा, बस्स. क्षणभर वाटलं, ते कार्ड फ्रेम करून भिंतीवर लावावं, तेच थोर लेखक, जे अनुभवाचे उत्तर दोन-चार शब्दांत तुमच्या हाताला लावतात. विनोबांच्या नंतर त्या ताकदीचे फक्त पु. ल. देशपांडे!

पुढे व्हायचं तेच झालं. ह्याला दाखव, त्याला दाखव, करता करता पत्राला पंख फुटले. घ आभाळात दूर कुठेतरी ते भटकत असेल. हाती आलेल्या एका रुपयाची दोन पोस्टकार्डं मी सहज म्हणून खरेदली नि ती योग्य ठिकाणी, योग्य संदर्भात निर्हेतुक पाठवली. त्यांच्या बदल्यात मला लाभलेला आनंद केवढा पोटभर ठरला!

तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं पत्र कधी आणि कुणाला पाठवलं…. तुम्हाला कुणाचं आलं…

धन्यवाद ! आपल्या वाचनाबद्दल !!

 

लेखक : रवींद्र पिंगे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments