श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – विचारावाचून… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
विचारावाचून /
न पाविजे समाधान //१//
*
देह त्रिगुणांचा बांधा /
माझी नाही गुण सुधा //२//
*
देवाचिये चाडे/
देवा द्यावे जे जे घडेल //३//
*
तुका म्हणे होते /
बहु गोमटे उचिते //४//
*
– संत तुकाराम.
तुक म्हणे
कोणत्याही गोष्टीचा सारसार विचार केल्याशिवाय मनाला समाधान वाटता कामा नये. आपण माझा माझा म्हणतो तो देह त्रिगुणांनी बनलेला आहे . पण त्या देहातले गुणावगुणही माझ्या मालकीचे नाहीत. म्हणून मनात देवाचे भान ठेवून जे काही घडते ते देवालाच अर्पण करावे. त्याच्यामुळे जे काही घडेल ते उचित, देखणे, आणि योग्यच घडेल .
मनात सतत विचार असायलाच हवेत त्याशिवाय मन स्वस्थ रहातच नाही. मला दिसणारा आणि मला माझा वाटणारा देह माझा नाही . त्याची रचना निराळीच आहे .तो पंचमहाभूते व त्रिगुणानी बनलेला असून त्यांच्याशीच कटीबद्ध आहे. मला ज्यांचा अभिमान वाटतो ते गुणही माझे नाहीत. दूस-या कुणीतरी ते गुण माझ्या देहात भरलेले आहेत. हे जेव्हा पक्के आपल्या मनात बसेल तेव्हा जे काही बरेवाईट घडेल ते सारे देह घडवणा-या परमेश्वरालाच अर्पण करावे असे वाटायला हवे. त्या मुळे आपल्याला जे फळ आणि बळ मिळेल ते महत्त्वाचे आणि यथायोग्यच असेल.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







