सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आमच्या आयुष्यातील काही आठवणी” — लेखिका : श्रीमती रमाबाई रानडे  ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

पुस्तक : आमच्या आयुष्यातील काही आठवणी  

लेखिका : श्रीमती रमाबाई रानडे 

प्रकाशक : समन्वय प्रकाशन, कोल्हापूर 

प्रमुख वितरक- अजब डिस्ट्रीब्युटर्स, शाहूपुरी, कोल्हापूर.

हे पुस्तक म्हणजे रमाबाई रानडे यांनी महादेव गोविंद रानडे यांच्यावर लिहिलेले काहीसे आत्मचरित्रासारखे आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या विषयी समग्र माहिती देणारे असे पुस्तक आहे. या पुस्तकातील घटनांचा कालावधी 19 व्या शतकातील आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे ही गोष्ट समाजाच्या अंगवळणी पडलेली नव्हती. घरातील स्त्रियाच स्त्रियांना शिक्षणासाठी विरोध करत असत. रमाबाईंनी या पुस्तकात पतीचा उल्लेख ‘स्वतः’ असा केला आहे. ‘स्वत:’ नी रमाबाईंना धुळाक्षरापासून शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हा घरातील इतर बायका त्यांना नावे ठेवत असत. ‘स्त्रीला शिक्षणाची गरजच काय? त्यांना गरजेपुरते संसाराचे ज्ञान असले की बास! अशा वृत्तीमुळे रमाबाईंना खूप जाच सहन करावा लागला.

पण पतीच्या इच्छेनुसार त्या शिकत गेल्या.

आर्य महिला समाजाच्या पंडिता रमाबाई तेव्हा सभेमध्ये व्याख्याने देत असत. त्यांचे सर्वांना कौतुक होतेच.

रानडे यांनी आपल्या पत्नीला त्यांच्या संपर्कात आणले. शिकण्यास प्रवृत्त केले. पतीच्या आज्ञेत राहून रमाबाईंनी आपला अभ्यास चालू ठेवला. पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत त्या अभ्यास करत व दिवसभर काम करत. महादेव गोविंद रानडे यांची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली तिथे पतीबरोबर त्या गेल्या आणि त्यांनी पतीला साथ दिली. घरातील सर्व आश्रित विद्यार्थी, स्वयंपाकी वगैरे लोकांना सांभाळून घेत संसार सांभाळला.

ताई सासुबाई नणंद तसेच इतर वडील बायकांना त्या मान देऊन वागत असत, तरीही त्यांच्या शिक्षण घेण्याच्या विरुद्ध या सर्व स्त्रिया होत्या. पण रमाबाई त्याबद्दल ‘स्वतः’कडे तक्रार करीत नसत. स्वतः रानडे स्वभावाने करारी, सुसंस्कृत, न्यायी असे होते. रानडे यांची तब्येत बिघडल्यावर रमाबाईंनी त्यांची खूप शुश्रुषा केली हेही या आठवणींतून कळते.

त्यातच स्वतः रमाबाईनाही काही आजार झाला. रमाबाईंचे ऑपरेशन करायचा निर्णय देताना रानडे यांचे मन कातर झाले होते. पण ऑपरेशन सुखरूप पार पडले, तेव्हा माधवरावांना हायसे वाटले.

अहमदाबाद, जयपुर, कलकत्ता असा प्रवास करत ही सर्व मंडळी सिमला येथे गेली होती. सिमला मध्ये चार महिने मुक्काम केला, तसेच हरिद्वारलाही गेले. हरिद्वार, हून लाहोर, अमृतसर असे मुक्काम करत अहमदाबाद मार्गे परत पुण्यात आले. मद्रास कडे एक महिनाभर राहून जबलपूर, प्रयाग, काशी, कलकत्ता असाही प्रवास केला. त्यानंतर 1891 मध्ये ते करमाळ्याला आले. परंतु तोपर्यंत रानडे यांची प्रकृती बिघडू लागली होती. पुण्यात आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेणे या गोष्टींचा त्यांना मानसिक त्रास झाला. प्लेगच्या साथी मध्ये त्यांनी पुण्यातील मुक्काम हलवला व महाबळेश्वरला गेले. 1899 साली त्यांची तब्येत बिघडतच चालली. सप्टेंबर मध्ये आजार पण वाढले. त्यांना Angina Pectoris हा आजार झाला होता. सप्टेंबर 1900 मध्ये त्यांची जीवन यात्रा संपली…

रमाबाईंच्या लिखाणातून आपल्याला तत्कालीन समाज रिती, परंपरा यांचे दर्शन होते. तेव्हाची सामाजिक स्थिती, स्त्रियांची अवस्था तसेच प्रवासाच्या अडचणी वगैरे अनेक गोष्टी कळतात. रमाबाई अतिशय हुशार होत्या. त्यांचा स्वभाव करारी आणि कर्तव्यनिष्ठ होता. पतीची सेवा करताना अजिबात कुचराई केली नाही. पतीच्या शिकवणीने शिकून तयार झालेल्या रमाबाईंचे हे चरित्र म्हणजे तत्कालीन परिस्थितीचा काळाचा आरसा आहे असे मला वाटते.

ही कादंबरी रोजनिशी स्वरूपात लिहिल्यासारखी आहे किंवा एक प्रकारे आत्मचरित्र लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न असेल! 19 व्या शतकातील पुणे ऐतिहासिक दृष्ट्या कसे होते तेही या कादंबरीत आपल्याला दिसून येते. ही कादंबरी वाचताना मला त्या काळातील बऱ्याच सामाजिक गोष्टींचा उलगडा झाला! आता आपण स्त्रियांचे शिक्षण हा विषय अगदी सहजगत्या बोलतो. उलट स्त्रिया शिक्षणामध्ये कांकणभर पुढेच आहेत असे दिसते. पण जेव्हा स्त्री शिक्षण घेणे अवघड होते त्या काळात महर्षी धोंडो केशव कर्वे, आनंदीबाई जोशींचे पती गोपाळराव, तसेच म. गो. रानडे, वगैरे सुधारकांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि त्या बाबतीत स्वतः कार्य केले!

कादंबरी वाचनीय आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

माझ्या जवळ आहे.मी वाचलेले आहे.येवढ्या मोठ्या चरित्रातून वेचक निवडून वाचकांना छान पुस्तक परिचय करून दिलात.